आम्हाला युद्ध नको, शांतता हवी
जम्मू- भारत आणि पाकिस्तान यांच्यातील असंयमी कृतीने काश्मीर खोर्यातील जनता होरपळली जाते, त्यामुळे दोन्ही राष्ट्रांनी संयम राखावा, असा सल्ला जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी दिला.
भारतीय लष्कराने गुरुवारी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सहा ते सात दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईनंतर मेहबूबा यांनी दोन्ही देशांनी चर्चेतून मार्ग काढावा असे म्हटले आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे काश्मीरच्या नुकसानामध्ये आणखी भर पडेल, अशी प्रतिक्रिया मेहबूबा यांनी दिली.
काश्मीर खोर्यातील जनता हिंसाचाराने हैराण असून त्यांना शांतता हवी आहे. त्यामुळे दोन्ही देशांनी युद्धजन्य परिस्थिती टाळून शांतीचा मार्ग स्वीकारावा असे त्या म्हणाल्या. काश्मीर खोर्यातील जनतेसाठी दोन्ही देशातील राजकीय पक्ष सकारात्मक विचार करतील, असा विश्वासही मेहबूबा यांनी यावेळी व्यक्त केला.