गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 13 मार्च 2021 (16:40 IST)

माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून जबाबदारी हाताळलेल्या यशवंत सिन्हा यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर सिन्हा नाराज झाले होते. या नाराजीतूनच त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता.
सिन्हा यांचे चिरंजीव जयंत सिन्हा अजूनही भाजपमध्येच आहेत. झारखंडमधल्या हजारीबाग मतदारसंघाचे ते खासदार आहेत. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांना मंत्रीपदही देण्यात आलं होतं. मात्र असलं तरी यशवंत सिन्हा सातत्याने पंतप्रधान मोदींवर टीका करत आहेत.
 
यशवंत सिन्हा 1960मध्ये आयएएससाठी निवडले गेले. देशभरातून त्यांचा बारावा क्रमांक आला होता. आरा आणि पटणा याठिकाणी काम केल्यानंतर त्यांची संथाल परगण्यात डेप्युटी कमिशनर म्हणून नियुक्ती झाली.
 
यशवंत यांनी 2009 मध्ये निवडणूक जिंकली. 2014मध्ये त्यांना तिकीट देण्यात आलं नाही. तेव्हापासून नरेंद्र मोदी आणि त्यांच्यातलं अंतर वाढत गेलं. 2018मध्ये पक्षासाठी 21वर्ष काम केल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला.
त्यावेळी यशवंत सिन्हा म्हणाले होते, नरेंद्र मोदी यांच्या नावाचा पंतप्रधानसाठी विचार होईल याची मी कल्पना केली होती. मात्र2014 निवडणुका येईपर्यंत त्यांच्याबरोबर काम करता येणार नाही हे माझ्या लक्षात आलं. त्यामुळे मीच निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला.
 
यशवंत सिन्हा यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी नव्हती. आयएएस अर्थात प्रशासकीय अधिकारी म्हणून 24 वर्ष काम केल्यानंतर त्यांनी 1984मध्ये राजकारणात प्रवेश केला. 1990मध्ये ते चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अर्थमंत्री होते.
 
अर्थशास्त्र किंवा अर्थकारण यामध्ये विशेष आवड नसल्याचं खुद्द यशवंत यांनीच प्रांजळपणे सांगितलं होतं. कन्फेशन्स ऑफ अ स्वदेशी रिफॉर्मर या पुस्तकात यशवंत यांनी लिहिलं होतं की त्यांनी बारावीपर्यंत अर्थशास्त्राचा अभ्यास केला होता.