1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 9 फेब्रुवारी 2022 (23:20 IST)

नरेंद्र मोदी : ED, CBI आणि मुलाखतीतले 10 मुद्दे

ईडी आणि सीबीआय त्यांचं काम करत असतात. मध्येच निवडणुका येतात, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. निवडणुकीच्या काळात ईडी आणि सीबीआयचे छापे पडतात या विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना मोदींनी हे म्हटलं आहे.
 
गुरुवारी उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यातलं मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. पश्चिम उत्तर प्रदेशातल्या 58 जागांवर गुरुवारी यूपीमध्ये मतदान होणार आहे.
 
अनेक हिंदी वृत्तवाहिन्यांवरून ही मुलाखत लाईव्ह दाखवण्यात आली. यावेळी मोदींनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे.
 
मोदींच्या मुलखतीत प्रमुख मुद्दे

1. 'यूपीत भाजपलाच निवडतील'
आम्हाला 2014, 2017 आणि 2019 अशा 3 वेळा उत्तर प्रदेशच्या लोकांनी मत दिलं. त्यामुळे याही वेळी देतील.
आम्ही विजय आणि पराभव दोन्ही पाहिले आहेत. आमचं नातं जमिनीशी आहे. विजयाचा उन्माद होऊ नये, याची आम्ही काळजी घेतो. आम्ही पराभवातही आशा शोधतो. आम्ही निराश न होता विचार करतो. आम्ही अभ्यास करतो आणि पुढची रणनीती आखतो. प्रत्येक निवडणुकीतून आम्ही शिकतो. निवडणूक आमच्यासाठी मुक्त विद्यापीठ आहे.
योगींच्या योजना एवढ्या अद्भुत आहे की अशक्याला त्यांनी शक्य करून दाखवलं आहे. म्हणून विरोधक त्यावर टीका करत आहे. हे योगींचं खरं तर श्रेय आहे.
विरोधकांनी गुजरातचे दोन गाढव असा आमचा उल्लेख केला होता. उप्रच्या लोकांनी त्यांना उत्तर दिलं.

2. 'गुंडाराज संपवंल'
सपाचं सरकार असताना गुंडांचं राज्य होतं. गुंडांना सरकारमध्ये प्रतिष्ठा आणि आश्रय मिळत असे. आज परिस्थिती बदलली आहे. आज मुली रात्री घराबाहेर पडू शकतात.
यूपीत सरकार पारदर्शक पद्धतीने काम करत आहे. जर एन्काउंटर्स होत असते तर कोर्टाने दखल घेतली असती. PIL करणाऱ्या जमातीने मुद्दा उपस्थित केला असता. कोर्ट्सही आपल्या देशात अनेकदा सजग असतात.
देशाच्या विकासासाठी प्रादेशिक महत्त्वाक्षांचा विचार जरूर व्हावा. मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो त्यामुळे मला हे ठाऊक आहे. मी जगातल्या मोठ्या नेत्यांना देशातल्या अनेक ठिकाणी नेलं. विविधतेत एकतेचा आम्ही आदर करतो. काही लोक विविधतेच्या नावाखाली दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. आम्ही एकता वाढवण्याचा प्रयत्न करतो.

3. केवळ एक राज्य केंद्राला जुमानत नाही
राष्ट्रात एक भाग विकसित झाला आणि दुसरा मागे पडला तर राष्ट्र पुढे जाऊ शकत नाही. सर्वांचा विकास आवश्यक आहे. देशातील केवळ एक राज्य केंद्राला जुमानत नाही.
आम्ही सबका साथ सबका विकास या उक्तीवर विश्वास ठेवतो. माध्यमं केवळ एकाच संप्रदायामधल्या जातींचा उल्लेख करतात. पण दुसऱ्या संप्रदायांमधल्या जातींचा उल्लेख करत नाहीत. गुजरातमध्ये मुस्लिमांमध्ये 70 जाती आहेत, पण त्याबद्दल कुणी बोलत नाही.

4. माध्यमांवर टीका
आज जगात भारताने एक स्थान मिळवलं आहे. आणि ते माध्यमांपेक्षा मोठं आहे. आज माध्यमं अशी का वागतात, याबद्दल मी बोलत नाही. त्यांच्या स्पर्धा आहे, ही त्यांची मजबुरी. पण हे सगळं असूनही आमचं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचलं.

5. 'तर मी समाजवादी'
मी गरिबांसाठी काम करतो. जर कुणी याला समाजवाद म्हणत असेल तर मी समाजवादी आहे. जे स्वतःला समाजवादी म्हणतात ते परिवारवादी आहेत. सपात एकाच कुटुंबातले 45 लोक पदाधिकारी होते. हा परिवारवाद लोकशाहीला धोका आहे.

6. 'ED आणि CBI काम करताना मध्येच निवडणुका येतात'
जर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेतल्या तर खर्च वाचेल. मग मध्ये ईडी आणि सीबीआयही येणार नाही. ते त्यांचं काम करत असतात. मध्येच निवडणुका येतात.

7. 'काही राज्यांनी लॉकडाऊन सुरू केलं'
लॉकडाऊन झालं तेव्हा WHO सांगत होतं की जे जिथे आहेत त्यांनी तिथेच रहावं. गडबडीत काही राज्यांनी लॉकडाऊन सुरू केलं. स्थिती सुधारण्यासाठी केंद्राला लॉकडाऊन लावावं लागलं. काँग्रेस पार्टीने महाराष्ट्रात लोकांना तिकिटं देऊन पाठवलं. आप सरकारने दिल्लीत तेच केलं. त्यांनी भीती निर्माण केली.

8. शेतकरी माझ्यावर खूष
छोट्या शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जातात. दलालांना पैसे द्यावे लागत नाहीत. त्यामुळे छोटे शेतकरी आमच्यावर खुश आहेत.

9. पंजाबप्रकरणी मौन
पंजाबमध्ये माझी गाडी थांबवावी लागली, त्या प्रकरणी मी मौन बाळगलं आहे. कारण सुप्रीम कोर्टाची चौकशी सुरू आहे. सत्य पुढे येईल. आपण तोवर वाट पाहायला हवी.

10. राहुल गांधींवर टीका
मुळात मला हल्ला करण्याची भाषा मला येत नाही किंवा माझा स्वभावही तसा नाही. पण तर्क आणि तथ्यांच्या आधारे सभागृहात मी काही बोललो तर, त्याचा माध्यमांत हल्ला असा शब्द म्हणून वापर होत असेल, पण आम्ही हल्ला करत नाही तर संवाद करतो. वादविवादही होतो मी अगदी हसत ते स्वीकारतो.
मी प्रत्येक विषय तथ्याच्या आधारे मांडला आहे. काही विषयांवर आमच्या परराष्ट्र मंत्रालयानं सविस्तर माहिती दिली आहे तर काही विषयांवर संरक्षण मंत्रालयानं सविस्तर माहिती दिली आहे. तर काही विषयांवर गरज असेल तिथं मीही माहिती दिली आहे. पण जे ऐकतच नाही, जे सभागृहात बसतच नाही, त्यांच्या प्रतिक्रियेला मी काय उत्तर देऊ.