॥श्रीगणेशाय नमः ॥
	 
	हे कश्यपात्मज वामना । हे बटुरुपधारी नारायणा ।
	तूं बलीच्या घेऊन दाना । कृतार्थ त्याला केलेंस ॥१॥
				  													
						
																							
									  
	 
	राज्य मृत्युलोकीचें । घेतलें त्वां जरी साचें ।
	तरी दिलें पाताळाचें । राज्य बलीकारणें ॥२॥
				  				  
	 
	आंवळा घेऊन नारळ दिला । तुम्ही त्या पुण्यवंत बलीला ।
	आणि त्याच्या भक्तीस्तव झाला । द्वारपाळ द्वारीं तुम्ही ॥३॥
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	 
	या मन्वंतरानंतर । बलीच आहे होणार ।
	देवांचा राजराजेश्वर । देवा तुझ्या वरानें ॥४॥
				  																								
											
									  
	 
	एक घटकेंत अनंता । चहूं वेदांच्या संहिता ।
	पठण केल्या बुद्धिमत्ता । केवढी तुझी अगाध तरी ! ॥५॥
				  																	
									  
	 
	अवघ्यां तुझ्या अवतारीं । हा सोंवळा अवतार श्रीहरी ।
	कोणाचाही भूमीवरी । वध न तुम्ही केलांत ॥६॥
				  																	
									  
	 
	शत्रुमित्राच्या घरीं दिवा । ये अवतारीं लाविला बरवा ।
	देव आणि दानवा । तूं वंद्य सारखाच ॥७॥
				  																	
									  
	 
	देव तेही आनंदविले । राक्षस तेही रक्षिलें ।
	आपलें ईशत्व सांभाळिलें । याच अवतारीं देवा तूं ॥८॥
				  																	
									  
	 
	तुला माझा नमस्कार । असो वामना वारंवार ।
	मस्तकीं ठेवा वरद कर । तुम्ही दासगणूच्या ॥९॥
				  																	
									  
	 
	टिळक बाळ गंगाधर । महाराष्ट्राचा कोहिनूर ।
	दूरदृष्टिचा सागर । राजकारणीं प्रवीण जो ॥१०॥
				  																	
									  
	 
	निज स्वातंत्र्याच्यासाठीं । ज्यानें अनंत केल्या खटपटी ।
	ज्याची धडाडी असे मोठी । काय वर्णन तिचें करुं ? ॥११॥
				  																	
									  
	 
	करारी भीष्मासमान । आर्य महीचें पाहून दैन्य ।
	सतीचे झाला घेतां वाण । भीड न सत्यांत कोणाची ॥१२॥
				  																	
									  
	 
	वाक्चातुर्य जयाचें । बृहस्पतीच्या समान साचें ।
	धाबें दणाणें इंग्रजांचें । पाहून ज्याच्या लेखाला ॥१३॥
				  																	
									  
	 
	कृति करुन मेळविली । ज्यानें लोकमान्य ही पदवी भली ।
	ती न कोणी त्यांना दिली । ऐसा होता बहाद्दर ॥१४॥
				  																	
									  
	 
	तो एके वेळीं अकोल्याला । शिवजयंतीच्या उत्सवाला ।
	लोकाग्रहें येतां झाला । व्याख्यान द्याया कारणें ॥१५॥
				  																	
									  
	 
	झाली तयारी उत्सवाची । त्या अकोल्यामध्यें साची ।
	मोठमोठाल्या विद्वानांची । गेली गडबड उडून ॥१६॥
				  																	
									  
	 
	दामले, कोल्हटकर, खापर्डे । आणखी विद्वान् बडेबडे ।
	जमते झाले रोकडे । तया अकोल्या ग्रामासी ॥१७॥
				  																	
									  
	 
	अध्यक्ष त्या उत्सवाचे । नेमिले होते टिळक साचे ।
	नांव ऐकतां टिळकांचें । वर्हाड सारें आनंदलें ॥१८॥
				  																	
									  
	 
	शिवरायाची जयंती । याच्या आधींच या प्रांतीं ।
	झाली पाहिजे होती । त्याचें कारण ऐसें पहा ॥१९॥
				  																	
									  
	 
	शिवाजीची जन्मदात्री । जी वीरमाता जिजा सती ।
	ती वर्हाडीच आपुली होती । सिंधखेडीं जन्म जिचा ॥२०॥
				  																	
									  
	 
	त्या वीरगाजी शिवाजीला । जिनें पोटीं जन्म दिला ।
	वर्हाडमहाराष्ट्र एक झाला । या सतीच्या कर्तृत्वें ॥२१॥
				  																	
									  
	 
	माता होती वर्हाडी । पिता महाराष्ट्री शहाजी गडी ।
	अवघ्या दंपत्यांत ही जोडी । खचित होती अनुपम ॥२२॥
				  																	
									  
	 
	आधींच उत्सव शिवाजीचा । जो कलिजा महाराष्ट्राचा ।
	आणखी वरी अध्यक्ष त्याचा । टिळक बाळ गंगाधर ॥२३॥
				  																	
									  
	 
	आधीं एक महिना तयारी । उत्सवाची चालली खरी ।
	ज्याच्या त्याच्या अंतरीं । आनंद होत चालला ॥२४॥
				  																	
									  
	 
	अध्यक्ष उपाध्यक्श निवडले । स्वयंसेवक तयार झाले ।
	तईं कईकांचें म्हणणें पडलें । ऐशा रीतिं विबुध हो ॥२५॥
				  																	
									  
	 
	या शिवजयंती उत्सवाला । आणा शेगांवचे महाराजाला ।
	श्रीस्वामी समर्थ गजाननाला । म्हणजे दुधांत साखर पडेल कीं ॥२६॥
				  																	
									  
	 
	शिवाजीच्या राष्ट्रोद्धारा । आशीर्वाद होता खरा ।
	समर्थांचा साजिरा । म्हणून तडीस गेला तो ॥२७॥
				  																	
									  
	 
	टिळकांचें राजकारण । हेंच जिजाई-हृदय-रत्न ।
	त्याला पाहिजे आशीर्वचन । समर्थंचि विबुध हो ॥२८॥
				  																	
									  
	 
	ते कित्येकां पसंत पडलें । कित्येकांस नाहीं रुचलें ।
	ज्यां न रुचले ते बोलले । उघड उघड येणें रीतिं ॥२९॥
				  																	
									  
	 
	तो शेगांवाचा अवलिया । कशास आणितां ये ठायां ।
	तो कांहीं तरी करुनियां । विक्षोभ करील सभेचा ॥३०॥
				  																	
									  
	 
	फिरेल नागवा सभेंत । "गिण गिण गणांत" ऐसा म्हणत ।
	मारील वाटे कदाचित् । तो लोकमान्याला ॥३१॥
				  																	
									  
	 
	कांहीं लोक बोलले । हें न म्हणणें चांगलें ।
	गजाननाचीं पाउलें । लागलीं पाहिजेत सभेला ॥३२॥
				  																	
									  
	 
	त्याचें जें कां वेडेपण । तें आहे वेडयाकारण ।
	जे कोणी विद्वान् सज्जन । त्यासी न वदती वेडयापरी ॥३३॥
				  																	
									  
	 
	खरेखुरे राष्ट्रोद्धारक । जरी टिळक असतील एक ।
	तरी महाराज निःशंक । सभेसी येतील ये ठायां ॥३४॥
				  																	
									  
	 
	खर्याखोटयाची परीक्षा । साधूच हे करिती देखा ।
	म्हणून सांगतों भिऊं नका । त्यांना आमंत्रण देण्यास ॥३५॥
				  																	
									  
	 
	ऐसी भवति न भवति झाली । मंडळी शेगांवास आली ।
	आमंत्रण तें द्याया भली । सभेचें श्रीगजानन ॥३६॥
				  																	
									  
	 
	येतांच दादा खापडर्यासी । बोलते झाले पुण्यराशी ।
	आम्ही येऊं सभेसी । तुमच्या शिवाजी उत्सवाच्या ॥३७॥
				  																	
									  
	 
	वेडयापरी न तेथें करुं । जागींच बसून मौन धरुं ।
	सुधारकांचा कधीं न करुं । मनोभंग मनाचा ॥३८॥
				  																	
									  
	 
	करावयासी राष्ट्रोद्धार । योग्य बाळ गंगाधर ।
	याच्या परी न होणार । राष्ट्रप्रेमी पुरुष पुढें ॥३९॥
				  																	
									  
	 
	स्नेही त्या टिळकाचा । अण्णा पटवर्धन नांवाचा ।
	शिष्य नरसिंहसरस्वतीचा । आळंदीचा असे जो ॥४०॥
				  																	
									  
	 
	त्या दोघां पुरुषां पाहाण्यास । आम्ही येऊं अकोल्यास ।
	तें ऐकतां खापर्डयास । अती आनंद जाहला ॥४१॥
				  																	
									  
	 
	पाहा पाहा कोल्हटकरा । वर्हाडप्रांताचा ज्ञानहिरा ।
	यानें वृत्तान्त जाणिला सारा । जो का झाला अकोल्यांत ॥४२॥
				  																	
									  
	 
	यावरुन संतांचें । ज्ञान केवढें अगाध साचें ।
	खर्या राष्ट्रपुरुषाचें । प्रेम यांना पाहा किती ! ॥४३॥
				  																	
									  
	 
	बोलावयाची आपणांस । जरुर पडली कांहीं न खास ।
	तेच होऊन आपणांस । येतो म्हणून म्हणाले ॥४४॥
				  																	
									  
	 
	मुहूर्त या उत्सवाला । अती उत्तम लागला ।
	चला वंदून समर्थाला । आपण जाऊं अकोल्यास ॥४५॥
				  																	
									  
	 
	खापर्डे कोल्हटकर । निघून गेले साचार ।
	आला आठ दिवसांवर । सभेचा तो दिवस पाहा ॥४६॥
				  																	
									  
	 
	वर्हाड सारें आनंदलें । ज्यांना त्यांना वाटलें ।
	कधीं टिळकांचीं पाउलें । पाहूं आम्ही अकोल्यांत ॥४७॥
				  																	
									  
	 
	शके अठराशें तिसासी । ती सभा होती वैशाखमासीं ।
	वर्हाडप्रांतीं अकोल्यासी । उभारिलेल्या मंडपांत ॥४८॥
				  																	
									  
	 
	सण अक्षय्यतृतीयेचा । वर्हाडप्रांतीं महत्त्वाचा ।
	परी समुदाय जनांचा । मिळता झाला प्रचंड ॥४९॥
				  																	
									  
	 
	तोच अखेरीचा दिन । त्या सभेचा होता जाण ।
	लोक आले लांबलांबून । लोकमान्यांसी पहावया ॥५०॥
				  																	
									  
	 
	शिवाय श्रोते त्या दिवशीं । महाराज येणार सभेसी ।
	ऐसी खबर लोकांसी । आधींच होती विबुध हो ॥५१॥
				  																	
									  
	 
	मंडप चिकार भरुन गेला । जो तो पाहूं लागला ।
	म्हणती कां हो सभेला । अजूनी न आले महाराज ॥५२॥
				  																	
									  
	 
	परी ते सभा भरण्याआधीं । येऊन बसले मंडपामधीं ।
	साधु आपल्या वाणीस कधीं । असत्यता न येऊं दे ॥५३॥
				  																	
									  
	 
	सभेमाजीं उच्च स्थानीं । बसले होते कैवल्यदानी ।
	गादीस लोडा टेकूनी । जीवनमुक्त साधुवर ॥५४॥
				  																	
									  
	 
	सिंहासनाच्या अग्रभागा । टिळकास दिली होती जागा ।
	त्यांच्या सन्निध बसले बघा । अण्णासाहेब पटवर्धन ॥५५॥
				  																	
									  
	 
	श्रीकृष्णाचा नंदन । गणेश ज्याचें नामाभिधान ।
	खापर्डे कुलाचा कुलभूषण । एक्या बाजूस टिळकाच्या ॥५६॥
				  																	
									  
	 
	दामले कोल्हटकर त्या ठायीं । भावे व्यकंटराव देसाई ।
	सभेचे पुढारी पाही । चमकत होते ते ठायां ॥५७॥
				  																	
									  
	 
	आणिक व्याख्याते विद्वानेतर । बसले होते सभोंवार ।
	त्यांचें वर्णन कोठवर । करावें मी एक्या मुखें ॥५८॥
				  																	
									  
	 
	सभेलागीं आरंभ झाला । हेतु प्रथम निवेदिला ।
	मग व्याख्यानसिंह उठला । टिळक बोलावयातें ॥५९॥
				  																	
									  
	 
	"दिवस आजचा धन्य धन्य । आहे पहा हो सज्जन ।
	स्वातंत्र्यासाठीं ज्यानें प्राण । खर्चिले आपुले पूर्वकालीं ॥६०॥
				  																	
									  
	 
	त्या धनुर्धर योध्याची । वीर गाजी शिवाजीची ।
	जन्म-जयंति आहे साची । म्हणून आपण मिळालों ॥६१॥
				  																	
									  
	 
	त्या रणगाजी शिवाजीला । रामदासें हातीं धरिला ।
	म्हणून त्याचा बोलबाला । झाला भरतखंडामध्यें ॥६२॥
				  																	
									  
	 
	तेवींच आज येथें झालें । आशिर्वाद द्याया आले ।
	श्रीगजानन साधु भले । आपुलीया सभेस ॥६३॥
				  																	
									  
	 
	म्हणून शिवाजीचे परी । सभा यशस्वी होवो खरी ।
	अशाच सभेची जरुरी । आहे सांप्रत राष्ट्राला ॥६४॥
				  																	
									  
	 
	स्वातंत्र्यसूर्य मावळला । दास्यत्वाचा काळोख पडला ।
	स्वातंत्र्य नाहीं जगीं ज्याला । तो समाज प्रेतवत् ॥६५॥
				  																	
									  
	 
	यासाठीं म्हणून । आहे करणें प्रयत्न ।
	ज्या शिक्षणेंकरुन । राष्ट्रप्रेम वाढेल हो ॥६६॥
				  																	
									  
	 
	ऐसें शिक्षण पुढिल्यांप्रती । देणें भाग निश्चिती ।
	तें शिक्षण हा भूपती । देईल कां हो अर्भकांला ?" ॥६७॥
				  																	
									  
	 
	ऐसें टिळक म्हणाले । महाराज आसनीं उठून बसले ।
	गर्जून त्रिवार बोलले । नाहीं नाहीं ऐसें पहा ॥६८॥
				  																	
									  
	 
	आवेशाच्या भरांत । बोलले गंगाधरसुत ।
	जें बोलणें किंचित् । टोचून होतें राजाला ॥६९॥
				  																	
									  
	 
	त्या भाषणाचा रोख भला । समर्थांनीं जाणिला ।
	आणि हांसत हांसत शब्द केला । ऐशा रीतिं श्रोते हो ॥७०॥
				  																	
									  
	 
	अरे अशानेंच पडतात । काढण्या दोन्ही दंडांप्रत ।
	ऐसें बोलून गणगणांत । भजन करुं लागले ॥७१॥
				  																	
									  
	 
	सभा निर्विघ्न पार पडली । टिळकांची वाहवा झाली ।
	खरें झालें त्याच सालीं । समर्थांचें भाकित ॥७२॥
				  																	
									  
	 
	भूपतीनें टिळकाला । एकशें चोवीसाखालीं धरिला ।
	दोर्या पडल्या दंडाला । आला प्रसंग शिक्षेचा ॥७३॥
				  																	
									  
	 
	राजसत्तेचिया पुढें । कोणाचेंही न चाले घोडें ।
	वकील होते बडे बडे । ते झटूं लागले टिळकास्तव ॥७४॥
				  																	
									  
	 
	प्रेमी मंडळी टिळकांची । जी कां होती जिव्हाळ्याची ।
	त्यांनीं पारमार्थिक उपायाची । केली योजना एक अशी ॥७५॥
				  																	
									  
	 
	दादासाहेब खापर्डे । हेही होते गृहस्थ बडे ।
	ते उमरावतीहून मुंबईकडे । जाऊं लागले खटल्यास्तव ॥७६॥
				  																	
									  
	 
	अकोल्याच्या स्टेशनावरी । कोल्हटकरास मधुरोत्तरीं ।
	बोलते झाले ऐशापरी । तें थोडकें सांगतों ॥७७॥
				  																	
									  
	 
	तुम्ही जावें शेगांवासी । समर्था विनंती करा ऐसी ।
	सोडवा बाळ टिळकासी । प्रसंग मोठा दुर्धर ॥७८॥
				  																	
									  
	 
	मीच गेलों असतों तेथें । परी मी जातों मुंबईतें ।
	तुम्ही जाऊन शेगांवातें । विनंती करा महाराजा ॥७९॥
				  																	
									  
	 
	लगेंच बसला गाडींत । कोल्हटकर टिळक-भक्त ।
	येतां झाला शेगांवांत । स्वामी गजाननाकडे ॥८०॥
				  																	
									  
	 
	तईं महाराज मठातें । निज आसनीं निजून होते ।
	तीन दिवस जहाले पुरते । परी न उठले यत्किंचित् ॥८१॥
				  																	
									  
	 
	कोल्हटकरहि तोंवरी । बसला मठाभीतरीं ।
	जो का असेल बिगारी । तो न ऐसें वागे कदा ॥८२॥
				  																	
									  
	 
	कळकळ टिळकाविषयींची । कोल्हटकरा पूर्ण साची ।
	कमाल त्यानें चिकाटीची । केली असे आपुल्या ॥८३॥
				  																	
									  
	 
	जाळावांचून नाहीं कड । मायेवांचून नाहीं रड ।
	ऐसी आहे एक जाड । म्हण मराठी भाषेमध्यें ॥८४॥
				  																	
									  
	 
	चवथें दिवशीं समर्थ उठले । कोल्हटकरास बोलते झाले ।
	तुम्ही अलोट प्रयत्न केले । परी न फळ येईल त्या ॥८५॥
				  																	
									  
	 
	अरे छत्रपती शिवाजीला । रामदासाचा वशिला ।
	होता परी तो कैद झाला । बादशाही अमंलांत ॥८६॥
				  																	
									  
	 
	सज्जनास त्रास झाल्याविना । राज्यक्रांति होईना ।
	कंसाचा तो मनीं आणा । इतिहास म्हणजे कळेल ॥८७॥
				  																	
									  
	 
	ही मी देतों भाकर । ती खाऊं घाला लवकर ।
	टिळकांप्रती अंतर । यांत कांहीं करुं नका ॥८८॥
				  																	
									  
	 
	या भाकरीच्या बळावरी । तो मोठी करील कामगिरी ।
	जातो जरी फार दूरी । परी न त्याला इलाज ॥८९॥
				  																	
									  
	 
	ऐसें ऐकतां उत्तर । साशंक झाले कोल्हटकर ।
	समर्था करुन नमस्कार । भाकर करीं घेतली ॥९०॥
				  																	
									  
	 
	ती नेऊन मुंबईला । घातली टिळकास खायाला ।
	वृत्तान्त तोही कथन केला । अथपासून इतिवरी ॥९१॥
				  																	
									  
	 
	तो ऐकून लोकांप्रत । टिळक बोलले हंसत हंसत ।
	स्वामींचें तें अगाध सत्य । ज्ञान आहे खचित पहा ॥९२॥
				  																	
									  
	 
	यश तुमच्या प्रयत्नासी । नाहीं निश्चयेंसी ।
	आपुली बाजू रक्षण्यासी । सरकार न्याया पाळीन ना ॥९३॥
				  																	
									  
	 
	जेव्हां स्वार्थाचा संबंध नसतो । तेव्हां न्याय आठवतो ।
	हा जगाचा सिद्धान्त तो । होईल खोटा कोठूनी ? ॥९४॥
				  																	
									  
	 
	माझ्या हातें कामगिरी । मोठी होणार आहे खरी ।
	ऐशी समर्थांची वैखरी । बोलली हें गूढ एक ॥९५॥
				  																	
									  
	 
	भूत भविष्य वर्तमान । जाणताती साधुजन ।
	आपण मनुष्य सामान्य । पाहूं पुढें काय होतें ॥९६॥
				  																	
									  
	 
	प्रसाद म्हणून भाकरी । ती कुसकरुन भक्षिली खरी ।
	दंत न मुखाभीतरीं । परी प्रसाद टाकवेना ॥९७॥
				  																	
									  
	 
	झाली शिक्षा टिळकास । नेलें ब्रह्मदेशीं मंडाल्यास ।
	तेथें जन्मला गीतारहस्य । गीतेवरील ग्रंथ त्यांचा ॥९८॥
				  																	
									  
	 
	हीच मोठी कामगिरी । झाली त्यांच्या हस्तें खरी ।
	मान जगत्-गुरुपरी । मिळता झाला टिळकांतें ॥९९॥
				  																	
									  
	 
	या गीताशास्त्रावर । टीका झाल्या अपार ।
	त्या सांगूं तरी कोठवर ? । मति नाहीं दासातें ॥१००॥
				  																	
									  
	 
	बुध हो प्रत्येक आचार्यांनीं । कालमानातें पाहूनी ।
	केली गीतेची मांडणी । जगदोद्धार करावया ॥१॥
				  																	
									  
	 
	कोणीं लाविली अद्वैतपर । कोणीं लाविली द्वैतपर ।
	कोणीं लाविली कर्मपर । त्याच एका गीतेला ॥२॥
				  																	
									  
	 
	हीच मोठी कामगिरी । त्यांच्या हस्तें झाली खरी ।
	या कामाची नये सरी । कोणत्याही कृत्यातें ॥३॥
				  																	
									  
	 
	येणेंच बाळ गंगाधर । जगतीं होतील अजरामर ।
	कीर्ति त्यांची दूरवर । पसरवील ग्रंथ हा ॥४॥
				  																	
									  
	 
	स्वातंत्र्य जरी मिळविलें असतें । तरी न ऐशी कीर्ति टिकते ।
	पहा करुन चित्तातें । पूर्णपणें विचार ॥५॥
				  																	
									  
	 
	त्यांत फारसें नाहीं सार । तो व्यवहार लौकिकीं ॥६॥
	 
	गीताशास्त्राचें तसें नाहीं । तें मोक्षपदा प्रती देई ।
				  																	
									  
	आणि समाजाची बसवी पाही । विस्कळीत घडी हें ॥७॥
	 
	यावच्चंद्रदिवाकर । पुरुष बाळ गंगाधर ।
				  																	
									  
	चिरंजीव निरंतर । राहील कीर्तिरुपानें ॥८॥
	 
	असो करवीर कोल्हापुरीचा । द्विज चित्पावन जातीचा ।
				  																	
									  
	श्रीधर गोविंद नांवाचा । काळे उपनांव जयाचें ॥९॥
	 
	तो गरिबीच्या स्थितींत । गेला इंग्रजी शाळेंत ।
				  																	
									  
	आंग्लविद्या शिकण्याप्रत । मँट्रिक परीक्षा पास झाला ॥११०॥
	 
	पुढें काँलेजांत गेला । परी इन्टर नापास झाला ।
				  																	
									  
	म्हणून फिरत राहिला । वर्तमानपत्रें वाचीत ॥११॥
	 
	तों केसरी पत्रांत । वाचलें ओयामा टोगो चरित्र ।
				  																	
									  
	तेणें त्याच्या मनांत । वृत्ति एक उठली अशी ॥१२॥
	 
	आपण जावें विलायतेला । यंत्रविद्या ही शिकण्याला ।
				  																	
									  
	उगे भार भूमीला । होण्यामाजीं अर्थ काय ? ॥१३॥
	 
	टोगो यामा दोघेजण । प्रथमतः ज्ञान संपादून ।
				  																	
									  
	अभ्युदयाकारण । जपान आणीते जहाले ॥१४॥
	 
	तैसें आपण करावें । मायभूमीस उद्धरावें ।
				  																	
									  
	ऐसा विचार त्याच्या जीवें । घेतला परी इलाज ना ॥१५॥
	 
	द्रव्याची न लागे संगत । कोणीही ना करी मदत ।
				  																	
									  
	घरची गरीबी अत्यंत । काय करितो बिचारा ॥१६॥
	 
	तो आपल्या मित्रासी । आला भेटण्या भंडार्यासी ।
				  																	
									  
	जो मन्रो हायस्कुलासी । होता एक शिक्षक ॥१७॥
	 
	त्यासी विचार आपुला । श्रीधरानें कळविला ।
				  																	
									  
	तोही त्याला पसंत पडला । परी पैशाची वाट काय ? ॥१८॥
	 
	मित्रा, एक पैशाविणें । कांहीं नाहीं जगीं होणें ।
				  																	
									  
	दरिद्रयानें मनींच करणें । मनोराज्य बापा रे ॥१९॥
	 
	चाल जाऊं गांवाला । आपुल्या जन्मभूमीला ।
				  																	
									  
	त्या करवीर कोल्हापुराला । इकडे उन्हाळा विशेष ॥१२०॥
	 
	दोघे बसले गाडींत । समर्थांची ऐकून कीर्त ।
				  																	
									  
	उतरते झाले शेगांवांत । साधु कैसा तो पहावया ॥२१॥
	 
	पोस्टमास्तराच्या दारीं । सामान ठेविलें सत्वरीं ।
				  																	
									  
	आतुरता मोठी अंतरीं । समर्थाला पहाण्याची ॥२२॥
	 
	दोघे आले मठांत । समर्थां केलें दंडवत ।
				  																	
									  
	बसते झाले जोडून हात । स्वामीचिया सन्मुख ॥२३॥
	 
	मनोदय श्रीधराचा । समर्थांनीं जाणिला साचा ।
				  																	
									  
	म्हणाले उगीच परदेशाचा । विचार वेडया करुं नको ॥२४॥
	 
	अवघेंच कांहीं आहे येथ । अर्थ ना भौतिक शास्त्रांत ।
				  																	
									  
	सेवी अध्यात्मविद्येप्रत । म्हणजे कृतार्थ होशील तूं ॥२५॥
	 
	त्यायोगें विचारक्रांति । श्रीधराच्या झाली चित्तीं ।
				  																	
									  
	कोल्हापूरची एक व्यक्ती । आठवली या समयास त्या ॥२६॥
	 
	ते स्वामी कुंभारगल्लीचे । होते कोल्हापुरीचे ।
				  																	
									  
	बोलणें याच परीचें । होतें हमेशा भक्तांसी ॥२७॥
	 
	तैसेच हेही गुरुमूर्ती । भक्तांसवें भाषण करिती ।
				  																	
									  
	याचा उलगडा चित्तीं । कांहींच माझ्या होईना ॥२८॥
	 
	ऐसें श्रीधर आणितां मनीं । महाराज वदले गर्जोनी ।
				  																	
									  
	हिंदुस्थाना सोडूनी । उगाच कोठें जाऊं नको ॥२९॥
	 
	अगणित करावें पुण्य । तेव्हांच होतें येथें जनन ।
				  																	
									  
	या भौतिक शास्त्राहून । योगशास्त्र समर्थ असें ॥१३०॥
	 
	तें योगशास्त्र येतें ज्याला । तो न मानी या भौतिकाला ।
				  																	
									  
	योगशास्त्राहून भला । अध्यात्मविचार श्रेष्ठ असे ॥३१॥
	 
	तो जमल्यास करुन पाही । कोठें न आतां जाई येई ।
				  																	
									  
	ऐसें समर्थ बोलतां पाही । श्रीधर चित्तीं आनंदला ॥३२॥
	 
	पश्चिमेचा मावळला । तोंच पूर्वेकडे आला ।
				  																	
									  
	विचार-सूर्य त्याचा भला । श्रीधरा सुखी करण्यास ॥३३॥
	 
	एक संतावांचून । विचाराचें परिवर्तन ।
				  																	
									  
	कोणी न करुं शके आन । सत्य एक त्यांनाच कळे ॥३४॥
	 
	महाराज म्हणाले या ठायीं । तुझा अभ्युदय होईल पाही ।
				  																	
									  
	कांता वाट पहाते गेहीं । तुझी कोल्हापुराला ॥३५॥
	 
	जा आतां मित्रांसहित । आपुल्या कोल्हापुराप्रत ।
				  																	
									  
	तेंच पुढें झालें सत्य । श्रीधर लौकिका चढले हो ॥३६॥
	 
	श्रीधर बी.ए.एम्.ए. झाले । प्रिन्सिपाँल त्या नेमिलें ।
				  																	
									  
	शिवपुरीं काँलेजाशीं भले । सिंद्याचिया राज्यांत ॥३७॥
	 
	संत साक्षात् ईश्वर । चालते बोलते भूमीवर ।
				  																	
									  
	त्यांच्या कृपेचा आधार । जया मिळे तोच मोठा ॥३८॥
	 
	पहा काळे श्रीधराला । दर्शनाचा योग आला ।
				  																	
									  
	म्हणून वृत्तींत फरक पडला । खरें तेंच शोधावया ॥३९॥
	 
	हें पीक संतांचें । याच देशीं यावयाचें ।
				  																	
									  
	वृक्ष नंदनवनीचें । अन्य ठायीं न येती हो ॥१४०॥
	 
	स्वस्ति श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ ।
				  																	
									  
	दावो सर्वदा सत्पथ । परम भाविकांकारणें ॥१४१॥
	 
	शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥