गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 30 जून 2022 (17:21 IST)

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस देणार बाहेरून पाठिंबा

devendra fadnavis eaknath shinde
श्री एकनाथ शिंदे यांना भाजपा समर्थन देतील आणि ते मुख्यमंत्री होतील. साडेसात वाजता त्यांचा शपथविधी होतील. नंतर इतर मंत्री शपथ घेतील, असं म्हणत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली.
 
आज राजभवनावर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांची भेट घेतली. राजभवनावर राज्यपालांशी भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी अनपेक्षितपणे एकनाथ शिंदे यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली.
 
मी स्वतः नसेन, बाहेरून एकनाथ शिंदेंना पाठिंबा देईल असंही देवेंद्र यांनी म्हटलं.
 
मनाचा मोठेपणा दाखवत देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना जो पाठिंबा दिला त्यामुळे त्यांचे आभार मानतो, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
 
एकनाथ शिंदे यांनी या घोषणेनंतर बोलताना म्हटलं, "मी खऱ्या अर्थाने आज आम्ही जो निर्णय दिला तो राज्याचा विकास घेऊन आम्ही पुढे निघालो आहोत. शिवसेना पक्ष म्हणून जे काही आमदार आहे, जवळपास 50 आमदार आम्ही एकत्र आहोत. एक वैचारिक भूमिका, एक राज्याचा विकास आणि जे काही अडीच वर्षापूर्वी घडलं ते आपल्याला माहिती आहे."
 
'बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं'
पन्नास आमदार वेगळी भूमिका घेतात याचा अर्थ, याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज होती, असं म्हणत एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंविरोधातली नाराजी बोलून दाखवली.
 
"आमदारांनी मला समस्या सांगितल्या. आम्ही त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला पण यश मिळालं नाही, त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला. त्या निर्णयाबरोबर फडणवीस साहेबांनी जो निर्णय घेतला त्यांच्याकडे 120 चं संख्याबळ आहे. मात्र मनाचा मोठेपणा दाखवत त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना जो पाठिंबा दिला त्यामुळे त्यांचे आभार," असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं.
 
"ही एक ऐतिहासिक घटना आहे. जे घडलंय ते वास्तव आपल्यासमोर आहे. जी काही अपेक्षा आपल्यासमोर आहे. ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही दिवसरात्र एक करू. ते मंत्रिमंडळात नसले तरी ते राज्याच्या विकासासाठी आमच्यासोबत आहे. आजच्या राजकारणात काय मिळेल ही अपेक्षा असते. पण ही उदारता दुर्मिळ आहे," असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं होतं.
 
देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं?
फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं की, सर्वांना कल्पना आहे की 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 170 लोक निवडून आले होते. साहजिकच ही अपेक्षा होती की भाजपा शिवसेना युतीचं सरकार येईल तेव्हा पंतप्रधानांनी युतीचा मुख्यमंत्री होईल अशी घोषणा केली होती.
 
"निकाल आल्यानंतर शिवसेनेने वेगळा निर्णय घेतला. विशेषत: बाळासाहेब ठाकरेंनी ज्यांचा विरोध केला त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर युती केली हा जनादेशाचा अपमान होता," असंही त्यांनी म्हटलं.
 
फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांनी बुधवारी (29 जून) घेतलेल्या कॅबिनेट बैठकीवरही टीका केली. जोपर्यंत विश्वासमत होत नाही तोपर्यंत कॅबिनेट घ्यायची नाही हा संकेत आहे. तरी ते घेतले, असं त्यांनी म्हटलं.
 
सरकार पडलं तर पर्यायी सरकार देऊ असं आम्ही सांगायचो. म्हणून एकनाथ शिंदेंचा गट, भाजपाचा गट, अपक्षांचा आणखी एक छोटा गट एकत्र येत आहेत. त्यांचं पत्र आम्ही दिलं आहे, असं देवेंद्र यांनी म्हटलं.
 
शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल फेसबुक लाईव्ह करून आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं होतं. यानंतर भाजपकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींनी वेग पकडला होता.
 
दुसरीकडे, बुधवारी (29 जून) रात्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी आमदार गुवाहाटीतून गोव्यात दाखल झाले. खरं तर आज बहुमत चाचणीसाठी ते मुंबईत दाखल होणार होते. पण सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राजकीय चित्र बदललं आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला.
 
यानंतर आज एकनाथ शिंदे मुंबईत दाखल झाले आहेत. दाखल होताच भाजपच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली.