1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 1 ऑगस्ट 2021 (13:56 IST)

धक्कादायक! फक्त 500 रुपयांसाठी तरुणाचा जीव घेतला

औरंगाबाद येथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडल्यामुळे खळबळ माजला आहे.बँकेच्या परीक्षेसाठी आलेल्या एका दिव्यांग तरुणाची फक्त 500 रुपयांसाठी निर्घृण हत्या केली.पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
 
विकास चव्हाण वय वर्ष 23 असे या मयत तरुणाचे नाव आहे.तो अहमदनगरच्या पार्थडीतील हरीचा तांडा येथील रहिवाशी होता.विकासच्या घराची आर्थिक परिस्थिती बेताची आहे.त्याचा भाऊ ऊसतोड मजूर आहे.विकास हा बालपणापासून एका पायाने अधू होता.विकास याला सरकारी अधिकारी होण्याची इच्छा होती.त्याची आई सतत आजारी असायची.विकास मेहनती असून त्याने बँकेच्या परीक्षेसाठी खूप मेहनत केली होती.आणि तो बँकेची परीक्षा देण्यासाठी औरंगाबादला आला होता.एसटीने उतरल्यावर रात्र जास्त झाल्यामुळे एसटी बसस्टॅण्ड वर रात्र काढली आणि पहाटे उठून तो परीक्षेच्या सेंटरवर जाण्यासाठी वाहन शोधत असताना त्याने फिरोजखान नावाच्या या व्यक्तीकडून लिफ्ट घेतली.
 
तुला केंद्रावर सोडतो असं म्हणत फिरोजने त्याला दुचाकीवर बसविले आणि एका कब्रस्तानात नेऊन फिरोजने विकासच्या पोटात धारदार शस्त्राने वार केले. बेसावध असल्याने विकासला काय घडत आहे कळालेच नाही फिरोजने त्याच्या पोटात लागोपाठ वार केल्याने  विकासचा जागीच मृत्यू झाला.एवढेच नव्हे तर फिरोजने विकासच्या जवळ असलेले पाचशे रुपये आणि काही वस्तू घेऊन पळ काढला.
 
सकाळी कब्रस्तानजवळ हत्या झाल्याची  माहिती पोलिसांना काही लोकांनी कळवली.पोलिसांनी घटनेची संपूर्ण चौकशी करत बस स्थानकेवरील सीसीटीव्हीच्या तपासणीत फिरोजच्या दुचाकीवर विकास जाताना आढळला आणि त्याद्वारे पोलीस आरोपी फिरोज पर्यंत पोहोचले आणि त्याला अटक केली.त्याने खून केल्याचे कबूल केले आहे.
 
ही बातमी विकासच्या घरी त्याच्या भावाला कळतातच त्याने हंबरडा फोडला आणि गावातील काही लोकांना घेऊन औरंगाबादला आला.परंतु त्याची परिस्थिती आपल्या मयत भावाच्या मृतदेहाला गावाकडे नेण्याची नसल्याने पोलिसांनी ऍम्ब्युलन्सचा खर्च करून विकासच्या गावी मृतदेह पाठविण्याची व्यवस्था केली.