शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गजानन महाराज शेगाव
Written By
Last Updated : बुधवार, 20 एप्रिल 2022 (14:17 IST)

श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय १९

Shri Gajanan Maharaj Vijay Granth
॥ श्रीगणेशाय नमः ॥
 
जयजयाजी आनंदकंदा । जयजयादि अभेदा ।
माझें नमन तुझ्या पदा । असो सर्वदा अनन्यभावें ॥१॥
 
हे राघवा रघुपती । पाव आतां शीघ्र गती ।
माझा अंत पहाशी किती ? । हें कांहीं कळेना ॥२॥
 
खर्‍या थोरांशी कठोरता । नाहीं शोभत अनंता ।
याचा विचार कांहीं चित्ता । करा आपुल्या ये काळीं ॥३॥
 
मी दीनवाणें मारितों हांका । मला दगा देऊं नका ।
हे जगदीशा जगन्नायका । पावा दासगणूस ॥४॥
 
महाराज असतां शेगांवांत । विप्र एक काशिनाथ ।
जो खंडेरावाचा होय सुत । गर्दे उपनांव जयाचें ॥५॥
 
तो आला दर्शना । समर्थांच्या वंदिले चरणां ।
मूर्ति पाहून त्याच्या मना । आनंद झाला अतिशय ॥६॥
 
माझ्या सन्माननीय वडिलानें । जीं जीवन्मुक्‍ताचीं लक्षणें ।
लिहिलीं अनुभवानें । त्याची प्रत्यक्ष मूर्ति ही ॥७॥
 
माझें भाग्य धन्य धन्य । म्हणून हें पाहण्या चरण ।
आलों खामगांवाहून । त्याचें सार्थक झालें कीं ॥८॥
 
तों समर्थांनीं लीला केली । कोपरखिळी मारिली ।
काशीनाथाच्या पाठीस भली । आपुल्या परमकृपेनें ॥९॥
 
जा तुझा हेत पुरला । वाट पाहे तारवाला ।
या भाषणें घोंटाळला । काशिनाथ मानसीं ॥१०॥
 
म्हणे काम ना माझें ये ठाईं । मी न आलों मागण्या कांहीं ।
तारवाला शिपाई । वाट पहातो काय हें ? ॥११॥
 
त्याचें गूध कळेना । पुसण्या छाती होईना ।
निमुटपणें वंदून चरणा । गेला निघून खामगांवीं ॥१२॥
 
तों तारवाला शिपाई । उभा दारांत होता पाही ।
तार घेतली घाई घाई । कशाची ती बघण्यास ॥१३॥
 
तारेंत हा मजकूर । तुमचा केला तक्‍रुर ।
मुनसफीच्या हुद्दयावर । मोर्शी तालुक्याकारणें ॥१४॥
 
तें पाहतां आनंदला । कोपरखिळीचा अर्थ कळला ।
त्या काशिनाथ पंताला । पहा संतांचें ज्ञान कैसें ? ॥१५॥
 
असो एकदां नागपुरीं । समर्थांची गेली स्वारी ।
गोपाळ बुटीचीया घरीं । त्याच्या अति आग्रहानें ॥१६॥
 
ही भोसल्याची राजधानी । पूर्वकालीं होती जाणी ।
त्या शहराची आज दिनीं । दैना झाली विबुध हो ॥१७॥
 
स्वातंत्र्यरुपी प्राण गेला । खरा धनी याचक ठरला ।
परक्यांचा बोलबाला । झाला जया शहरांत ॥१८॥
 
गज घोडे पालख्या अपार । नाहींशा झाल्या साचार ।
रस्त्यानें फिरे मोटार । अति जोरानें विबुध हो ॥१९॥
 
असो हा महिमा काळाचा । नाहीं दोष कवणाचा ।
वाडा गोपाळ बुटीचा । होता सिताबर्डीवर ॥२०॥
 
त्या भव्य सदनांत । नेऊन ठेविले सद्‌गुरुनाथ ।
जैसा वाघ किल्ल्यांत । कोंडोनिया टाकावा ॥२१॥
 
बुटीचा ऐसा विचार । या सिताबर्डीवर ।
महाराज ठेवावे निरंतर । जाऊं न द्यावें शेगांवा ॥२२॥
 
अक्रूरानें कृष्णाला । जैसा मथुरेमाजीं नेला ।
तोच प्रकार येथें झाला । काय वर्णन करावें ? ॥२३॥
 
शेगांव पडलें भणभणीत । अवघे लोक दुःखित ।
विनविती हरी पाटलाप्रत । महाराज येथें आणा हो ॥२४॥
 
कुडीमधून गेला प्राण । कोण पुसे तिजलागून ? ।
तैसें समर्थांवांचून । शेगांव हें प्रेत पहा ॥२५॥
 
तुम्ही गांवचे जमेदार । करा याचा विचार ।
बुटी मोठा सावकार । तेथें न आमुचा लाग लागे ॥२६॥
 
टक्कर हत्तीहत्तींची । होणें आहे योग्य साची ।
येथें आम्हांसम कोल्ह्याची । नाहीं मुळीं किंमत॥२७॥
 
जंबुमाळीसी लढायाला । मारुती हाच योग्य ठरला ।
जिंकावया कर्णाला । झाली योजना अर्जुनाची ॥२८॥
 
तुम्हीं नागपुराप्रती जावें । समर्थांसी घेऊन यावें ।
आम्हां अवघ्यांस सुखवावें । हीच आहे विनंति ॥२९॥
 
इकडे बुटीच्या घरांत । आजुर्दे राहिले संत ।
जेवीं हस्तिनापुरांत । कृष्ण नाहीं आनंदला ॥३०॥
 
महाराज म्हणती बुटीसी । जाऊं दे मज शेगांवासी ।
या आपुल्या भव्य सदनासी । ठेवून आम्हां घेऊं नको ॥३१॥
 
तें बुटी मुळींच मानीना । समर्था जाऊं देईना ।
अनागोंदीचा रामराणा । बुटी वाटे निःसंशय ॥३२॥
 
बुटी भाविक होता जरी । अहंता नव्हती गेली खरी ।
श्रीमंतीचा गर्व भारी । त्याच्या ठाईं वसतसे ॥३३॥
 
रोज ब्राह्मणभोजन । समर्थांपुढें सदा भजन ।
परी शेगांवचे येत जन । बंदी त्या तो करीतसे ॥३४॥
 
जाऊं न देई दर्शना । शेगांवचे लोकांना ।
बिगरपरवानगी श्रीमंतसदना । जातां नये कवणासी ॥३५॥
 
शेगांवचे लोक भले । जरी आणावया गेले ।
परी न कांहीं उपाय चाले । गेले तसेच आले परत ॥३६॥
 
इकडे भक्त पाटील हरी । कांहीं मंडळी बरोबरी ।
घेऊन निघाला नागपुरीं । समर्थासी आणावया ॥३७॥
 
बसला अग्निरथांत । त्याच वेळीं वदले संत ।
त्या गोपाळबुटीप्रत । येणें रीतीं तें ऐका ॥३८॥
 
अरे गोपाळा पाटील हरी । निघाला यावया नागपुरीं ।
तो येण्याच्या आंत परी । मला येथून जाऊं दे ॥३९॥
 
तो येथें आल्यावर । शांतता नाहीं राहणार ।
तो पडला जमेदार । याचा विचार करावा ॥४०॥
 
तुझ्या धनाच्या जोरावरी । उडया या जाण निर्धारी ।
तो मनगटाच्या बळावरी । नेईल मजला येथून ॥४१॥
 
हरी पाटील तेथें आला । शिपायानें अटकाव केला ।
परी तो न त्यानें मानिला । प्रवेश केला सदनांत ॥४२॥
 
गोपाळ बुटीचिया घरीं । पंगत होती थोर खरी ।
पाटील आल्याच्या अवसरीं । आले ब्राह्मण भोजना ॥४३॥
 
ताटें चांदीचीं अवघ्यांस । शिसमचे पाट बसण्यास ।
होत्या पातळ पदार्थांस । वाटया जवळ चांदीच्या ॥४४॥
 
नानाविध पक्वान्नें । होतीं भोजनाकारणें ।
मध्यभागीं आसन त्यानें । मांडिलें समर्थ बसण्यास ॥४५॥
 
ऐशी बुटीची श्रीमंती । तिचें वर्णन करुं किती ? ।
ज्याला कुबेर बोलती । लोक नागपूर प्रांतींचा ॥४६॥
 
असो हरी पाटील सदनांत । आले समर्था नेण्याप्रत ।
तो महाराज निघाले धांवत । द्वारीं त्यास भेटावया ॥४७॥
 
वांसरा गाय पाहून । जैसी येई धांवून ।
तैसें स्वामी गजानन । पाटलासाठीं धांवले ॥४८॥
 
चाल हरी शेगांवासी । येथें मुळीं न राहणें मसी ।
तूं आलास न्यावयासी । हें फार बरें झालें ॥४९॥
 
समर्थ जाऊं लागले । तें गोपाळानें पाहिलें ।
अनन्यभावें चरण धरिले । समर्थाचे येऊन ॥५०॥
 
विक्षेप माझा गुरुराया ! । नका करुं या समया ।
दोन घांस घेऊनियां । इच्छित स्थला मग जावें ॥५१॥
 
तैसेंच बुटी पाटलासी । बोलूं लागले विनयेंसी ।
तुम्ही घेऊन प्रसादासी । जावें हेंच मागणें ॥५२॥
 
येथें न रहाती महाराज । हें समजून आलें आज ।
पंक्तींत माझी राखा लाज । तुम्हीच पाटील येधवां ॥५३॥
 
आतांच समर्थ गेले जरी । लोक उपाशी उठतील तरी ।
आणि अवघ्या नागपुरीं । टीका माझी होईल पहा ॥५४॥
 
भोजनें होईपर्यंत । महाराज राहिले तेथ ।
शेगांवची समस्त । मंडळी पंक्तीस जेवली ॥५५॥
 
भोजनोत्तर तयारी । निघण्याची ती झाली खरी ।
दर्शनाची भीड भारी । झाली बुटीच्या वाडयांत ॥५६॥
 
कुटुंब गोपाळ बुटीचें । जानकाबाई नांवाचें ।
परम भाविक होते साचें । गृहलक्ष्मीच होती जी ॥५७॥
 
तिनें केली विनवणी । महाराजांचे चरणीं ।
माझा हेतु मनींच्या मनीं । बसूं पहातो गुरुराया ! ॥५८॥
 
तईं महाराज बोलले । तुझ्या मना मीं जाणीतलें ।
ऐसें म्हणून लाविलें । कुंकूं तिच्या कपाळास ॥५९॥
 
आणखी एक पुत्र तुला । परम सद्‌गुणी होईल भला ।
अंतीं जाशील वैकुंठाला । सौभाग्यासह बाळे ! तूं ॥६०॥
 
ऐसा आशीर्वाद देऊन । निघते झाले दयाघन ।
त्या सिताबर्डीहून । आले रघूजीच्या घरीं ॥६१॥
 
हा भोसला राजा रघूजी । उदार मनाचा भक्त गाजी ।
ज्यानें ठेविला राम राजी । आपुल्या शुद्ध वर्तनें ॥६२॥
 
त्याचें लौकीकीं राज्य गेलें । जें अशाश्वत होतें भलें ।
शाश्वत स्वरुपाचें आलें । सद्‌गुरुभक्तीचें राज्य घरा ॥६३॥
 
उत्तम प्रकारचा आदर । केला राजानें साचार ।
त्याचा घेऊन पाहुणचार । रामटेकासी गेले पुढें ॥६४॥
 
तेथें रामाचें दर्शन । घेऊन आले परतून ।
शेगांवच्या मठा जाण । हरीपाटलासमवेत ॥६५॥
 
धार-कल्याणचे रंगनाथ । जे थोर साधु मोंगलाईंत ।
होते ते भेटण्याप्रत । समर्था आले शेगांवीं ॥६६॥
 
अध्यात्माचीं बोलणीं । सांकेतिक केलीं दोघांनीं ।
त्याचा भावार्थ जाणण्या कोणी । तेथें नव्हता समर्थ ॥६७॥
 
श्रीवासुदेवानंद सरस्वती । कर्ममार्गी ज्याची प्रीति ।
कृष्णातटाका ज्याची महती । माणगांवीं जन्म ज्यांचा ॥६८॥
 
ते येण्याचे अगोदर । बाळाभाऊस साचार ।
बोलते झाले गुरुवर । स्वामी गजानन सिद्ध योगी ॥६९॥
 
अरे बाळा उदयिक । माझा बंधु येतो एक ।
मजलागीं भेटण्या देख । त्याचा आदर करावा ॥७०॥
 
तो आहे कर्मठ भारी । म्हणून उद्यां पथांतरीं ।
चिंध्या न पडूं द्या निर्धारी । अंगण स्वच्छ ठेवा रे ॥७१॥
 
चिंधी कोठें पडेल जरी । तो कोपेल निर्धारी।
जमदग्नीची आहे दुसरी । प्रतिमा त्या स्वामीची ॥७२॥
 
तो कर्‍हाडा ब्राह्मण । शुचिर्भूत ज्ञानसंपन्न ।
हें त्याचें कर्मठपण । कवचापरी समजावें ॥७३॥
 
ऐसें बाळास आदलें दिवशीं । सांगते झाले पुण्यराशी ।
तों एक प्रहर दिवसासी । स्वामी पातले ते ठायां ॥७४॥
 
एकमेकांसी पाहतां । दोघे हंसले तत्त्वतां ।
हर्ष उभयतांच्या चित्ता । झाला होता अनिवार ॥७५॥
 
एक कर्माचा सागर । एक योगयोगेश्वर ।
एक मोगरा सुंदर । एक तरु गुलाबाचा ॥७६॥
 
एक गंगाभागीरथी । एक गोदा निश्चिती ।
एक साक्षात् पशुपती । एक शेषशायी नारायण ॥७७॥
 
स्वामी जेव्हां मठांत आले । तेव्हां गजानन होते बैसले ।
आपल्या पलंगावरी भले । चिटक्या करानें वाजवीत ॥७८॥
 
स्वामी येतां चिटकी थांबलि । दृष्टादृष्ट दोघां झाली ।
तैं स्वामींनीं विचारिली । आज्ञा परत जावया ॥७९॥
 
फार बरें म्हणून । गजाननें तुकविली मान ।
स्वामी गेले निघून । बाळास कौतुक वाटलें ॥८०॥
 
बाळा म्हणे गुरुराया । हें दृश्य पाहूनियां ।
संशय उपजला चित्ता ठायां । त्याची निवृत्ति करा हो ॥८१॥
 
त्याचा मार्ग अगदीं भिन्न । तुमच्या ह्या मार्गाहून ।
ऐसें साच असून । तुमचा बंधु कसा तो ? ॥८२॥
 
ऐसा प्रश्न ऐकिला । समर्थ देती उत्तर त्याला ।
बरवा प्रश्न बाळा केला । त्वां हा आज आम्हांतें ॥८३॥
 
ईश्वराकडे जाण्याचे । तीन मार्ग असती साचे ।
हे तिन्ही मार्ग ज्ञानाचे । गांवा जाऊन मिळतात ॥८४॥
 
स्वरुपें त्यांचीं भिन्न भिन्न । दिसतीं पाहणारांकारण ।
तेणें घोटाळा वरितें मन । पाहाणारांचें राजसा ! ॥८५॥
 
सोंवळें ओंवळें संध्यास्नान । व्रत उपोषणें अनुष्ठान ।
या कृत्यांलागून । अंगें म्हणावीं कर्माचीं ॥८६॥
 
हीं अंगें जो आचरी । निरालसपणें खरीं ।
तोच समजावा भूवरी । ब्रह्मवेत्ता कर्मठ ॥८७॥
 
अधिक न्यून येथें होतां । कर्ममार्ग न ये हातां ।
म्हणून विशेष तत्परता । ठेविली पाहिजे आचरणीं ॥८८॥
 
येथें एवढीच खबरदारी । घ्यावी लागते जाण खरी ।
परांकारणें दुरुत्तरीं । कदा त्यानें ताडूं नये ॥८९॥
 
आतां भक्तिमार्गाचें । ऐक हें लक्षण साचें ।
भक्तिपंथानें जाणाराचें । मन पाहिजे शुद्ध अती ॥९०॥
 
मलीनता मनाठायीं । अंशेंही राहिल्या पाही ।
त्याच्या हातां येत नाहीं । भक्तिरहस्य बापा ! रे ॥९१॥
 
दया प्रेम लीनता । अंगीं पाहिजे तत्त्वतां ।
श्रवणीं-पूजनीं आस्था । पाहिजे त्याची विशेष ॥९२॥
 
मुखामाजीं नामस्मरण । करणें हरीस जाणून ।
ऐशीं अंगें असतीं जाण । या भक्ति-मार्गाला ॥९३॥
 
या अंगासह जो भक्त करी । त्यालाच भेटे श्रीहरी ।
भक्तिमार्गाची नये सरी । त्याचा विधि सोपा असे ॥९४॥
 
परी तो करण्या आचरण । कर्माहून कठीण जाण ।
जेवीं गगनानें जवळपण । नेत्रालागीं दिसतसे ॥९५॥
 
आतां योगमार्ग तिसरा । सांगतों मी ऐक खरा ।
या योगमार्गाचा पसारा । दोघांपेक्षां जास्त असे ॥९६॥
 
परी हा पसारा निश्चयेंसी । आहे ज्याचा त्याचे पासीं ।
योगमार्ग साधण्यासी । बाहेरचें न कांहीं लागे ॥९७॥
 
जेवढें आहे ब्रह्मांडांत । तेवढें आहे पिंडांत ।
त्या पिंडांतील साहित्य । घेऊन योग साधावा ॥९८॥
 
आसनें रेचक कुंभक । इडापिंगलेचे भेद देख ।
धौती मुद्रात्राटक । कळलें पाहिजे मानवां ॥९९॥
 
कुंडली आणि सुषुम्ना । यांचें ज्ञान पाहिजे जाणा ।
आधीं योग करणारांना । तरीच तो साधेल ॥१००॥
 
या तिन्ही मार्गांचें । अंतिम फळ ज्ञान साचें ।
परी तें ज्ञान प्रेमाचें । *वीण असतां कामा नये ॥१॥
 
जें जें कृत्य प्रेमावीण । तें तें अवघें आहे शीण ।
म्हणून प्रेमाचें रक्षण । करणें तिन्ही मार्गांत ॥२॥
 
काळा गोरा खुजा थोर । कुरुप आणि सुंदर ।
हे शरीराचे प्रकार । त्याची न बाधा आत्म्यातें ॥३॥
 
आत्मा अवघ्यांचा आहे एक । तेथें न पडे कदा फरक ।
शरीरभेद व्यावहारिक । त्याचें कौतुक कांहीं नसे ॥४॥
 
तीच या तिन्ही मार्गांची । स्थिति तंतोतंत साची ।
बाह्य स्वरुपें भिन्न त्यांचीं । परी मूळ कारण एक असे ॥५॥
 
मुक्कामास गेल्यावर । मार्गाचा न उरे विचार ।
जो मार्गी चालतो नर । महत्त्व त्याचें त्यास वाटे ॥६॥
 
पंथ चालण्या आरंभ झाला । परी मुक्कामास नाहीं गेला ।
अशाचाच होतो भला । तंटा पंथाभिमानानें ॥७॥
 
या तिन्ही मार्गांचे ते पांथ । मुक्कामीं पोंचल्या होती संत ।
मग तयांच्या संबंधांत । द्वैत नसे एतुलेंही ॥८॥
 
वसिष्ठ वामदेव जमदग्नी । अत्री पाराशर शांडिल्य मुनी ।
हे कर्ममार्गाच्या सेवनीं । मुक्कामासी पोंचले ॥९॥
 
व्यास, नारद, कयाधू-कुमर । मारुती, शबरी, अक्रूर ।
उद्धव, सुदामा, पार्थ, विदूर । हे गेले भक्तिमार्गें ॥११०॥
 
श्रीशंकराचार्य गुरुवर । मच्छिंद्र गोरख जालंदर ।
हे चढले जिना थोर । या योगमार्गाचा ॥११॥
 
जो वसिष्ठा लाभ झाला । तोच विदुराच्या पदरीं पडला ।
तोच मच्छिंद्रानें भोगिला । फळामाजीं फरक नसे ॥१२॥
 
तीच प्रथा पुढें चालली । येथें न शंका घ्यावी मुळीं ।
कर्ममार्गाची रक्षिली । बूज श्रीपादवल्लभें ॥१३॥
 
नरसिंह सरस्वती यतिवर । तैसेच झाले साचार ।
ठिकाण ज्यांचें गाणगापूर । वाडी औदुंबर ख्यात जगीं ॥१४॥
 
नामा सांवता ज्ञानेश्वर । सेना कान्हु चोखा महार ।
दामाजीपंत ठाणेदार । गेले भक्तिमार्गानीं ॥१५॥
 
शेख महंमद श्रीगोंद्यांत । आनंदी स्वामी जालन्यांत ।
सुर्जी-अंजनगांवांत । देवनाथ चाहाते योगाचे ॥१६॥
 
तैसेंच आहे सांप्रत । कर्ममार्गीं वासुदेव रत ।
मीं धरला भक्तिपंथ । आणिक बहुता जणांनीं ॥१७॥
 
पळुसचे धोंडीबुवा । सोनगीरचा नाना बरवा ।
जालन्याचे यशवंतरावा । भक्तिपंथ साध्य झाला ॥१८॥
 
खाल्ला आम्मा ती विदेही । तेवीं शिर्डीचे बाबा सांई ।
गुलाबरावांचे ठायीं । ज्ञानदृष्टि असे रे ॥१९॥
 
पहा चांदूर तालुक्याचा । वरखेडें नामें ग्रामाचा ।
आडकूजी नामें संत साचा । गेला याच वाटेनें ॥१२०॥
 
मुर्‍हा गांवचें संतरत्‍न । झिंगाजी तो होय जाण ।
तेवीं नागपूरचे ताजुद्दीन । भक्तिमार्गासी चहाते ॥२१॥
 
या अवघ्या संतांचें । आचरण भिन्न प्रकारचें ।
परी अधिकारी कैवल्याचे । ते बसले होउनी ॥२२॥
 
मार्ग असो कोणताही । त्याचें मुळीं महत्त्व नाहीं ।
जो मुक्कामास जाई । त्याचें कौतुक करणें असे ॥२३॥
 
आम्ही हीं भावंडें सारीं । येतें झालों भूमीवरी ।
कैवल्याच्या मार्गावरी । भाविक आणून सोडावया ॥२४॥
 
जें ज्याला आवडेल । तिकडे तो जाईल ।
आणि मोक्षरुपी भोगील फल । त्या त्या पंथा आचरोनी ॥२५॥
 
आतां नको पुसूंस कांहीं । हें न कोणा सांगे पाही ।
निवांत बसूं दे ये ठायीं । पिसेंपणाच्या पासोडीनें ॥२६॥
 
ज्याची निष्ठा बसेल । वा, जो माझा असेल ।
त्याचेंच कार्य होईल । इतरांची ना जरुर मला ॥२७॥
 
ज्यासी अनुताप झाला । ब्रह्मज्ञान सांगणें त्याला ।
उगीच तर्कटी वात्रटाला । स्फोट त्याचा करुं नये ॥२८॥
 
कोणी कांहीं म्हणोत । आपण असावें निवांत ।
तरीच भेटे जगन्नाथ । जगद्‌गुरु जगदात्मा ॥२९॥
 
ऐसा उपदेश ऐकिला । बाळाभाऊच्या नेत्रांला ।
प्रेमाश्रूंचा लोटला । पूर तो न आवरे त्या ॥१३०॥
 
अष्टभाव दाटले । शरीरा रोमांच उमटले ।
वैखरीचें संपलें । काम तेणें सहजची ॥३१॥
 
मौनेंच केला नमस्कार । श्रीगजानन साधु थोर ।
वर्‍हाड प्रांताचा उद्धार । करावयासी अवतरला ॥३२॥
 
साळुबाई नांवाची । एक असे कण्व शाखेची ।
ती होती महाराजांची । मनापासून भक्तीण ॥३३॥
 
तिला महाराज एके दिनीं । ऐशा परी वदले वाणी ।
डाळपीठ घेऊनी । स्वैंपाक करी अहोरात्र ॥३४॥
 
जे येतील तयांना । साळु घाल भोजना ।
येणेंच तूं नारायणा । प्रिय होशील निःसंशय ॥३५॥
 
ती साळुबाई मठांत । आहे अझूनपर्यंत ।
जी वैजापूरची असे सत्य । माहेर वाडेंघोडें जिचें ॥३६॥
 
प्रल्हादबुवा जोशाला । होता कृपेचा योग आला ।
तो न तया फलद झाला । तयाचिया दुर्दैवें ॥३७॥
 
खामगांवच्या सान्निध्यासी । जलंब गांव परियेसीं ।
त्या गांवचा रहिवासी । तुळसीराम एक असे ॥३८॥
 
पुत्र हा तुळसीरामाचा । आत्माराम नांवाचा ।
होता तैलबुद्धीचा । वेदाध्ययनीं प्रेम ज्याचें ॥३९॥
 
या धर्मपीठ वाराणसी । जी भागीरथीच्या तटा काशी ।
तेथें गेला अध्ययनासी । वेदवेदांग स्मृतीच्या ॥१४०॥
 
प्रत्यहीं भागीरथीचें स्नान । माधुकरीचें सेवी अन्न ।
गुरुगृहातें जाऊन । करी अध्ययन श्रुतीचें ॥४१॥
 
श्रोते विद्यार्थी ना तरी । अध्ययना जाती देशावरी ।
शिकण्याऐवजीं परोपरी । करुं लागती चैन ते ॥४२॥
 
चैनीमाजीं गुंतल्या मन । मग कशाचें अध्ययन ? ।
बिरुड आंब्यालागून । लागतां नास रसाचा ॥४३॥
 
आत्माराम नव्हता यापरी । विवेकसंपन्न सदाचारी ।
विद्या अवघी करुन पुरी । आला निजदेशातें ॥४४॥
 
स्वदेशीं येतां शेगांवासी । गेला असे अति हर्षी ।
हजिरी ती द्यावयासी । श्रीगजानन महाराजा ॥४५॥
 
तो वेद विद्येचा जाणता । गजानन केवळ ज्ञानसविता ।
आत्माराम वेद म्हणतां । कोठें कोठें चुकतसे ॥४६॥
 
त्या चुकीची दुरुस्ती । करुं लागले सदगुरुमूर्ती ।
आत्मारामाचे संगतीं । वेद म्हणती महाराज ॥४७॥
 
ऐकतां त्यांचें वेदाध्ययन । तन्मय होती विद्वान ।
न होय सराफावांचून । किंमत त्या हिर्‍याची ॥४८॥
 
शेवटीं समर्थांचेपाशीं । आत्माराम राहिला आदरेंसी ।
मधु टाकूनी मक्षिकेसी । जाणें कैसें आवडेल ? ॥४९॥
 
प्रत्यहीं सेवेकारण । यावें त्यानें जलंबाहून ।
चुकविला ना एकही दिन । ऐसा एकनिष्ठ भक्त तो ॥१५०॥
 
समर्थांच्या पश्चात । हाच होता मठांत ।
पूजा अर्चा करण्याप्रत । सद्‌गुरुच्या समाधीची ॥५१॥
 
मोबदला न घेतां भली । एकनिष्ठ सेवा केली ।
शेवटीं त्यानेंच अर्पिली । इस्टेट आपली महाराजा ॥५२॥
 
इस्टेट अल्प साचार । एक जमीन एक घर ।
येथें न दृष्टि किंमतीवर । देणें आहे भाग पहा ॥५३॥
 
भिल्लिणीनें रामाला । बोरें देऊन वश केला ।
तैसाच प्रकार हाही झाला । म्हणून केलें वर्णन ॥५४॥
 
स्वामी दत्तात्रय केदार । दुसरा नारायण जामकर ।
निवळ दुधाचा ज्यांचा आहार । तो दुधाहारी बुवा ॥५५॥
 
ऐसे श्रोते तिघेजण । स्वामीचे भक्त निर्वाण ।
ज्यांनीं आपुलें तनमन । समर्थचरणीं अर्पिलें ॥५६॥
 
मोरगांव भाकरे नांवाचा । गांव बाळापूर तालुक्याचा ।
तेथील मारुतीपंत पटवार्‍याचा । वृत्तान्त ऐका थोडासा ॥५७॥
 
श्रोते ! त्या मोरगांवांत । मारुतीपंताच्या शेतांत ।
पिकाचें रक्षण करण्याप्रत । तिमाजीनामें माळी होता ॥५८॥
 
तो माळी खळ्याभीतरीं । निजला निशीच्या अवसरीं ।
गाढ झोंप लागली खरी । ते अवसरीं तयाला ॥५९॥
 
उलटून गेले दोन प्रहर । कुंभाराचे दहावीस खर ।
खळ्यांत येऊनी दाण्यावर । पडले असती पांडयाच्या ॥६०॥
 
राखणदार झोंपीं गेला । गर्दभासी आनंद झाला ।
ते खाऊं लागले जोंधळ्याला । राशींत तोंड घालूनी ॥६१॥
 
हा पांडया मारुतीपंत । महाराजांचा होता भक्त ।
म्हणून सद्‌गुरुरायाप्रत । लीला करणें भाग आलें ॥६२॥
 
क्षणांत जाऊनी मोरगांवासी । हांक मारिली तिमाजीसी ।
अरे ! जागा होई त्वरेंसी । रासेसी गाढवें पडलीं ना ॥६३॥
 
ऐसें मोठयानें बोलून । तिमाजीस जागे करुन ।
महाराज पावले अंतर्धान । खळ्यामधून तेधवां ॥६४॥
 
तिमाजी उठून पाहतां । गाढवें दिसलीं तत्त्वतां ।
म्हणे काय करुं आतां । मालक रागे भरेल कीं ॥६५॥
 
पिकाचें रक्षण करण्यासाठी । त्यानें ठेविलें आहे मसी ।
विश्वासघात आज दिशीं । झाला त्याच्या माझ्या हातें ॥६६॥
 
तो विश्वासला माझ्यावर । मी निजता झालों निसूर ।
रास ही निम्यावर । खाऊन टाकली गाढवांनीं ॥६७॥
 
आतां समजूत मालकाची । कोण्या रीतीं घालूं साची ।
पहा त्या वेळीं इमानाची । किंमत होती लोकांस ॥६८॥
 
ना तरी हल्लींचे नोकर । निमकहराम शिरजोर ।
नफातोटयाची तिळभर । काळजी न त्यांना मालकाच्या ॥६९॥
 
तिमाजी तैसा नव्हता । हळहळ लागली त्याच्या चित्ता ।
म्हणे काय जाऊन सांगूं आतां । मी पांडयाकारणें ॥१७०॥
 
कांहीं असो चुकीची । माफी मागितली पाहिजे साची ।
उदार बुद्धि मारुतीची । आहे तो क्षमाच करील ॥७१॥
 
ऐसें मनाशीं बोलून । उदयास येतां नारायण ।
तिमाजी गांवांत येऊन । पाय धरी पंताचे ॥७२॥
 
महाराज माझ्या झोंपेनीं । बुडविलें तुम्हांलागूनी ।
दहावीस गांढवांनीं । येऊन रास खाल्ली कीं ॥७३॥
 
ती नुकसान किती झाली । ती पाहिजे पाहिली ।
खळ्यामाजीं जाऊनि भली । म्हणजे मज वाटेल बरें ॥७४॥
 
मारुती म्हणाले त्यावर । खळ्यांत यावया साचार ।
वेळ ना मला तिळभर । मी निघालों शेगांवा ॥७५॥
 
दर्शन घेऊन सद्‌गुरुचें । त्या गजानन महाराजांचें ।
उद्यां सकाळीं धान्याचें । काय झालें तें पाहीन ॥७६॥
 
ऐसें बोलून शेगांवाला । मारुतीपंत येतां झाला ।
दर्शनासाठीं मठांत गेला । दहा अकराचे सुमारास ॥७७॥
 
महाराज होते असनावरी । जगू पाटील समोरी ।
बाळाभाऊ बद्ध करीं । बसला जवळ पाटलाच्या ॥७८॥
 
मारुतीनें दर्शन । घेतां केलें हास्य वदन ।
तुझ्यासाठीं मजकारण । त्रास झाला रात्रीसी ॥७९॥
 
तुम्ही माझे भक्त होतां । मला राबण्या लावितां ।
झोंपाळू नोकर ठेवितां । आणि आपण निजतां खुशाल घरीं ॥१८०॥
 
मारुती काल रात्रीला । खळ्यांत तिमाजी झोंपीं गेला ।
गाढवांचा सुळसुळाट झाला । ते रास भक्षूं लागले ॥८१॥
 
म्हणून मी जागें केलें । जाऊन तिमाजीसी भले ।
रास सांभाळण्या सांगितलें । आणि आलों निघून ॥८२॥
 
ऐसी खूण पटतांक्षणीं । मारुतीनें जोडून पाणी ।
मस्तक ठेवूनियां चरणीं । ऐसें वचन बोलला ॥८३॥
 
आम्हां सर्वस्वीं आधार । आपुलाच आहे साचार ।
लेंकराचा अवघा भार । मातेचिया शिरीं असे ॥८४॥
 
आमुचें म्हणून जें जें कांहीं । तें अवघेंच आहे आपुलें आई ! ।
सत्ता त्यावरी नाहीं । तुम्हांवीण कवणाची ॥८५॥
 
खळें आणि जोंधळा । अवघाची आहे आपला ।
तिमाजी नोकर नांवाला । व्यवहारदृष्टीं आहे कीं ॥८६॥
 
ब्रह्मांडाचें संरक्षण । आपण करितां येथून ।
लेंकरासाठीं त्रास पूर्ण । माता सोसी वरच्यावरी ॥८७॥
 
मी लेंकरुं आपुलें । म्हणूनियां आपण केलें ।
खळ्यांत तें जाऊन भलें । मोरगांवीं संरक्षण ॥८८॥
 
ऐसीच कृपा निरंतर । स्वामी असावी माझ्यावर ।
आतांच जाऊन करितों दूर । नोकरीवरुन तिमाजीला ॥८९॥
 
ऐसें बोलतां मारुती । कौतुक वाटलें समर्थांप्रती ।
आणि भाषण केलें येणें रीतीं । तें आतां अवधारा ॥१९०॥
 
छे ! छे ! वेडया ! तिमाजीस । नको मुळींच काढूंस ।
नोकरीवरुन खास । त्याचें वर्म सांगतों तुला ॥९१॥
 
तिमाजी नोकर इमानी । खळ्यांत गाढवें पाहूनी ।
दुःखी झाला असें मनीं । तें म्यां तेव्हांच जाणिलें ॥९२॥
 
रात्रीची हकीकत । तुला सांगावया प्रत ।
आला होता भीत भीत । सकाळीं ना तुजकडे ॥९३॥
 
तैं तूं म्हणालास त्याला । मी जातों आहे शेगांवाला ।
उद्यां सकाळीं खळ्याला । येऊनियां पाहीन ॥९४॥
 
ऐसें गुरुवचन ऐकिलें। मारुतीसी चोज जहालें ।
पहा संतांचें कर्तृत्व भलें । कैसें आहे अगाध ॥९५॥
 
गाढवें खळ्यांत पडलेलीं । कोणीं न त्या सांगितलीं ।
तीं अंतर्ज्ञानें जाणिलीं । गजाननानें श्रोते हो ॥९६॥
 
शके अठराशें सोळासी । महाराज बाळापुरासी ।
असतां गोष्ट झाली ऐसी । ती थोडकी सांगतों ॥९७॥
 
तेथें सुखलाल बन्सीलालाची । एक बैठक होती साची ।
त्या बैठकीसमोर महाराजांची । स्वारी बैसली आनंदांत ॥९८॥
 
मूर्ति अवघी दिगंबर । वस्त्र नव्हतें तिळभर ।
त्या पाहून भाविक नर । नमन करुन जात होते ॥९९॥
 
तो होता हमरस्ता । बाजार पेठेचा तत्त्वतां ।
त्या पंथानें जात होता । एक पोलिस हवालदार ॥२००॥
 
नांव त्या हवालदाराचें । नारायण आसराजी होतें साचें ।
समर्था पाहून डोकें त्याचें । फिरुन गेलें तात्काळ ॥१॥
 
तो म्हणे हा नंगा धोत । मुद्दाम बसला पंथांत ।
साधू ना हा भोंदू सत्य । त्याची उपेक्षा न करणें बरी ॥२॥
 
ऐसें बोलून जवळीं गेला । अद्वातद्वां बोलूं लागला ।
लाज कैसी नाहीं तुजला । नंगा बसतोस रस्त्यावरी ॥३॥
 
हे घे त्याचें प्रायश्चित्त । तुला मी देतों आज येथ ।
ऐसें बोलून स्वामीप्रत । मारुं लागला छडीनें ॥४॥
 
वळ पाठ पोटावरी । उठते झाले निर्धारी ।
परी ना हवालदार आवरी । मारतां हात आपुला ॥५॥
 
ऐसें तेधवां पाहून । एक गृहस्थ आला धांवून ।
आपुल्या दुकानामधून । हुंडीवाला नाम ज्याचें ॥६॥
 
तो म्हणे हे हवालदार । तूं विचार कांहीं कर ।
उगेंच सत्पुरुषावर । हात टाकणें बरें नव्हे ॥७॥
 
कां कीं, संतांचा कैवारी । एक आहे श्रीहरी ।
वळ त्यांच्या पाठीवरी । उठले ते कां न दिसले तुला ॥८॥
 
या कृत्यानें तुझा अंत । जवळीं आला अत्यंत ।
आजारीच मोडितो पथ्य । मरावया कारणें ॥९॥
 
तेंच तूं आज केलें । हें न कांहीं बरें झालें ।
अजून तरी उघडी डोळे । माफी माग गुन्ह्याची ॥२१०॥
 

हवालदार म्हणे माफीचें । कारण मसीं न मागण्याचें ।
कावळ्याचे शापें साचें । काय ढोरें मरतील ! ॥११॥
 
हा नंगा धोत हलकट । बसला पाहून बाजारपेठ ।
तोंडानें गोष्टी चावट । अचाट ऐसा करीत हा ॥१२॥
 
ऐशा ढोंग्याला मारणें । ईश्वर जरी मानील गुन्हे ।
तरी मग न्याया कारणें । जागाच नाहीं राहिली ॥१३॥
 
तेंच पुढें सत्य झालें । हवालदार पंचत्व पावले ।
त्या बाळापूर नगरींत भले । आपण केलेल्या कृत्यानें ॥१४॥
 
एका पंधरवडयांत । हवालदाराचे अवघे आप्त ।
होते झाले भस्मीभूत । एका साधूस मारल्यानें ॥१५॥
 
म्हणून अवघ्या लोकांनीं । साधूसमोर जपूनी ।
वागावें प्रत्येकानीं । खरें कळेपर्यंत ॥१६॥
 
नगर जिल्ह्यांत संगमनेर । प्रवदा नदीचे कांठावर ।
गांव अति टुमदार । त्याचें वर्णन करवेना ॥१७॥
 
अनंतफंदी नांवाचा । कवि जेथें झाला साचा ।
तेथील हरी जाखडयाचा । ऐका तुम्ही वृत्तान्त हा ॥१८॥
 
हा हरी जाखडी माध्यंदिन । होता यजुर्वेदी ब्राह्मण ।
गांवोगांव फिरुन । पोट आपुलें भरीतसे ॥१९॥
 
तो फिरत फिरत शेगांवासी । आला समर्थ दर्शनासी ।
बसतां झाला पायापासीं । श्रीगजानन स्वामींच्या ॥२२०॥
 
तों हजारों घेती दर्शन । कोणी ब्राह्मणभोजन ।
कोणी खडीसाखर वांटून । नवस केलेला फेडिती ॥२१॥
 
तईं हरी म्हणे चित्तासी । हा केवढा ज्ञानरासी ।
येऊनियां पायापासीं । विन्मुख जाणें भाग मला ॥२२॥
 
कां कीं दैव खडतर । माझें आहे साचार।
निवळ पर्वत खडकावर । हरळ उगवेल कोठोनी ? ॥२३॥
 
आज अन्न मिळालें । उद्यांचें कोणीं पाहिलें ।
ऐसें करीत संपले । दिवस माझे आजवर ॥२४॥
 
संग्रहासी नाहीं धन । शेतवाडा मळा जाण ।
मी ना मुळींच विद्वान । मला कन्या कोण देईल ? ॥२५॥
 
हे स्वामी गजानना ! । सच्चिदानंदा दयाघना ! ।
संसारसुखाची वासना । जहालीं मनीं बलवत्तर ॥२६॥
 
ती तूं पूर्ण करावी । मुलें लेंकरें मला व्हावी ।
प्रथम बायको मिळावी । कुलीन आज्ञाधारक ॥२७॥
 
ऐसें जो इच्छी मनांत । तोंच त्याच्या अंगावर्त ।
थुंकते झाले सद्‌गुरुनाथ । इच्छेस त्याच्या जाणूनी ॥२८॥
 
या हरी जाखडयानें । बावंच्या मागला मजकारणें ।
म्हणून आले थुंकणें । या मूर्खाच्या अंगावर ॥२९॥
 
संसारापासून सुटावया । लोक भजती माझ्या पाया ।
यानें येथें येऊनियां । संसारसुख मागितलें ॥२३०॥
 
पहा जगाची रीत कैसी । अवघेच इच्छिती संसारासी ।
सच्चिदानंद श्रीहरीसी । पहाण्या न कोणी तयार ॥३१॥
 
ऐसें आपणासी बोलले । पुन्हां जाखडयासी पाहिलें ।
जें जें तूं इच्छिलें । सांप्रतकालीं मनांत ॥३२॥
 
तें तें अवघें होईल पूर्ण । पुत्रपौत्र तुजलागून ।
होतील संग्रहासी धन । तेंही थोडकें राहील ॥३३॥
 
जा आतां परत घरा । सुखें करी संसारा ।
करीत असावा परमेश्वर । आठव वेडया ! विसरुं नको ॥३४॥
 
ऐसें तयासी बोलून । प्रसाद म्हणून थोडकें धन ।
दिलें हरी जाखडयाकारण । लग्न स्वतःचें करावया ॥३५॥
 
हरी जाखडया संगमनेरीं । सुखी जहाला संसारीं ।
महाराजाची वाणी खरी । ती कोठून खोटी होईल ॥३६॥
 
ऐसाच एक निमोणकर । गोविंदाचा कुमार ।
रामचंद्र नामें साचार । ओव्हरसियरच्या हुद्यावरी ॥३७॥
 
बेंद्रे वासुदेव सर्व्हेअर । होता त्याच्या बरोबर ।
तो आणि निमोणकर । आले मुकना नदीवरी ॥३८॥
 
हा मुकना नाला डोंगरांत । आहे सह्याद्री पर्वतांत ।
इगतपुरी तालुक्यांत । बुध हो ! नासिक जिल्ह्याच्या ॥३९॥
 
वनश्री ती रमणीय अती । तिचें वर्णन करुं किती ।
हरीण बालकें बागडती । निर्भयपणें काननांत ॥२४०॥
 
फलभारें तरुवर । वांकले असती अपार ।
वन्य पशु फिरती स्वैर । बिब्बट लांडगे ते ठायां ॥४१॥
 
असो या मुकन्या नाल्यापासीं । जवळ एका खोर्‍यासी ।
एका जलाच्या प्रवाहासी । कपीलधारा नाम असे ॥४२॥
 
तेथें प्रत्येक पर्वणीस । भाविक येती स्नानास ।
लौकिक याचा आसपास । तीर्थ म्हणून पसरलासे ॥४३॥
 
असो एक्या पर्वणीसी । निमोणकर गेले स्नानासी ।
योगाभ्यास थोडा यासी । येत होता विबुध हो ॥४४॥
 
तो पूर्ण व्हावा म्हणून । इच्छित होतें त्याचें मन ।
गोसावी बैराग्यालागून । पुसूं लागला तेथल्या ॥४५॥
 
नाहीं नाहीं माहीत मात । ऐकूं येई सर्वत्र ।
तेणें निमोणकर चित्तांत । हताश पूर्ण जहाला ॥४६॥
 
काय करुं देवा आतां । मला योगाभ्यास शिकवितां ।
कोठें भेटेल तत्त्वतां । ती कृपा करुन सांगणें ॥४७॥
 
तो कपीलधारेवरी । एक पुरुष देखिला अधिकारी ।
ज्याचे हात गुडघ्यावरी । येऊन सहज लागले ॥४८॥
 
उंच बांधा मुद्रा शांत । बैसला होता ध्यानस्त ।
त्यास घातले दंडवत । निमोणकरानें अष्टांगेंसी ॥४९॥
 
बराच वेळ झाला जरी । योगी न कांहीं बोले परी ।
अस्तमानाची वेळ खरी । समीप येऊं लागली हो ॥२५०॥
 
पोटीं ना अन्न तिळभर । बिर्‍हाड राहिलें बहु दूर ।
कपीलधारेचें धरुन नीर । तुंब्यांत गोसावी निघाले ॥५१॥
 
तैं निमोणकर म्हणे समर्था ! । अंत माझा किती पहातां ।
ठाऊक असल्या योगगाथा । मशीं कांहीं शिकवा हो ॥५२॥
 
तो अखेर अस्तमानीं । बोलते झाले कैवल्यदानी ।
हा चित्रपट घेऊनी । जा आपुलें काम करी ॥५३॥
 
षोडाक्षरी त्यावर । मंत्र लिहिला आहे थोर ।
त्याचा वाणीनें निरंतर । जप आपुला करावा ॥५४॥
 
मंत्रप्रभावें थोडा बहुत । योग येईल तुजप्रत ।
योगमार्ग हा अत्यंत । कठीण सर्व योगामध्यें ॥५५॥
 
गोगलगाय शेप किडा । हिमालया न देईल वेढा ! ।
सागरीचा सिंप किडा । मेरु पर्वता न जाय कधीं ॥५६॥
 
नेटाचा केला यत्‍न । ब्रह्मचर्य संभाळून ।
येतील दहापांच आसन । धौती नौती केल्यावरी ॥५७॥
 
जा पुढें न विचारी मला । हा घे देतों प्रसाद तुला ।
ऐसें बोलून उचलिला । एक तांबडा खडा करें ॥५८॥
 
तो देऊनियां मजसी । गुप्त झालें पुण्यरासी ।
तेंच पुढें नाशिकासी । गंगेवरी भेटले त्या ॥५९॥
 
त्या पाहून निमोणक्र । गेले धांवत साचार ।
शिर ठेवून पायांवर । प्रश्न त्यांसी ऐसा केला ॥२६०॥
 
महाराज माझा कंटाळा । कांहो ! आपणच कां केला ।
आपुल्या नांव गांवाला । न सांगतां गेलाच कीं ॥६१॥
 
महाराज डोळे वटारुन । बोलते झाले त्याकारण ।
तांबडा खडा देऊन । नांव माझें कथिलें म्या ॥६२॥
 
नर्मदेचा गणपती । तांबडा असतो निश्चिती ।
तूं मूळचाच मूढ मती । रहस्य त्याचें न जाणिलें ॥६३॥
 
म्हणून त्याचें गूढ तुला । पडतें झालें जाण मुला ! ।
मी रहातों शेगांवाला । गजानन हें नांव माझें ॥६४॥
 
धुमाळ सदनापर्यंत । चाल माझ्या समवेत ।
पुन्हां भेटी तुजप्रत । होईल माझी ते ठायां ॥६५॥
 
ऐसें बोलूनी निघाले । महाराज रस्त्यांत गुप्त झाले ।
भिरभिरीं पाहूं लागले । चहूंकडे निमोणकर ॥६६॥
 
कंटाळून अखेरी । धुमाळाच्या आले घरीं ।
तों गजानन महाराज ओसरीवरी । बसले ऐसें पाहिले ॥६७॥
 
मौनेंच करुन वंदन । कथिलें धुमाळाकारण ।
कपीलधारेपासून । जें कां झालें इथवरी ॥६८॥
 
तें ऐकून धुमाळाला । अतिशय आनंद जहाला ।
तो म्हणे योगीराजाला । वाण कशाची सांग मज ॥६९॥
 
हे अवघ्या सामर्थ्याची । खाण निःसंशय आहेत साची ।
सार्वभौमपदाची । त्याच्या पुढें न किंमत ॥२७०॥
 
जो तांबडा खडा तुसी । दिला तो ठेवून पाटासी ।
करणें पूजा-अर्चेसी । सद्भावें निरंतर ॥७१॥
 
योगाभ्यास ही समोरी । त्या खेडयाच्या आदरें करी ।
त्याच्या कृपेनें कांहीं तरी । योगाभ्यास येईल ॥७२॥
 
तेंच पुढें झालें सत्य । योगाभ्यास थोडा बहुत ।
आला निमोणकराप्रत । श्रीगजाननकृपेनें ॥७३॥
 
एक शेगांवचा रहिवासी । तुकाराम कोकाटे परियेसीं ।
त्याची संतति यमसदनासी । जाऊं लागली उपजतांच ॥७४॥
 
म्हणून त्यानें समर्थाला । एकदां नवस ऐसा केला ।
जरी देशील संततीला । दीर्घायुषी गुरुराया ॥७५॥
 
तरी एक मुलगा त्यांतून । तुसी करान अर्पण ।
मनोरथ त्याचे पूर्ण । केले गजाननस्वामीनें ॥७६॥
 
दोन तीन मुलें झालीं । परी नवसाची न राहिली ।
आठवण तुकारामा भली । संततीच्या मोहानें ॥७७॥
 
तो थोरला मुलगा नारायण । रोग झाला त्याकारण ।
औषधोपचार केले जाण । परी न आला गुण कांहीं ॥७८॥
 
नाडी बंद होऊं लागली । नेत्रांची ती दृष्टि थिजली ।
धुगधुगी मात्र उरली । होती त्याच्या छातीला ॥७९॥
 
ती स्थिति पाहून । तुकारामा झाली आठवण ।
नवस केल्याची ती जाण । एकदम त्या समयाला ॥२८०॥
 
तुकाराम म्हणे गुरुराया । हा पुत्र माझा वांचलिया ।
अर्पण करीन सदया । सेवा तुमची करण्यास ॥८१॥
 
ऐसा वचनबद्ध होतांक्षणीं । नाडी आली ठिकाणीं ।
हळूहळू नेत्र उघडोनी । पाहूं लागला बाल तो ॥८२॥
 
व्याधि बरी झाल्यावर । तो नारायण-कुमार ।
आणून सोडला मठावर । नवस आपला फेडावया ॥८३॥
 
तो नारायण अझूनी । आहे तया ठिकाणीं ।
बोलिलेला नवस कोणी । महाराजांचा चुकवूं नये ॥८४॥
 
हेंच सांगण्या लोकांप्रत । नारायण आहे जिवंत ।
शेगांवीं त्या मठांत । संत-चरित्र ना कादंबरी ॥८५॥
 
असो पुढें आषाढमासीं । महाराज गेले पंढरीसी ।
घेऊन हरीपाटलासी । विठ्ठलासी भेटावया ॥८६॥
 
जो सर्व संतांचा । ध्येयविषय साचा ।
जो कल्पतरु भक्तांचा । कमलनाभ सर्वेश्वर ॥८७॥
 
जो जगदाधार जगत्पति । वेद ज्याचे गुण गाती ।
जो संतांच्या वसे चित्तीं । रुक्मिणीपती दयाघन ॥८८॥
 
पंढरीस आले गजानन । चंद्रभागेचें केलें स्नान ।
गेलें घ्याया दर्शन । पांडुरंगाचें राउळीं ॥८९॥
 
हे देवा पंढरीनाथा । हे अचिंत्या अद्वया समर्था ।
हे भक्तपरेशा रुक्मिणीकांता । ऐक माझी विनवणी ॥२९०॥
 
तुझ्या आज्ञेनें आजवर । भ्रमण केलें भूमिवर ।
जे जे भाविक होते नर । त्यांचे मनोरथ पूर्ण केले ॥९१॥
 
आतां अवतार-कार्य संपलें । हें तूं जाणसी वहिलें ।
पुंडलीक वरदा विठठले । जाया आज्ञा असावी ॥९२॥
 
देवा, मी भाद्रपद मासीं । जावया इच्छितों वैकुंठासी ।
अक्षय्यीचे रहावयासी । तुझ्या चरणांसन्निध ॥९३॥
 
ऐसी करुन विनवणी । समर्थांनीं जोडिले पाणी ।
अश्रु आले लोचनीं । विरह हरीचा साहवेना ॥९४॥
 
हरी पाटील जोडून हातां । पुसूं लागला पुण्यवंता ।
अश्रु कां हो सद्‌गुरुनाथा । आणिले लोचनीं ये वेळां ? ॥९५॥
 
किंवा मी कांहीं सेवेला । चुकलों आहे दयाळा ।
म्हणून आपणां खेद झाला । तें सांगा लवलाही ॥९६॥
 
महाराज म्हणाले त्यावर । हरी पाटलाचा धरुन कर ।
सांगितलें तरी न कळणार । त्याचें वर्म बापा तुला ॥९७॥
 
तो विषय खोल भारी । तूं न पडावें त्याभीतरीं ।
इतकेंच सांगतों श्रवण करी । संगत माझी थोडी असे ॥९८॥
 
चाल आतां शेगांवाला । तूं आपल्या ठिकाणाला ।
तुमच्या पाटील वंशाला । कांहीं न कमी पडेल ॥९९॥
 
पंढरीचें मावंदें केलें । शेगांवामाजीं भलें ।
चित्त चिंतेनें व्याप्त झालें । मात्र हरीपाटलाचें ॥३००॥
 
तो म्हणे मंडळीस । महाराज वदले पंढरीस ।
संगत राहिली थोडे दिवस । माझी विठूच्या राउळीं ॥१॥
 
पुढें श्रावणमास गेला । क्षीणता आली तनूला ।
पुढें भाद्रपदमास आला । काय झालें तें ऐका ॥२॥
 
गणेश चतुर्थीचे दिवशीं । महाराज म्हणाले अवघ्यांसी ।
आतां गणपती बोळवण्यासी । यावें तुम्हीं मठांत ॥३॥
 
कथा गणेशपुराणांत । ऐशापरी आहे ग्रथित ।
चतुर्थीच्या निमित्त । पार्थिव गणपती करावा ॥४॥
 
त्याची पूजा-अर्चा करुन । नैवेद्य करावा समर्पण ।
दुसरे दिवशीं विसर्जून । बोळवावा जलामध्यें ॥५॥
 
तो दिवस आज आला । तो साजरा पाहिजे केला ।
या पार्थिव देहाला । तुम्ही बोळवा आनंदें ॥६॥
 
दुःख न करावें यत्किंचित । आम्हीं आहों येथें स्थित ।
तुम्हां सांभाळण्याप्रती सत्य । तुमचा विसर पडणें नसे ॥७॥
 
हें शरीर वस्त्रापरी । बदलणें आहे निर्धारी।
ऐसें गीताशास्त्रांतरीं । भगवान् वदला अर्जुना ॥८॥
 
जे जे ब्रह्मवेत्ते झाले । त्यांनीं त्यांनीं ऐसेंच केले ।
शरीरवस्त्रासी बदलिलें । हें कांहीं विसरुं नका ॥९॥
 
चतुर्थीचा अवघा दिवस । आनंदामाजीं काढिला खास ।
बाळाभाऊच्या धरिलें करास । आसनीं आपल्या बसविलें ॥३१०॥
 
मी गेलों ऐसें मानूं नका । भक्तींत अंतर करुं नका ।
कदा मजलागीं विसरुं नका । मी आहे येथेंच ॥११॥
 
ऐसें भाषण करुन । योगें रोधिला असे प्राण ।
दिला मस्तकीं ठेवून । त्या महात्म्या पुरुषानें ॥१२॥
 
शके अठराशें बत्तीस । साधारण नाम संवत्सरास ।
भाद्रपद शुद्ध पंचमीस । गुरुवारीं प्रहर दिवसाला ॥१३॥
 
प्राण रोधिता शब्द केला । ’जय गजानन’ ऐसा भला ।
सच्चिदानंदीं लीन झाला । शेगांवामाझारीं ॥१४॥
 
देहाचें तें चलनवलन । पार गेलें मावळोन ।
स्वामी समाधिस्त पाहून । लोक हळूहळूं लागले ॥१५॥
 
पुकार झाली गांवांत । स्वामी झाले समाधिस्थ ।
ऐसी ऐकतां मात । हृदय पिटती नारीनर ॥१६॥
 
गेला गेला साक्षात्कारी । चालता बोलता श्रीहरी ।
गेला गेला कैवारी । आज दीनजनांचा ॥१७॥
 
गेला आमुचा विसांवा । गेला आमुचा सौख्यठेवा ।
विझाला हा ज्ञानदिवा । कालरुपी वार्‍यानें ॥१८॥
 
अहो गजाननस्वामी समर्था ! । आतां आम्हांस कोण त्राता ? ।
कां रे इतक्यांत पुण्यवंता । गेलास आम्हां सोडून ? ॥१९॥
 
मार्तंड पाटील, हरी पाटील । विष्णुसा बंकटलाल ।
ताराचंद प्रेमळ । भक्त स्वामीचा जो असे ॥३२०॥
 
श्रीपतराव कुळकर्णी । मठामाजीं जमले जाणी ।
विचार केला अवघ्यांनीं । ऐशा रीतीं श्रोते हो ॥२१॥
 
आज आहे पंचमीचा दिवस । समाधि न द्या स्वामीस ।
हाळोपाळीच्या लोकांस । येऊं द्या हो दर्शना ॥२२॥
 
आतां पुढें ही मूर्ति । लोपणार आहे निश्चिती ।
अस्तमानापर्यंत ती । लोकांची ती वाट पहा ॥२३॥
 
ज्यांच्या नशिबीं असेल । तयांना दर्शन घडेल ।
नका करुं आतां वेळ । जासूद धाडा चोहींकडे ॥२४॥
 
गोविंदशास्त्री डोणगांवचे। एक विद्वान् होते साचे।
ते बोलिले आपुल्या वाचें । सर्व लोकांस येणें रीतीं ॥२५॥
 
त्यांच्या आवडत्या भक्तांसी । ते दर्शन देतील निश्चयेंसी ।
तोंपर्यंत प्राणासी । मस्तकीं धारण करतील ॥२६॥
 
त्याची प्रचीति पहावया । नको कोठें लांब जाया ।
पहा लोणी ठेवोनियां। येधवां मस्तकीं स्वामीच्या ॥२७॥
 
लोणी ठेवितां शिरावरी । तें पघळूं लागलें निर्धारीं ।
जो तो त्याचें कौतुक करी । बल हें योगशास्त्राचें ॥२८॥
 
तो प्रकार पहातां । गोविंदशास्त्री झाला बोलता ।
एक दिवसाची काय कथा । हे राहतील वर्षभर ॥२९॥
 
निःसंशय ऐशा स्थितींत । परी हें करणें अनुचित ।
आवडते अवघे आलिया भक्त । समाधि द्या स्वामीला ॥३३०॥
 
तें अवघ्यांस मानवलें । स्वामीपुढें आदरें भलें ।
भजन त्यांनीं मांडिलें । हजार टाळ जमला हो ॥३१॥
 
दुरदूरच्या भक्तांप्रत । स्वामी जाऊन स्वप्नांत ।
आपुल्या समाधीची मात । कळविते झाले विबुध हो ॥३२॥
 
तया ऋषिपंचमीला । अपार मेळा मिळाला ।
लोकांचा तो शेगांवाला । घ्याया दर्शन स्वामीचें ॥३३॥
 
रथ केला तयार । दिंड्या आल्या अपार ।
सडे घातले रस्त्यावर । गोमयाचे बायांनी ॥३४॥
 
रंगवल्या नानापरी । काढू लागल्या चतुर नारी ।
दीपोत्सव झाला भारी । त्या शेगावग्रामाला ॥३५॥
 
मूर्ति ठेविली रथात । मिरवणूक निघाली आनंदात ।
रात्रभरी शेगावात । तो ना थाट वर्णाचे ॥३६॥
 
वाद्यांचे नाना प्रकार । दिंड्या मिळाल्या अपार ।
होऊं लागला भगनगजर । विठ्ठलाच्या नावाचा ॥३७॥
 
तुळशी बुक्का गुलाल फुले । भक्त उधळू लागले ।
फूलांखाली झाकून गेले । श्री गजानन महाराज ॥३८॥
 
बर्फीपेढ्यांस नाही मिती । लोक वाटती खिरापती ।
कित्येकांनी रथावरती । रूपये पैसे उधळीले ॥३९॥
 
ऐशी मिरवणूक रात्रभर । शेगावी निघून अखेर ।
उदयास येता दिनकर । परत आली मठात ॥४०॥
 
समाधीच्या जागेवरी । मूर्ती नेऊनी ठेविली खरी ।
रूद्राभिषेक केला वरी । अखेरचा देहाला ॥४१॥
 
पूजा केली पंचोपचार । आरती उजळली अखेर ।
भक्तांनी केला नामगजर । गजाननाचे नावाचा ॥४२॥
 
जय जय अवलीया गजानना! । हे नरदेहधारी नारायणा ।
अविनाशरूपा आनंदघना । परात्परा जगत्पते ॥४३॥
 
ऐशा भजनाभीतरी । मूर्ति ठेविली आसनावरी ।
उत्तराभिमुख साजिरी । शास्त्रमार्गाप्रमाणे ॥४४॥
 
अखेरचे दर्शन । अवघ्यांनी घेतले जाण ।
’जय स्वामी गजानन’ । औइसे मुखे बोलोनी ॥४५॥
 
मीठ अर्गजा अबीर । यांनी ती भरली गार ।
शिळा लावूनी केले द्वार । बंद भक्तांनी शेवटी ॥४६॥
 
दहा दिवसपर्यंत । समाराधना चालली तेथ ।
घेऊनी गेले असंख्यात । लोक स्वामींच्या प्रसादा ॥४७॥
 
खरोखरीच संतांचा । अधिकार तो थोर साचा ।
सार्वभौम राजाचा । पाड नाही त्यांच्या पुढे ॥४८॥
 
स्वस्ती श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामे ग्रंथ ।
भाविका दावो सत्पथ । भक्ती हरीची करावया ॥३४९॥
 
शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
 
॥ इति एकोनविंशोऽध्यायः समाप्तः ॥