1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 फेब्रुवारी 2022 (10:56 IST)

दिल्लीतून 2024 नंतर मोठा फंड आणता येईल - आदित्य ठाकरेंचं सूचक वक्तव्यं

विकासासाठी निधी हा अत्यंत गरजेचा असतो. दिल्लीतूनही निधी मिळणं गरजेचं असतं. 2024 नंतर शिवसेना खासदारही दिल्लीतून मोठा निधी मिळवू शकतील, असं म्हणत शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भविष्याबाबत संकेत दिले आहेत.

डोंबिवलीमध्ये आदित्य ठाकरेंच्या हस्ते विविध कामांचं उद्घाटन झालं, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर मात्र वेगवेगळे अंदाज बांधून राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे.
 
डोंबिवली-कल्याण शहराकडे विशेष लक्ष असल्याचं सांगताना ते मुंबई ही आई आणि कल्याण डोंबिवली मावशी आहे, त्यामुळं याकडे दुर्लक्ष करून चालणार नसल्याचं म्हटलं.

संजय राऊत यांनी सोमय्यांवर केलेल्या आरोपांबाबतही त्यांना प्रतिक्रिया दिली आहे. राऊत यांनी आता मॅच सुरू केली आहे, आता त्यांची पुढची बॅटिंग पाहू, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
 
गडकरींचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नागपूर-अजनी वन प्रकल्पाला माझा वैयक्तिक नव्हे तर पर्यावरणवाद्यांचा विरोध आहे. त्यामुळं येथील वन वाचवण्यासाठी सध्या विचार सुरू असल्याचं ते म्हणाले.