1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 13 एप्रिल 2022 (08:29 IST)

दोन वर्षात रुक्मिणी मातेच्या पायावरील वज्रलेप निघू लागला

vitthal darshan on gudi padwa
पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींच्या सुरक्षेसाठी दोन वर्षांपूर्वी वज्रलेप केला. परंतु, रुक्मिणी मातेच्या चरणांवरील वज्रलेप आताच निघू लागला आहे. २३ व २४ जुलै २०२० रोजी केलेला वज्रलेप सुमारे ८ वर्षे टिकेल, असे सांगितले होते. परंतु रुक्मिणी मातेच्या चरणांवरील वज्रलेप निघाल्याचे दिसून आले. 
 
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सावळ्या विठुरायाच्या मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर वज्रलेप करण्यात आला होता. आतापर्यंत चार वेळा पुरातत्त्व विभागाकडून मूर्तीवर हे विविध प्रकारच्या रसायनांचे लेपन करण्यात आले होते. मात्र, दोन वर्षात रुक्मिणी मातेच्या पायावरील वज्रलेप निघू लागला आहे.
 
कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने दोन वर्षे पदस्पर्श दर्शन पूर्णपणे बंद होते. याच काळात २३ आणि २४ जुलै २०२० रोजी पुरातत्त्व विभागाने विठ्ठल मूर्तीवर आणि रुक्मिणी मातेच्या पायावर सिलिकॉनचा लेप दिला होता. तो ७ ते ८ वर्षे तसाच राहील, असा दावा करण्यात आला होता. परंतु दोन वर्षांनंतर गुढीपाडव्याला पुन्हा श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या पदस्पर्श दर्शनास सुरुवात झाली आणि आता हा धक्कादायक प्रकार समोर आला.