जीवंत ठेवल्याबद्दल देवाचे आभार
उत्तरांचलमध्ये पूर आणि दरडी कोसळल्याने हजारो लोक बेघर झाले आहेत, अनेकांचे प्राण गेले आहेत. या संकटातून सहिसलामत सुटका झाल्याबद्दल क्रिकेटर हरभजन सिंगने देवाचे आभार मानले आहेत.भज्जी हेमकुंड साहेब गुरुद्वाराकडे निघाला होता परंतु त्याची यात्रा मधेच रोखण्यात आली.इंडो-तिबेटियन सुरक्षा दलाने त्याला सुरक्षित स्थळी आणले.भज्जी म्हणाला, बाबजीच्या आदेशानुसार सारे घडते. ते जेव्हा बोलावतील तेव्हा मी पुन्हा जाईन. मी देवाकडे जीवनासाठी आशीर्वाद मागणार नाही परंतु जिवंत ठेवल्याबद्दल कृतज्ञ आहे. हरभजन जोशीमठमध्ये राहिला होता. लष्करासमवेत अधिकारी आणि जवान अथक परिश्रम घेत आहेत त्याबद्दल त्यांचे भज्जीने कौतुक केले. भज्जी म्हणाला, जोशीमठमध्ये मी अनेकांशी बोललो. बहुतेकांनी आपले कुटुंबिय गमावले आहेत किंवा आजवरची कमाई गमावली आहे. त्यांच्या दु:खात सहभागी होण्याचा प्रयत्न केला.ज्यांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो, असे भज्जी म्हणाला.