करगिल विजयाला 15 वर्षे पूर्ण, शहिद जवानांना श्रद्धांजली
पाकिस्तानी सैन्याला माघारी पाठवून करगिलच्या उंच शिखरावर भारतीय जवानांनी आजच्या दिवशी तिरंगा फडकवला होता. आज कारगिल विजय दिनाला 15 वर्षे पूर्ण झाले. या निमित्ताने द्रास आणि नवी दिल्लीत शहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. देशाचे संरक्षण मंत्री अरुण जेटली यांच्यासह तिन्ही दलाच्या प्रमुखांनी इंडिया गेटवर अमर जवान ज्योतिवर करगिल युद्धात शहिद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
1999 मध्ये भारताचा पारंपारिक शत्रु पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले होते. पाकिस्तानी जवानांना भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर देत अक्षरश: हाकलून लावले होते. भारतीय जवानांनी जीवाची बाजी लावत 26 जुलै, 1999 रोजी कारगिलच्या उंच शिखरावर तिरंगा फडकवत विजय मिळवला होता. यामुळे आजचा दिवस हा कारगिल दिन म्हणून साजरा केला जातो.
विजय दिवसाच्या निमित्ताने द्रास येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी शहिद जवानांच्या कुटुंबीयांना आमंत्रित करण्यात आले आहे.