गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 23 नोव्हेंबर 2022 (21:48 IST)

अहमदनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भूकंपाची नोंद? जिल्हाधिकारी म्हणाले…

earth-quack
जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये 22 नोव्हेंबर, 2022 रोजी रात्री 09.00 ते 09.30 वा. दरम्यान नागरिकांच्या घरांना हादरा बसल्याबाबत स्थानिक प्रशासनाकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबत भूकंपमापन केंद्र, मेरी, नाशिक येथील अधिका-यांशी जिल्हा प्रशासनाने संपर्क साधला असता भूकंपमापन केंद्रावर भूकंपाची नोंद झाली नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. नागरिकांनी घाबरुन न जाता भूकंपाबाबत अफवा पसरवू नये व अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी केले आहे.
 
भूकंप या आपत्तीच्या अनुषंगाने नागरिकांनी खालीलप्रमाणे दक्षता घेण्याचे आवाहन
भूकंपापूर्वी घ्यावयाची काळजीः-
 भूकंपाची पूर्वसूचना मिळत नाही, त्यामुळे भूकंपाचा धक्का कधीही बसू शकतो असे गृहीत धरून सतत दक्षता घेणे. भूकंप का होतो त्याची कारणे व होणा-या परीणामांबाबत चर्चा करा. घराची नियमित पहाणी करुन दुरुस्ती करणे जरुरीचे आहे, भिंतींना तडे गेले असतील तर ते बुजविणे व भिंतींची मजबुती करणे आवश्यक आहे. लोडबेअरींग घर बांधताना प्रत्येक खोलीच्या चारही कोप-यांचे मजबुतीकरण करण्यासाठी सलोह कॉक्रीट वापरणे व त्याची प्लींथ, लिंटल व रुफ बँडमध्ये सांधणी करणे आवश्यक आहे. आपल्या घरातील, कामाच्या ठिकाणी व सार्वजनिक इमारतींमधील सुरक्षीत बाहेर पडण्याचे मार्ग जाणून व समजून घ्या. अवजड आणि मोठया वस्तु शक्यतो जमिनीलगत ठेवा, उंच जागेवर ठेऊ नका. घरातील कपाटे, अवजड फ्रेम्स भिंतीवर व्यवस्थी लावाव्यात.
 
भूकंपा दरम्यान काय करावे
स्वत: शांत रहा व इतरांना शांत राहण्यास सांगा. जर तुम्ही घरात, इमारतीच्या आत असाल, टेबलाखाली अथवा पलंगाखाली बसून स्वत:चा बचाव करा. कॉलमजवळ, दरवाज्याजवळ, चौकटीखाली उभे राहुन स्वत:चा बचाव करा. लिफ्टचा वापर करु नका. दाराजवळ अथवा प्रवेशद्वाराजवळ गर्दी करु नका. भिंती, आरसे, फर्निचर, कंदील यांचेपासून लांब रहा. शक्यतो चादर, उशी अथवा कपडयाची घडी डोक्यावर घ्या, जेणेकरुन इजा होणार नाही. जर, तुम्ही रस्याकावर असाल तर पटकन मोकळया जागेत जा, घाई गडबड करु नका. रस्याेणच्या कडेने जात असाल तर उंच जुन्या आणि सलग असणा-या इमारतीपासून लांब रहा. भिंती, वीजेच्या तारा आणि अंगावर पडण्याची शक्यता असेल अशा वस्तूंपासुन दूर रहा. जर, तुम्ही गाडी चालवत असाल तर जुन्या इमारती, भिंती, इलेक्ट्रीक वायर, केबल व उंचवटा यापासून आपले वाहन दूर नेऊन थांबवा.
 
भूकंपानंतर काय करावे
शांत रहा, रेडीओ, टिव्हीद्वारे मिळणा-या सूचना काळजीपूर्वक ऐका व त्यांचे पालन करा. भूकंपानंतर अनेक अफवा उठतात उदा. जमिनीला भेगा पडल्या इत्यादी खात्री शिवाय अशा अफवांवर विश्वास ठेऊ नका. अफवा पसरवू नका. भुकंपाच्या मुख्य धक्क्यानंतर छोटे धक्के बसू शकतात. त्यामुळे पाणी, विज, गॅस कनेक्शन सुरु असल्यास बंद ठेवा. काडी ओढू नका. विजेचे बटन लगेचच चालू करु नका, कारण गॅस गळती अथवा शॉर्टसर्कीट होण्याची शक्यता असते. जर काही व्यक्ती जमिनीखाली बदल्या गेल्या असतील तर मदत तुकडीशी संपर्क साधावा. दुषीत, उघडयावरचे पाणी पिणे टाळा, जेणेकरुन रोगांना प्रतिबंध होईल. भुकंपाच्या धक्क्यांमुळे ज्या घरांना,इमारतींना फार मोठे तडे गेले आहेत त्या इमारतींचा राहण्यासाठी वापर करु नये.
 
नागरिकांनी घाबरुन न जाता भूकंपाबाबत अफवा पसरवू नये वा अफवांवर विश्वास ठेवू नये. घरांना हादरा बसल्यास सुरक्षितरित्या घराबाहेर पडावे. जुनाट, मोडकळीस आलेल्या वा दगड मातीचे कच्चे बांधकाम असलेल्या घरात राहणा-या नागरिकांनी विशेषतः दक्षता घेण्याचे आवाहनही प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor