शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. जैन
  4. »
  5. जैन धर्माविषयी
Written By वेबदुनिया|

जैन मराठी संतकवींमध्ये पुण्यसागर नावाचे दोन कवी आहेत.

डॉ.यू.म.पठाण

१ पहिले पुण्यासागर : यांचा काळ इ.स.१६५४ असून ते लातूर पीठाचे भट्टारक अनंतकीर्ती यांचे शिष्य होते. त्यांनी हरिवंश हा ग्रंथ पूर्ण केला.

२ दुसरे पुण्यासागर : यांचा काळ सतराव्या शतकाचा उत्तरार्ध (इ.स.१६९५) आहे. ते औरंगाबादच्या जैन पीठाचे भट्टारक आनंद सागर यांचे शिष्य होते. त्यांनी गुणकीर्ती या जैन संतकवींच्या पद्मपुराणाचे (म्हणजे जैन रामायणाचे) शेवटचे आठ अध्याय लिहिले. यापूर्वी या महाकाव्याचे केवळ ३६ च अध्याय होते, तो ग्रंथ आपण आपल्या गुरुंच्या आज्ञेवरुन पूर्ण करीत आहोत, असा उल्लेख खुद्द दुसऱ्या पुण्यसागरांनी आपल्या ग्रंथात केला आहे.

महाराष्ट्र ग्रंथ रामायण |
खंडित होता जाण |
गुरु आज्ञा झाली म्हणून |
पूर्ण केला ||

त्यात जैन रामायणातील पुढील विषय आले आहेत:

लव व कुश यांचा जन्म राम व सीता यांची भेट, हनुमंतास दीक्षा प्रदान लव व कुश यांचं निर्वाण आणि रामाचं निर्वाण इ.

दुसऱ्या पुण्यकीर्तीनं गुणकीर्तीचं अपूर्ण 'पद्मपुराण' पूर्ण करण्यासाठी शेवटचे जे आठ अध्याय लिहिले, त्यात औरंगाबादच्या भट्टारक परंपरेची दुर्मिळ माहिती उपलब्ध झाली आहे, ती अशी

भानुकीर्ती - दयाभूषण - विजयकीर्ती - भुवनकीर्ती - आनंदसागर - पुण्यसागर

औरंगाबादच्या भट्टारक परंपरेचा हा मूळातील महत्त्वाचा संदर्भ असा आहे.

श्रीवृषभसेनादि जाण | पट्टावली प्रमाण |
श्रीभट्टारक भानुकीर्तिजाण | शिष्य दयाभूषण ||
तत्परी भट्टारक विजयकीर्ति | भवतारक |
तत्परी भट्टारक | भुवनकीर्ती पै |
रामचरित्र महापुराण | खंडित ग्रंथ होता म्हणून |
आनंदसागर गुरुला स्मरुन | प्रबंध केला ||
पुण्यसागर अज्ञान जती | रामचरित्रें केले अल्पमती |
महाराष्ट्र - भाषा कथा युक्ती | कवित्व केले पै |
(पद्मपुराण, ४४४६-५०)