शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: गुरूवार, 3 जून 2021 (12:07 IST)

पुण्यतिथी विशेष : लोकनायक गोपीनाथ मुंडे

गोपीनाथ पांडुरंग मुंडे भारतीय राजकारणी होते. गोपीनाथ मुंडे हे मूळचे मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामधील परळी तालुक्याच्या नाथ्रा गावचे होते. १२ डिसेंबर, इ.स. २०१० रोजी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या समारंभात भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी त्यांचा गौरव लोकनेता (लोकनायक) असा केला होता.
 
लोकसम्पर्क, अन्यायाविरुद्ध संघर्षाची नुसतीच तयारी नव्हे तर जिद्द, नवा विचार, नवे तंत्रज्ञान एकूणच जे नवे चांगले ते हवे, असा उत्साह असलेल्या गोपीनाथ मुण्डे या तरुणाने भाजपला जनमानसात स्थान मिळवून दिले आणि विशेषतः उपेक्षित-शोषित वर्गात एक विश्वास निर्माण केला, असे समजले जाते. त्यांना राजकारणातील अनपेक्षितपणा, अपयश आणि जीवघेणी स्पर्धा याचा सामना करावा लागला.
 
ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य असून त्यांनी इ.स.१९८० पासून इ.स.२००९ पर्यंत महाराष्ट्राच्या विधानसभेत परळी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले तसेच इ.स.२००९ पासून इ.स.२०१४ पर्यंत भारताच्या लोकसभेत बीड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच भारतीय जनता पक्षाचे (भाजप) लोकसभेतील उपनेते होते (इ.स. २०१२). १४ मार्च इ.स. १९९५ ते इ.स. १९९९ या काळात ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री होते.
 
भाजपचे सभेला गर्दी खेचणारे वक्ते व जनतेचा पाठिंबा असलेले महाराष्ट्र राज्यातील नेते म्हणून त्यांची ओळख होती. ते महाराष्ट्राचे माजी आमदार व महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे राजकीय नेते होते. महाराष्ट्राच्या राजकारणात ते एक प्रबळ राजकीय पुढारी समजले जातात. त्यांना भाजपमधील भूमिगत स्तराला काम करणारा नेता असे म्हटले जाते. राष्ट्रीय पातळीवरही भाजपमध्ये नेते म्हणून गोपीनाथ मुंडेची ओळख होती. मुंडेसोबत महाराष्ट्र राज्यातील भाजप आमदारांची मोठी फळी होती.
 
प्रमोद महाजन व गोपीनाथ मुण्डे या भाजपच्या बिनीच्या शिलेदारांनी तब्बल २५ वर्षांपूर्वी बीड या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातूनच निवडणूक प्रचाराला प्रारंभ केला होता. मुण्डे-महाजन या दोघांनी झंझावाती प्रचाराने उभा महाराष्ट्र ढवळून काढला होता. आधी जनसंघ आणि नंतर भाजपचा प्रचार करताना या दोघांनी पक्षाची पाळेमुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात घट्ट रूजविली होती. मुण्डे-महाजन जोडगोळीने मराठवाडा, विदर्भ आणि पश्‍चिम महाराष्ट्र अक्षरश: पिंजून काढला होता. 
 
राज्याच्या राजकारणात त्यांनी मराठवाडा आणि बीड जिल्ह्याला अधिक प्राधान्य दिले आहे. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर चळवळीत ते सक्रिय सहभागी झाले होते. त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. 
 
१९७८मध्ये गोपीनाथ मुण्डे यांनी पहिल्यांदा अम्बाजोगाई तालुक्यातील उजनी गटातून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नशीब आजमावले. १९८0मध्ये ते पहिल्यांदा रेणापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर १९९0 आणि १९९५मध्येदेखील याच मतदारसंघातून ते निवडून आले.१९८0 ते ८२ दरम्यान भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपद, व त्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पद भूषविले. राज्यात युतीची सत्ता असताना त्यांची उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लागली. तर २00९मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. मुण्डे सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पहिल्याच प्रयत्नात इ.स. १९७८ च्या बीड जिल्हापरिषदेची निवडणुकीत ते रेणापूर (उजनी) मतदारसंघातून राज्यभरात सर्वाधिक मताधिक्य घेऊन निवडून आले.
 
जनसंघ ते भाजप अशी प्रमोद महाजन यांच्याबरोबरीने गोपीनाथ मुण्डेंची वाटचाल झाली. बीड मतदारसंघात मोटरसायकलवरून गोपीनाथजींनी भाजपसाठी प्रचार केला. खांद्यावर शबनम आणि मोटरसायकल अशी गोपीनाथ मुण्डेंची ओळख बनली होती. 
 
वयाच्या ३५ व्या वर्षी इ.स. १९८० मध्ये भारतीय जनता युवा मोर्च्याच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांचे काम विस्तारत होते. पुढे इ.स. १९८२ मध्ये ते महाराष्ट्र भाजपचे सरचिटणीस झाले.  इ.स. १९८५ मध्ये झालेल्या बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीत पराभव झाला. मुण्डे पुन्हा एकदा सचिव झाले. इ.स. १९८० साली बीड जिल्ह्यातील गेवराई मतदारसंघातून मुण्डे यांनी विधानसभेत प्रवेश केला. परंतु इ.स. १९८५ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुण्डे यांना गेवराई मतदारसंघातच कॉंग्रेसचे पण्डितराव दौण्ड यांनी अष्टरंगी सामन्यात पराभूत केले. इ.स. १९८५ मधील ही हार वगळता मुण्डे यांच्यावर निवडणुकीच्या आखाड्यात धूळ खाण्याचा प्रसंग आला नाही. क्षामध्ये ज्येष्ठ व अनुभवी नेत्यांची संख्या मोठी असूनही दोन पिढ्यांना मागे सारत तरुण गोपीनाथजींची इ.स. १९८६ साली प्रदेशाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आणि येथूनच भाजपच्या वाटचालीला वेगळे वळण मिळाले.
 
इ.स. १९८७ मध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महाराष्ट्रात कर्जमुक्ती मोर्चा काढून शासनास ‘कर्जमुक्ती’ करण्यास भाग पाडले. हा भाजपचा इतिहासातील सर्वात मोठा मोर्चा मानला जातो. समाजातील अनेक आन्दोलने गोपीनाथजीनी हातात घेतली आणि यातूनच पक्षाचा विस्तार सातत्याने होत गेला.
 
इ.स. १९९२ ते इ.स. १९९५ या कालावधीत मुण्डेंनी विधानसभेतील प्रमुख विरोधी पक्षनेतेपद सांभाळले. फेब्रुवारी-मार्च इ.स. १९९५ साली जे राजकीय परिवर्तन झाले त्यामध्ये गोपीनाथ मुण्डे यांनी राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाच्या विरोधात राज्यभर काढलेली संघर्षयात्रेचा सिंहाचा वाटा होता. याच काळात त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोप-यात दौरे केले आणि शेतकरी, शेतमजूर यांना पक्षाच्या जवळ आणले. अवघ्या चाळीशीत, प्रभावशाली ग्रामीण नेता हा ठसा त्यांनी उमटवला.१९९०च्या दशकांत मुण्डे यांनी दाखवलेला झुंजारपणा हा इ.स. १९९५ साली भाजप आणि शिवसेना युतीची सत्ता येण्यात सिंहाचा वाटा बनला. विधानसभेच्या इ.स. १९९५ मध्ये झालेल्या निवडणुकांत मुण्डेंनी भाजपला अभूतपूर्व यश मिळवून दिले. 
 
सत्तेवर आलेल्या भाजप–सेनेच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले व राज्याचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून गोपीनाथ मुण्डे यांचा १४ मार्च इ.स. १९९५ रोजी शपथविधी झाला. इ.स. १९९५ ते इ.स. १९९९ या कालखण्डांदरम्यान ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते.
 
इ.स.२००९ च्या ऑक्टोबर महिन्यातील निवडणूक त्यांनी बीड लोकसभा मतदारसंघातून लढवली. बीड लोकसभा मतदारसंघातून म्हणून निवडून येताना भाजपचे आमदार गोपीनाथ मुण्डे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रमेश कोकाटे यांना १ लाख ४० हजार ९५२ मतांनी पराभव केला होता. भाजपने खासदार गोपीनाथ मुण्डे यांची महाराष्ट्राचे भाजप प्रभारी म्हणून नेमणूक ११ जूलै, इ.स. २००९ रोजी केली.
 
आपल्या ३५ वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत अनेक चढउतार अनुभवलेल्या या नेत्याने राजकारणात आपले स्वतःचे असे विशेष स्थान निर्माण केले आहे. 3 जून 2014 चा दिवस उजाडला तोच भाजपसाठी अशुभ बातमी घेऊन. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे दिल्लीवरून मुंबईला जाण्यासाठी विमानतळाकडे निघाले होते. मुंडेचं दिल्लीतील शासकीय निवासस्थान आणि विमानतळ हा अवघा अर्ध्या तासाचा प्रवास. पण तेवढ्या वेळात होत्याचं नव्हतं झालं आणि गाडीला झालेल्या अपघातात गोपीनाथ मुंडे यांना आपले प्राण गमवावे लागले.