1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 10 फेब्रुवारी 2021 (21:56 IST)

राज्यपाल १२ जागांसाठी न्यायालयात जाऊ देण्याची वेळ येऊ देणार नाहीत : अजित पवार

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी विधान परिषेदच्या १२ जागांसाठी न्यायालयात जाऊ देण्याची वेळ येऊ देणार नाहीत, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे. नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांच्या वार्षिक योजना आढावा घेण्यात आली. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.  
 
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “बहुमत असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी सर्व निकष पाळत योग्य त्या नावांची शिफारस केली आहे. सरकारने कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन नियमात बसणारे १२ जणांची नावं निश्चित केली आहेत. राज्यपालांना रीतसर सगळं कळवलेलं आहे. राज्यपाल त्यांची भूमिका जाहीर करतील. न्यायालयात जाऊ देण्याची वेळ येऊ देणार नाहीत,” असं म्हणत अजित पवारांनी सूचक इशारा दिला आहे.
 
दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून पंतप्रधान मोदींना टोला लगावला. “केंद्र सरकारनं दोन पावलं मागं यावं. पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्वीच्या आठवणींना उजाळा देताना भावूक झाले. तोच भावूकपणा शेतकऱ्यांच्या बाबतीत दाखवला तर बरं होईल, असं म्हणत अजित पवारांनी मोदींना टोला लगावला आहे. 
 
मुंबई लोकल सेवासंबंधी विचारलेल्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मुंबई लोकल वेळ बदलाचा निर्णय टप्या टप्याने होणार आहे. यावर राज्य सरकार केंद्र सरकारच्या सूचनेनुसार काम करत आहे असे सांगितले. 
 
केंद्रीय अर्थसंकल्पात नाशिक आणि नागपूरच्या मेट्रो सेवेसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. त्यात राज्य सरकारचा देखील वाटा असणार आहे. या मेट्रो करीता राज्य सरकार आपला वाटा नक्कीच देईल असे त्यांनी सांगितले.