शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 मे 2021 (07:59 IST)

कामासाठी नाराजी धरायची नसते, मंत्रिमंडळातील चर्चा बाहेर सांगण्याची प्रथा नाही : जयंत पाटील

महाविकास आघाडी सरकारला आता दीड वर्ष होत आले असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद प्रथमच चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे. जलसंपदा विभागाच्या सचिवांच्या नियुक्तीवरुन हा वाद झाल्याचे बोलले जात आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे थेट नाराजी व्यक्त केली आहे. जलसंपदा विभागाच्या कामात घाईगडबडीत निर्णय घ्यायला लावू नका, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी पवारांकडे केली आहे.
 
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनेही मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीप्रमाणे प्रशासनाला हाताशी धरुन राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य करु पाहत असल्याचा आरोप केला जात आहे. राष्ट्रवादीची ही नाराजी मुख्यमंत्र्यांपर्यंतही पोहोचवली जाणार असल्याचं सांगितलं जातंय. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पदावरुन हटवून, त्यांच्या जागी प्रवीण परदेशी यांची नेमणूक करावी, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी असल्याचं बोललं जातंय. 
 
मुख्यमंत्र्यांची ही अस्वस्थता शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आली आहे. फडणवीस सरकारच्या आधी आघाडी सरकारमध्ये जलसंपदा विभागातील भ्रष्टाचारावरुन सरकारला पायउतार होण्याची वेळ आली होती. त्यामुळे माझ्या सरकारच्या काळात किंवा माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात असा कुठलाही डाग लागू नये, याची खबरदारी मुख्यमंत्री घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. यापूर्वी आघाडी सरकारच्या दीड वर्षाच्या कार्यकाळात थोड्या कुरबुरी, नाराजीनाट्य पाहायला मिळालं. पण आता पहिल्यांदाच राष्ट्रवादी आणि मुख्यमंत्र्यांमध्ये ठिणगी पडल्याचं सांगितलं जात आहे.