1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 25 डिसेंबर 2023 (09:08 IST)

मुंबईला ड्रग्जच्या विळख्यातून पूर्णपणे बाहेर काढण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

devendra fadnavis
मुंबई : आपली पुढची पिढी सुरक्षित ठेवायची असेल तर आपल्याला ड्रग्ज विरोधात मोठा लढा लढावा लागेल. आपल्याला मुंबईला ड्रग्जच्या विळख्यातून पूर्णपणे बाहेर काढायचे आहे. म्हणूनच ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ करण्याचे आपले सर्वांचे एकच लक्ष आहे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना केले.
 
मुंबई पोलीस आणि सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन यांच्यावतीने शनिवारी रात्री वांद्रे कुर्ला संकुल येथील जीओ कन्व्हेंशन सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘उमंग २०२३’ या सांस्कृतिक कार्यक्रमात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. या कार्यक्रमास मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, चित्रपट क्षेत्रातील कलाकार, संगीतकार, दिग्दर्शक आदी मान्यवर उपस्थित होते.
 
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला सुरक्षित ठेवण्याचे  कार्य आपणाकडून होत आहे. मुंबई शहर सर्वात सुरक्षित शहर ही ओळख करून देण्याचे काम मुंबई पोलीस करतात. मुंबई पोलीस आणि त्यांच्या परिवारासाठी चित्रपट क्षेत्रातील कलावंत वर्षातून एकदा उमंग या सांस्कृतिक कार्यक्रमातून मनोरंजन करतात, याबद्दल सर्व कलाकारांचे त्यांनी आभार मानले.
 
मुंबईला ड्रग्जच्या विळख्यातून पूर्णपणे बाहेर काढायचे आहे. आपल्याला ड्रग्ज विरोधात लढा लढावा लागेल. मुंबई पोलिसांनी हा लढा सुरू केला आहे. तो आपल्याला जिंकायचा आहे आणि त्याकरीता तुमची सर्वांची मदत, श्रम आवश्यक आहेत असे सांगून तुम्ही हे निश्चित करून दाखवाल, असा विश्वास उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला. पोलीस आमच्यासाठी अहोरात्र काम करतात, त्यांच्यासाठी ज्या ज्या गोष्टी करता येतील ती प्रत्येक गोष्ट करण्याकरिता शासन नेहमीच अग्रेसर राहील, असे त्यांनी यावेळी सांगितले.