मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 14 जून 2021 (08:07 IST)

गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी सूचना पाठवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

राज्यातील गड किल्ल्यांचे पावित्र्य टिकवून त्यांचे टप्प्याटप्प्याने संवर्धन करण्यासंदर्भात आता पावले टाकण्यात येत असून राज्यातील दुर्गप्रेमी, दुर्ग संवर्धक, गिर्यारोहक यांनी यासंदर्भातील आपल्या सूचना व प्रस्ताव मुख्यमंत्री सचिवालयातील संकल्प कक्षास त्वरित पाठवाव्यात असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. किल्ल्यांच्या संवर्धनातील अडचणी दूर करण्यासाठी पुढे यावे व कामाला सुरुवात करावी असेही त्यांनी सांगितले.
 
मुख्यमंत्र्यांनी राज्यातील 250 दुर्गप्रेमी आणि गिर्यारोहक यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला व त्यांच्या सूचना ऐकल्या. या बैठकीचे संचालन आदेश बांदेकर, मिलिंद गुणाजी यांनी केले तर अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे, गिरीश टकले या प्रसिद्ध गिर्यारोहक व दुर्गप्रेमींनी आपले विचार सर्वांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात मांडले.
 
ईमेलवर सूचना पाठवा
दुर्गप्रेमींना दुर्ग संवर्धनाच्या दृष्टीने काही सूचना करावयाच्या असतील तर त्यांनी त्या  [email protected] या मुख्यमंत्री सचिवालयाच्या संकल्प कक्षाला पाठविण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. मुख्यमंत्री म्हणाले, दुर्ग संवर्धनात आपण आजपर्यंत केवळ अडीअडचणींचा पाढा वाचत होतो पण आता तसे होणार नाही. या अडचणींवर मार्ग काढून पुढे कसे जायचे ते या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळीनी एकत्र बसून ठरवावे व किल्ल्यांच्या संवर्धनाचा सर्वंकष आराखडा तयार करावा, राज्य शासन यामध्ये पूर्ण सहकार्य करेल.