गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. विठ्ठल
Written By

आषाढी एकादशीला सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते

वर्षभरातील एकादशीमध्ये आषाढी एकादशीचे स्वत:च वेगळे स्थान आहे. या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. आषाढ मासाच्या शुक्ल पक्षातील एकादशीला ‘देवशयनी (देवांच्या निद्रेची)’ आणि वद्य पक्षातील एकादशीला ‘कामिका एकादशी’, असे म्हणतात.
 
‘पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले. कुंभ दैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराकडून अमरपद मिळवले. त्यामुळे तो ब्रह्मदेव, विष्णू, शिव अशा सर्व देवांना अजिंक्य झाला. त्याच्या भयाने देव त्रिकूट पर्वतावर धात्री (आवळी) वृक्षातळी एका गुहेत दडून बसले. त्यांना त्या आषाढी एकादशीला उपवास करावा लागला. पर्जन्याच्या धारेत स्नान घडले. अकस्मात त्यांच्या सर्वांच्या 
श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली. त्या शक्तीने गुहेच्या दाराशी टपून बसलेल्या मृदुमान्य दैत्याला ठार मारले. ही जी शक्तीदेवी, तीच एकादशी देवता आहे.
 
आषाढी एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. एकादशीच्या दिवशी सर्व प्राणिमात्रांची सात्त्विकता वाढत असल्याने या दिवशी व्रत केल्याने त्याचा अधिक लाभ होतो. शैव आणि वैष्णव अशा दोन्ही संप्रदायांत एकादशीचे व्रत केले जाते. 
मनुष्याचे एक वर्ष हे देवांचे एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो. आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते, म्हणजेच देवांची रात्र सुरू होते म्हणून आषाढी एकादशीला ‘देवशयनी’ (देवांच्या निद्रेची) एकादशी, असे म्हणतात.