1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 1 नोव्हेंबर 2021 (09:00 IST)

'वानखेडे कुटुंबाला बदनाम करण्याचं षड्यंत्र थांबवा'-रामदास आठवले

समीर वानखेडे कार्यक्षम अधिकारी आहेत. नवाब मलिक यांनी त्यांच्यावर आरोप करून त्यांना बदनाम करू नये. वानखेडे कुटुंबीयांना बदनाम करण्याचं षड्यंत्र थांबवा, असं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
 
नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी 31 ऑक्टोबर रोजी रामदास आठवले यांची भेट घेतली. त्यानंतर रामदास आठवले माध्यमांशी बोलत होते.
 
ते म्हणाले, "नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्स प्रकरणात अटक केल्यामुळेच मलिक यांनी समीर वानखेडे यांच्याविरोधात मोर्चा वळवला आहे. समीर वानखेडे यांच्या वडिलांचं नाव ज्ञानदेव वानखेडे आहे. ते मुस्लीम कधीच नव्हते. त्यांनी मुस्लिम महिलेशी लग्न केलं. त्यांनी सर्व कागदपत्रं आम्हाला दाखवली आहेत. मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावरील आरोप थांबवावेत."
 
ते पुढे म्हणाले, "मुख्यमंत्र्यांनी क्रांती रेडकर यांना वेळ देऊन त्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे. ती त्यांची नैतिक जबाबदारी आहे. महाविकास सरकार आल्यापासून विरोधी पक्षाला कुणी विचारत नाही."
 
तर अभिनेत्री क्रांती रेडकर यावेळी म्हणाल्या, "कोणाचा नवरा कोण आहे, तो हिंदू आहे की मुस्लीम, याविषयी नवाब मलिक यांना करायचं आहे? ते ड्रग्जविषयी बोलत आहेत काय? समीर वानखेडेंच्या खासगी आयुष्याविषयी तुम्हाला सगळ्यांना काय करायचं आहे? नवाब मलिक यांचे जावई समीर खानकडे किती ड्रग्ज मिळालं हे मात्र कुणीच विचारत नाही."
 
या पत्रकार परिषदेत समीर वानखेडेंच्या वडिलांनी त्यांचं आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जमिनीची कागदपत्रं इत्यादी दाखवून आपण ज्ञानदेव कचरूजी वानखेडे असून कुठल्याही प्रकारचं धर्मांतर केलं नसल्याचं म्हटलं आहे.
 
दरम्यान, रामदास आठवले यांच्या या आरोंपावर नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर देताना म्हटलं की, "रामदास आठवले हे वानखेडे कुटुंबाच्या सोबत उभे राहिले आहेत. एखाद्या दलित व्यक्तीचा हक्क एखाद्यानं हिरावून घेतला असेल आणि दलित नेता त्याला पाठिंबा देत असेल, तर याशिवाय दुसरं दुर्दैव असू शकत नाही."