गुरूवार, 28 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गजानन महाराज शेगाव
Written By
Last Updated : गुरूवार, 9 सप्टेंबर 2021 (17:13 IST)

श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय २०

॥ श्रीगणेशाय नमः ॥
 
जय जयाजी रुक्मिणीवरा । हे चंद्रभागातटविहारा ।
देवा वरदपाणी धरा । दासगणूच्या मस्तकीं ॥१॥
 
तूं भूपांचा भूपती । अवघेंच आहे तुझ्या हातीं ।
मग माझी फजीती । कां रे ऐसी मांडलीस ? ॥२॥
 
माझें पाप ताप दहन । करा कृपाकृशानें करून ।
राहो आनंदी सदा मन । तुझें भजन करावया ॥३॥
 
यांत अंतर केल्यास । वृथा तुला लागेल दोष ।
खर्‍या थोरांनीं आपणांस । बट्टा लावून घेऊं नये ॥४॥
 
म्हणून हे श्यामसुंदरा । राही रुक्मिणीच्या वरा ।
पांडुरंगा परम उदारा । माझी इच्छा पूर्ण करी ॥५॥
 
असो समाधिस्थ झाल्यावर । श्रीगजानन साधुवर ।
म्हणूं लागले नारीनर । आतां काय ह्या शेगांवीं ॥६॥
 
शेगांवींचा ज्ञानगभस्ती । अस्ता गेला निश्चिती ।
आतां काय तेथें माती । राहिली आहे निव्वळ ॥७॥
 
समुद्राचें आटल्या नीर । वा पुष्पतरूचा गेल्या भर ।
कोण त्याचें करणार । कौतुक या जगामध्यें ॥८॥
 
आतां खेपा शेगांवांत । करणें आहे कीं निमित्त ? ।
देव नसतां देव्हार्‍यांत । माळा बांधणें व्यर्थची ॥९॥
 
ऐसें कित्येक बोलती । परी ती असे साच भ्रांती ।
महाराजांची दिव्य ज्योति । अदृश्य आहे तेच ठायां ॥१०॥
 
जेवीं इंद्रायणीचे तीरीं । ज्ञानेश्वर समाधिस्थ जरी ।
ते आहेत भेटले परी । तेच ठायीं भाविकां ॥११॥
 
तैशीच शेगांवांत । श्रीगजाननस्वामी समर्थ ।
ऐसा जयांचा सिध्दान्त । दर्शन त्यांना तेथ होतें ॥१२॥
 
ते विषयींची एक कथा । सांगतों मी येथ आतां ।
गणपत कोठाडे होता । एक भाविक गृहस्थ ॥१३॥
 
हा रायली कंपनीचा । एजंट शेगांव दुकानीचा ।
नित्य नेम होता त्याचा । दर्शनाचा श्रोते हो ॥१४॥
 
अस्तमानीं प्रतिदिवशीं । यावें त्यानें मठासी ।
बैसोनियां समाधीपासीं । स्तवन करावें एकनिष्ठें ॥१५॥
 
एकदां ऐसें वाटलें त्यास । अभिषेक करून समाधीस ।
उद्यांच्या विजयादशमीस । ब्राह्मणभोजन घालावें ॥१६॥
 
केली सर्व तयारी । अभिषेकाची साजिरी ।
शिधा मठाभीतरीं । धाडिला मोठ्या प्रमाणांत ॥१७॥
 
तैं कांता म्हणे हो प्राणनाथा ! । हें तुम्ही काय करितां ।
हाड नाहीं तुमच्या हातां । खर्च करण्याच्या बाबतींत ॥१८॥
 
उद्यां आहे विजयादशमी । म्हणून पोरांबाळांसी ।
कपडे अलंकार अंगासी । करून घाला कांहीं तरी ॥१९॥
 
हे अभिषेक ब्राह्मणभोजनें । वरचेवरी न योग्य करणें ।
दिलीं आपणां ईश्वरानें । चार पोरेंबाळें हो ॥२०॥
 
फुटका मणि ना अंगावरती । मी लंकेची पार्वती ।
गृहस्थाची ही का रीती ? । संचय करावा धनाचा ॥२१॥
 
हें कांतेचें भाषण । गणपतरावा न रुचलें जाण ।
तो म्हणे प्रपंचाहून । श्रेष्ठ परमार्थ वाटे मला ॥२२॥
 
तोच त्याच्या कांतेसी । स्वप्न पडलें रात्रीसी ।
उगे न छळी पतीसी । तो करतो तें करूं दे ॥२३॥
 
त्यांत तुझ्या बापाचें । काय जातें सांग साचें ।
प्रेम अशाश्वताचें । वेडे ! हें बाळगूं नको ॥२४॥
 
यामध्यें न कांहीं सार । धन भूचें भूमीवर ।
येतें मात्र बरोबर । पाप पुण्य मानवाच्या ॥२५॥
 
अभिषेक ब्राह्मणभोजन । हें पारमार्थिक आहे पुण्य ।
त्याच्यासाठीं वेंचितां धन । तें न जाय अनाठायीं ॥२६॥
 
पेरलेल्या बीजापरी । त्याची स्थिती होते खरी ।
म्हणून सांगतों तुला पोरी । अडथळा त्या करूं नको ॥२७॥
 
ऐशा पाहून स्वप्नास । सांगती झाली पतीस ।
तेणें गणपतरावास । हर्ष झाला विबुध हो ॥२८॥
 
आले का हें प्रत्यंतर । महाराज येथेंच साचार ।
सोडून द्यावा कुविचार । आजपासून कांहीं तरी ॥२९॥
 
मुलें बाळें कोणाचीं । धनदौलत कोणाची ।
तूं न वाही चिंता त्यांची । तें अवघें समर्थाचें ॥३०॥
 
असो गणपतरावानें । पूजन केलें आनंदानें ।
त्या दसर्‍याच्या मुहूर्तानें । खर्चही केला अत्युतम ॥३१॥
 
या गणपतरावाची । निष्ठा समर्थपदीं साची ।
जडली शुध्द स्वरूपाची । होती पहिल्यापासून ॥३२॥
 
लक्ष्मण हरी जाजळाला । ऐसाच अनुभव एक वेळां ।
बोरीबंदरावरी आला । तो ऐका सांगतों ॥३३॥
 
कांहीं कामानिमित्त । लक्ष्मण गेला मुंबईत ।
हा समर्थाचा होता भक्त । पहिल्यापासून विबुध हो ॥३४॥
 
घरच्या कांहीं कटकटीनें । वैताग त्याच्या घेतला मनें ।
कांहीं व्यापारासंबंधानें । आला होता मुंबईस ॥३५॥
 
असो बोरीबंदरावरी । लक्ष्मण आला जाया घरीं ।
तों आगगाडीच्या धक्क्यावरी । एक भेटला परमहंस ॥३६॥
 
आजानुबाहु उंच बांधा । दृष्टि नासाग्रासी सदा ।
ओंकाराचा सर्वदा । जप चालला त्याच्या मुखीं ॥३७॥
 
तो बोलला लक्ष्मणास । तूं गजाननाचा आहेस शिष्य ।
ऐसें असून हताश । कां होतोस कळेना ? ॥३८॥
 
तूं आपुल्या जेव्हां घरीं । पुण्यतिथि केलीस खरी ।
चारशें पानांची तयारी । करून उमरावतीला ॥३९॥
 
गोपाळराव पेठकर । आणी बापटमास्तर ।
यांचा कैंसा प्रकार । घडला तो आण मना ॥४०॥
 
पुत्रशोक बापटासी । झाला असून प्रसादासी ।
तो तुझ्या गेहासी । आला होता न सांग तें ॥४१॥
 
पेठकराचे ब्राह्मण भले । सांग कशानें राहिले ? ।
अरे गजाननस्वामी गेले । त्या उभयतांच्या स्वप्नांत ॥४२॥
 
उपदेश करून दोघांस । आणिले होते प्रसादास ।
हें कैसेम विसरलास ? । सांग मला ये वेळीं ॥४३॥
 
खुणेच्या गोष्टी ऐकून । साशंक झाला लक्ष्मण ।
म्हणे हा असावा कोण । हें कांहीं कळत नसे ॥४४॥
 
लक्ष्मणें त्या संन्याशाला । आदरें नमस्कार केला ।
तो पाहतां गुप्त झाला । बोरीबंदर स्टेशनासी ॥४५॥
 
मग लक्ष्मण येऊन घरीं । वागूं लागला पहिल्यापरी ।
प्रतिवर्षी आपुल्या घरीं । पुण्यतिथीचा प्रारंभ केला ॥४६॥
 
अवधूत जयराम खेडकरासी । राहीत साहीत गांवासी ।
भेटते झाले पुण्यराशी । संन्याशाच्या वेषानें ॥४७॥
 
एक माधवमार्तंड जोशी । कळंब कसूर ग्रामासी ।
आला मोजणी करायासी । जमिनीची श्रोते हो ॥४८॥
 
हा सरकारी नौकर । होता रेव्हेन्यु आँफिसर ।
त्याचा गजानन साधूवर । पूर्ण होता भरवंसा ॥४९॥
 
दिवसभर मोजणी केली । पुढें त्यास इच्छा झाली ।
अस्तमानाचे समयां भली । शेगांवास जाण्याची ॥५०॥
 
आज गुरुवारचा आहे दिन । घेऊं समर्थाचें दर्शन ।
ऐसा विचार करून । आज्ञा केली शिपायाला ॥५१॥
 
जोड आपुली वेगें दमणी । जाऊं शेगांवालागूनी ।
रात्र तेथें काढूनी । येऊं सकाळीं परत पुन्हां ॥५२॥
 
तई तो शिपाई कुतुबुद्दीन । बोलला कर जोडून ।
आभाळ आलें भरून । याचा विचार करावा ॥५३॥
 
मन नदीला पाणी भलें । आहे थोडकें आतां आलें ।
पाही पाणी गढूळ झालें । म्हणून केली विनंती ॥५४॥
 
जोशी म्हणाले त्यावर । अरे आतां होऊण नदीपार ।
जा दमणी करी तयार । उगीच सबबी सांगूं नको ॥५५॥
 
शिपायानें जोडिली दमणी । आला लगेंच घेऊनी ।
जोशी आंत बैसोनी । जाऊं लागेल शेगांवा ॥५६॥
 
दमणी घातली नदींत । तों पाणी आलें अकस्मात ।
जाण्या बैल तटाप्रत । अवसर नाहीं राहिला ॥५७॥
 
झंझावात बळावला । कडकडाट करी चपला ।
मन नदीला पूर आला । क्षणामाजीं भयंकर ॥५८॥
 
मेघ वर्षे मुसळधार । झंझावात सुटला खरा ।
शेतकर्‍यांचिया छपरा । तो उडवूं लागला हो ॥५९॥
 
शिपाई म्हणे कुतुबुद्दीन । साहेब येथेंच आलें मरण ।
तुम्हीं आम्हांलागून । उपाय यासी आतां नसे ॥६०॥
 
तई माधव मार्तंड जोशी । घाबरे झाले निजमानसीं ।
बाहूं लागले समर्थासी । करुणायुक्त वचानें ॥६१॥
 
हे समर्थ गजानना । रक्षणा आमुच्या करी प्राणां ।
अशा संकटीं तुझ्याविणा । त्राता न कोणी आम्हांतें ॥६२॥
 
कथा ऐकिली पुराणांत । जहाज बुडतां समुद्रांत ।
त्यास संतानें देऊन हात । रक्षण केलें सर्वस्वीं ॥६३॥
 
तूंही संत असामान्य । ब्रह्मवेत्ता करूणाघन ।
करी आमुचें रक्षण । येऊन या पुरामध्यें ॥६४॥
 
दमणींत आलें जीवन । बैल गेले घाबरोन ।
मग जोशी पु्ढें होऊन । बोलते झाले शिपायास ॥६५॥
 
तूं आतां मागें सर । अवलीयाचें भजन कर ।
तेच नेतील आपणां पार । त्यांची चिंता करूं नको ॥६६॥
 
जोशी म्हणाले समर्था । अगाध आहे तुझी सत्ता ।
वाटेल तें करी आतां । तारी अथवा मारी आम्हां ॥६७॥
 
कासरा दिला सोडून । दोघांनींही मिटले नयन ।
तों काय घडलें वर्तमान । तें आतां परियेसा ॥६८॥
 
ऐशा महापुरांतूनी । पैल तटा पावली दमणी ।
उभी राहिली येऊनी । सडकेवरी शेगांवच्या ॥६९॥
 
ऐसा प्रकार पाहतां । आनंदले उभयतां ।
पाहा केवढी अगाध सत्ता । आहे अवलीया बाबाची ॥७०॥
 
पुरामाजीं रक्षण केलें । निज भक्तां ना बुडूं दिलें ।
जोशी शेगांवाप्रती आले । एक घटका रात्रीस ॥७१॥
 
वंदन केलें समाधीला । पालखीचा पाहिला सोहळा ।
दुसरे दिवशीं बहुत केला । दानधर्म जोशांनीं ॥७२॥
 
बाळाभाऊचियापासीं । ब्राह्मणभोजन घालण्यासी ।
कांही रुपये अतिहर्षीं । जोशी देते जाहले ॥७३॥
 
साकल्य कथिलें वर्तमान । बाळाभाऊलागुन ।
हे नवसाचे ब्राह्मण । तुम्ही घाला माझ्यास्तव ॥७४॥
 
कां कीं मला रजा नाहीं । काम जरूरीचें पाही ।
ऐसें सांगून लवलाही । जोशी गेले निघून ॥७५॥
 
एक यादव गणेश सुभेदार । होता हिंगणीचा राहाणार ।
हा करीतसे व्यापार । वर्‍हाडांत कापसाचा ॥७६॥
 
यांस एक सालीं भला । दहा हजार तोटा आला ।
त्या चिंतेनें क्षीण झाला । कांहीं न सुचे मानसीं ॥७७॥
 
परी व्यापार सोडवेना । चिंता मनींची जाईना ।
फायदा कांहीं होईना । त्याच्या मनाप्रमाणें ॥७८॥
 
फायद्यासाठीं खटपट करी । नाना प्रकारें साजिरी ।
स्वस्थ ना बसती व्यापारी । राहाती सदा प्रयत्नांत ॥७९॥
 
हा एकदां वर्ध्यांत । आला कांहीं कामानिमित्त ।
उतरण्या गेला घरांत । विनायक असिरकराच्या ॥८०॥
 
तों इतक्यांत तेथें आला । एक भिकारी बुध हो भला ।
भिक्षा कांहीं मागण्याला । असिरकराच्या घरांत ॥८१॥
 
पोषाख अवघा मराठी । करामाजीं भव्य काठी ।
डोईस होती टोपी मोठी । बनातीची मळकट ॥८२॥
 
कंपवायूनें शरीर । कांपत होतें वरच्यावर ।
त्यास पहातां असिरकर । चित्तीं परम कोपले ॥८३॥
 
जा बेट्या मागल्या द्वारीं । तेथें मिळेल भिक्षा खरी ।
नको चढूस पायरी । ओसरीची ये वेळां ॥८४॥
 
परी हे बोल त्याचे । भिक्षेकरी न मानी साचे ।
येऊन वरती ओसरीचे । यादवासन्निध बैसला ॥८५॥
 
घाल भिक्षा कांहीं तरी । असें म्हणून पुढें करी ।
भिक्षापात्र भिकारी । यादव सुभेदाराच्या ॥८६॥
 
यादव म्हणे मनांत । भिकारी हा लोचट बहुत ।
नको म्हणत असतां येथ । हा बैसला येवोनी ॥८७॥
 
त्यातें पहात न्याहाळून । तईं तो भासला गजानन ।
सुभेदाराकारण । शेगांवचा राजयोगी ॥८८॥
 
दृष्टीस तेज अत्यंत । स्वरही त्यांच्या परी सत्य ।
फरक इतुकाच होता त्यांत । कंप होता तनूला ॥८९॥
 
तेज मुद्रा बोलणें । होतें समर्थाप्रमाणें ।
तें पाहून ऐसें म्हणे । सुभेदार निज चित्तीं ॥९०॥
 
हा जरी मानूं गजानन । तरी ते गेले समाधिस्थ होऊन ।
आतां महाराज कोठून । पडतील आमुच्या दृष्टीशीं ? ॥९१॥
 
कांहीं असो पैसे दोन । देऊं भिकार्‍याकारण ।
श्रीगजानन समजून । उहापोह ज्याचा नको ॥९२॥
 
पैसे घेतले भिकार्‍यानें । आणिक कांहीं देई म्हणे ।
श्रीगजाननकारणें । शेरणी वाट गुळाची ॥९३॥
 
ते वायदे करिसी वरचेवर । ते मी न आतां मानणार ।
तोटा दहा हजार । तुज व्यापारीं आला ना ? ॥९४॥
 
त्याचा विचार अंतरीं । करून देई कांहीं तरी ।
रुपये मजला लवकरी । काढ पाकीट खिशांतून ? ॥९५॥
 
ऐसें भिकारी बोलतां । सुभेदार झाला देता ।
कांहीं रुपये तत्त्वतां । पाकिटाचे काढून ॥९६॥
 
भिकारी म्हणे ते अवसरीं । संतुष्ट मी इतुक्यावरी ।
होत नाहीं दे लवकरी । आणखी रुपये कांहीं मला ॥९७॥
 
पुन्हां रुपये काढिले । भिकार्‍यासी अर्पिले ।
तों इतुक्यांत घरांत गेले । विनायकराव असिरकर ॥९८॥
 
यादवराव एकटा बसला । होता असिरकराच्या ओसरीला ।
तें पाहून बोलला । सुभेदारासी येणें रीतीं ॥९९॥
 
संशय गजाननाविषयीं । कां घेतोस चित्तीं पाही ? ।
कपडे काढून उभा राही । माझ्यापुढें ये वेळां ॥१००॥
 
तुझ्या अवघ्या अंगावर । दृष्टि पडूं देई एकवार ।
माझी तेणें होईल दुर । व्याधि तुझी यादवा ॥१॥
 
तूं मजला मुलापरी । कां रे लाजसी अंतरीं ? ।
ऐसें म्हणून पाठीवरी । हात फिरविला तयांनीं ॥२॥
 
फिरविला नखशिखान्त । अंगावरून त्यानें हात ।
तों आले इतक्यांत । असिरकर ओसरीला ॥३॥
 
रुपये घेऊन भिक्षेकरी । गेला द्वाराच्या बाहेरी ।
यादवानें बहुतापरी । तपास केला गांवांत ॥४॥
 
परी न थांग लागला । शेवटीं त्यानें निश्चय केला ।
ऐसा आपुल्या चित्ताला । कीं हा असावा गजानन ॥५॥
 
सुभेदार म्हणे मानसीं । हे समर्थ असल्या आज दिवशीं ।
फायदा होईल व्यापारासी । कांहीं तरी निःसंशय ॥६॥
 
तों सुभेदाराच्या । गाड्या आल्या कापसाच्या ।
विकावयासाठीं साच्या । वर्ध्याचिया बाजारीं ॥७॥
 
विक्री होतां किंमत । येती झाली तया बहुत ।
तेणें यादव चित्तांत । समाधान पावला ॥८॥
 
आणि निश्चय ऐसा केला । जो भिकारी भेटला ।
तो होता समर्थ भला । श्रीगजानन योगीराज ॥९॥
 
समर्थ आपुल्या भक्तांसी । रक्षण करती अहर्निशीं ।
निष्ठा मात्र त्यांचेविषयीं । दृढतर पाहिजे मनांत ॥११०॥
 
भाऊ राजाराम कवर । खामगांवीं होता डाँक्टर ।
त्याची तेल्हार्‍याच्यावर । बदली असे जाहली ॥११॥
 
म्हणून तेथें जाण्याला । खामगांवाहून निघाला ।
सहकुटुंब मठांत आला । घ्याया श्रींचें दर्शन ॥१२॥
 
गाडी केली तेल्हार्‍याची । तयारी केली निघण्याची ।
वेळ अस्तमानाची । असती झाली ते वेळां ॥१३॥
 
बाळाभाऊ मठाधिपती । तो त्या बोलला येणें रीतीं ।
अहो ऐका माझी विनंती । प्रसाद घेऊन जावें तुम्हीं ? ॥१४॥
 
तुम्ही आजपर्यंत । गेलां न येथून उपोषित ।
आज ऐसें विपरीत । कां हो मनीं आणिलें ? ॥१५॥
 
ह्यांतून आहे व्यतिपात । हें आणावें मनांत ।
कवर सांगें त्याप्रत । मला निकड आहे बहु ॥१६॥
 
आज रात्रीं प्रसाद घेतों । मागल्या रात्रीं निघून जातों ।
नसतां आग्रह मला तो । तुम्ही न करा ये काळीं ॥१७॥
 
बोलल्याप्रमाणें निघाला । तेल्हार्‍यासी डाँक्टर भला ।
घेऊन मुलांमाणसांला । दमणीमाजीं बसून ॥१८॥
 
रात्र होती अंधारी । महा भयंकर साजरी ।
वाटे निशा शोक करी । निज पतीच्या वियोगें ॥१९॥
 
तों चमत्कार ऐसा झाला । तेल्हार्‍याचा रस्ता चुकला ।
कोणी न भेटे पंथाला । विचारावें कोणा जरी ॥१२०॥
 
गाडी अरुंद रस्त्यावर । दोही बांजूस कांटे फार ।
गाडी उभी कांठावर । एका भव्य तलावाच्या ॥२१॥
 
म्हणता झाला गाडीवाला । साहेब रस्ता आहे चुकला ।
हें ऐकून कवराला । आश्चर्य वाटलें मानसीं ॥२२॥
 
खालीं उतरून जों पहात । तों अवघें दिसलें विपरीत ।
अपशब्द बोलला बहुत । तो त्या गाडीवाल्याला ॥२३॥
 
तूं तेल्हार्‍याचा म्हणून । तुझी गाडी केली जाण ।
आडमार्गें आणून । आम्हां कैसें सोडिलें ? ॥२४॥
 
काय होतास दारू प्याला । म्हणून हा रस्ता चुकला ।
वाट तुझ्या डोळ्यांला । दिसली कशी ना सांग मज ? ॥२५॥
 
तेल्हार्‍याचा रस्ता थोर । आम्ही हमेशा वाहातों साचार ।
मग आडमार्गावर । गाडी कैशी आली तुझी ? ॥२६॥
 
ऐसें कवर बोलतां । गाडीवाला जोडी हातां ।
कां हो मजला शिव्या देतां ? । म्यां न अपराध केला कीं ॥२७॥
 
मी हमेश भाडें करतों । तेल्हार्‍याहून येथें येतों ।
वाटेल तेव्हां गाडी हांकतों । रस्ता अवघा माहीत मज ॥२८॥
 
बैलही ना कोठें वळले । तें नीट येथेंच आले ।
तलाव पाहातां स्तब्ध झाले । हा न रस्ता तेल्हार्‍याचा ॥२९॥
 
मग कवर समजला मनांत । हें समर्थाचें आहे कृत्य ।
प्रसाद घेतल्याविरहित । कां कीं मी निघालों ॥१३०॥
 
बाळाभाऊच्या विनंतीला । मीं नाहीं मान दिला ।
म्हणून माझा रस्ता चुकला । आतां वाट गवसे कशी ? ॥३१॥
 
हें भयंकर कानन । येथें मशी त्राता कोण ।
गजानना ! तुजवांचून । रक्षण माझें कराया ॥३२॥
 
तों तळ्याच्या दुसर्‍या बाजूला । घागरमाळांचा आवाज झाला ।
डाँक्टराच्या कानीं पडला । तेणें आला थोडा धीर ॥३३॥
 
गाडीवाल्यासी म्हणे कवर । रस्ता नाहीं फार दूर ।
या चाहुलीचा सुमार । धरून गाडी हाण आतां ॥३४॥
 
तें त्यानें ऐकिलें । कांट्यांकुपाट्यांमधून नेलें ।
नीट रस्त्याला लाविलें । या आपल्या गाडीस ॥३५॥
 
हमरस्ता लागतां भली । डाँक्टरानें चौकशी केली ।
तों ऐशापरी समजली । गोष्ट तया कवरातें ॥३६॥
 
हें शेगांवचें शिवार । आहे अझून साचार ।
मग म्हणाला डाँक्टर । चाल शेगांवीं परत आतां ॥३७॥
 
सूर्योदयाचे समायाला । शेगांवासी कवर आला ।
वृत्तांत बाळाभाऊला । केला सर्व निवेदन ॥३८॥
 
मग बाळाभाऊ म्हणाले । हेंच आज बरें झालें ।
व्यतिपातीं न जाऊं दिलें । समर्थांनीं तुम्हांस ॥३९॥
 
आज प्रसाद ग्रहण करा । उद्यां जा हो तेल्हारा ।
करूं नये कधींच खरा । प्रसादाचा इनकार ॥१४०॥
 
समर्थाचे तुम्ही भक्त । म्हणून तुम्हां आणिले परत ।
मानवाचे अवघे बेत । सिध्दीस जाणें अशक्य ॥४१॥
 
संतांच्या जे असेल मनीं । तेंच येईल घडोनी ।
भरंवसा त्यांचे चरणीं । ठेवून स्वस्थ असावें ॥४२॥
 
दुसरे दिवशीं प्रसादासी । घेऊन गेला तेल्हार्‍यासी ।
आतां पुढील गोष्टीसी । अवधान द्यावें श्रवणातें ॥४३॥
 
एक रतनसा नामें नर । होता जातीनें भावसार ।
तयाचा मुलगा दिनकर । होता एक वर्षाचा ॥४४॥
 
त्यासी सोबणीचा रोग झाला । कोणी म्हणती सटावला ।
बालक अवघा सुकून गेला । रक्त न राहिलें अंगांत ॥४५॥
 
दिसूं लागलीं अवघीं हाडें । वरतीं नुसतें कातडें ।
वैद्य आणले बडेबडे । परी न झाला उपयोग ॥४६॥
 
मुलगें रडतां राहीना । दूधपाणी घेईना ।
ज्वर मुळींच सोडीना । पाहा तयाच्या तनूतें ॥४७॥
 
वैद्य म्हणती रतनसासी । आतां औषध न देई यासी ।
हा तुझ्या हातासी । लागणें आहे अशक्य ॥४८॥
 
शक्याशक्य विचार । सुज्ञें करावा निरंतर ।
उगीच पूल सागरावर । बांधावया जाऊं नये ! ॥४९॥
 
ऐसें ऐकून रतनसा । रडूं लागला ढसढसां ।
शेवटीं विचार त्यानें ऐसा । केला आपुल्या मानसीं ॥१५०॥
 
येवींतेवी मरतें पोर । माझें आतां साचार ।
पाहूं करून एकवार । उपाय हा शेवटचा ॥५१॥
 
दिनकराचा अंतकाळ । आला होता अति जवळ ।
घरचीं माणसें सकळ । लागलीं श्रोते रडावया ॥५२॥
 
हातपाय गार झाले । नेत्रतेज मंदावलें ।
मनगटाचें सोडिलें । ठिकाण पाहा नाड्यांनीं ॥५३॥
 
ऐशा स्थितिमाझारीं । रतनसानें पुत्र करीं ।
घेऊन ठेविला असें द्वारीं । नेऊनिया समर्थांच्या ॥५४॥
 
आणि केला त्यांसी नवस । पुत्र माझा उठल्यास ।
शेरणी वांटीन तुम्हांस । मी पांच रुपयांची ॥५५॥
 
तुम्ही पावलां अवघ्यांला । त्याचा अनुभव द्यावा मला ।
मीही आहे आपुला । माझी उपेक्षा करूं नका ॥५६॥
 
माझें मूल द्वारांत । तुझ्या जरी झालें मृत ।
तरी अवघ्या वर्‍हाडांत । तुझी होईल नाचक्की ॥५७॥
 
अमृतापरी तुझे चरण । आले सांगत आम्हां जन ।
हे स्वामी गजानन । कृपा करा या बाला ॥५८॥
 
पुत्र न माझा उठला जरी । मी डोकें फोडीन पायांवरी ।
तुझ्या आज निर्धारीं । ऐसा निश्चय मनींचा ॥५९॥
 
अमृततुल्य तुझी दृष्टी । त्याची करावी आज वृष्टी ।
नको करूंस मला कष्टी । महापुरुषा गजानना ! ॥१६०॥
 
त्यास कांहीं वेळ झाला । तों प्रकार ऐसा घडून आला ।
मूल हातापायांला । हालवावया लागलें ॥६१॥
 
नाडी आली ठिकाणीं । रुदन करूं लागलें जाणी ।
तों प्रकार पाहूनी । लोक सारे आनंदले ॥६२॥
 
समर्थकृपा झाल्यावर । राहील कोठून त्या दर ? ।
सूर्याचिया समोर । तमाचा तो पाड नसे ॥६३॥
 
दिनकर थोडे दिवसांत । होता झाला पूर्वतत ।
नवस असला श्रध्दायुक्त । तो फळे हा न्याय असे ॥६४॥
 
दादा कोल्हटकराचा । पुत्र राजा नांवाचा ।
आहे प्रसाद समर्थांचा । संतकृपा अमोल खरी ॥६५॥
 
कन्या रामचंद्र पाटलाची । चंद्रभागा नांवाची ।
ज्वान अठरा वर्षांची । लाडेगांव सासर जिचें ॥६६॥
 
ही असतां गरोदर । प्रसंग आला दुर्धर ।
प्रसुतीची वेळ फार । कठीण स्त्रीजातीला ॥६७॥
 
लाडेगांवाहून माहेरीं । चंद्रभागा आली खरी ।
प्रसूतीस्तव निर्धारी । जनरीतीप्रमाणें ॥६८॥
 
मोठ्या कष्टानें प्रसूती । झाली तिची निश्चिती ।
तोंच चंद्रभागेवरती । ज्वरें अंमल बसविला ॥६९॥
 
तो होतां नवज्वर । थकून गेले डाँक्टर ।
औषध उपचार केले फार । आपुल्या मुलीस पाटलांनीं ॥१७०॥
 
थोडाबहुत गुण आला । व्याधि तितक्यापुरता दबला ।
परी नव्हता मुळींच झाला । नामशेष देहांतूनी ॥७१॥
 
चंद्रभागा आजारी । पडूं लागली वरच्यावरी ।
एकदां अकोल्या नेलें खरी । औषध तिला द्यावया ॥७२॥
 
वैद्य विघानें नाना करिती । कोणी नळसंग्रहणी बोलती ।
कोणी वैद्य ऐसें म्हणती । क्षय झाला मुलीस या ॥७३॥
 
मेळ एकाचा एकाला । नाहीं मुळीं लागला ।
मग पाटलानें विचार केला । आतां वैद्य गजानन ॥७४॥
 
तारो अथवा मारो इसी । अंगारा लावा प्रति दिवसीं ।
तीर्थ द्यावें प्यायासी । समर्थांच्या पायांचें ॥७५॥
 
पिता मोठा निष्ठावंत । समर्थावरी अवघा हेत ।
हळूहळू त्या पोरीप्रत । गुण येता जाहला ॥७६॥
 
तिला उठवत नव्हतें शय्येसी । तीच आली दर्शनासी ।
पायीं चालत मठासी । हें महत्त्व अंगार्‍याचें ॥७७॥
 
निष्ठावंत ज्याचा भाव । तयाशीं पावे देव ।
उपास्यपदीं भाव । उपासकें ठेवावा ॥७८॥
 
रामचंद्राची अंगना । जानकाबाई सुलक्षणा ।
परी दैवयोग सुटेना । तो भोगल्यांवाचुनी ॥७९॥
 
वाताचा झाला विकार । जानकाबाईस साचार ।
पोट दुखे वरच्यावर । कांहीं उपाय चालेना ॥१८०॥
 
औषध देतां दबे वात । पुनः उठे पूर्ववत ।
ऐसा क्रम दिवस बहुत । चालला होता श्रोते हो ॥८१॥
 
त्या वाताची अखेरी । होती झाली मस्तकावरी ।
मेंदु बिघडला निर्धारीं । गेली जाणीव मावळून ॥८२॥
 
वेड्यापरी करावें । वाटेल तें बोलावें ।
कधीं उपाशीं निजावें । कधीं बसावेम जेवत ॥८३॥
 
कोणी म्हणती लागलें भुत । कोणी म्हणती रोग सत्य ।
कांहीं वदू लागले तेथ । हा करणीचा प्रकार असे ॥८४॥
 
कां कीं जितके असती जमेदार । त्यांचें असतें बाकडें फार ।
दुबळा आपुला दावी जोर । चेटुककरणी करूनियां ॥८५॥
 
औषधउपाय बहुत केलें । जाणतेही आणविले ।
गंडे बहुत बांधिले । करीं जानकाबाईच्या ॥८६॥
 
पाटील घरचा श्रीमंत । तो सापडला अडचणींत ।
म्हणून येता झाला ऊत । अवघ्यां त्या दांभिकांना ॥८७॥
 
कोणी अंगांत आणावें । वेडाचें निदान करावें ।
कांहीं तरी सांगावें । धनास्तव पाटलाला ॥८८॥
 
तो बिचारा सारें करी । कांता बरी न होय परी ।
विचार त्यानें अखेरी । ऐशा रीती ठरविला ॥८९॥
 
वैद्य आतां गजानन । जाणतां आतां गजानन ।
देव ऋषि आतां गजानन । तो जें वाटेल तें करो ॥१९०॥
 
माझी बायको सून त्याची । ही भावना माझी साची ।
आतां अन्य उपायांची । गरज नाहीं आम्हांला ॥९१॥
 
तूं उद्यांपासून । प्रातःकाळीं करी स्नान ।
मठामाजीं जाऊन । घाली प्रदक्षिणा समाधीसी ॥९२॥
 
तें तिनें पतीचें वचन । सर्वथैव केलें मान्य ।
समर्थ समाधीलागून । घालू लागली प्रदक्षिणा ॥९३॥
 
गेल्या न त्या मात्र वायां । दया आली सद्गुरुराया ।
वातविकार जाऊनियां । निर्दोष ती जाहली ॥९४॥
 
खर्‍या खर्‍या संतांची । सेवा न जाई वायां साची ।
परी निष्ठा मानवाची । जडणें तेथें अशक्य ॥९५॥
 
समर्थांच्या नंतर । बाळाभाऊ गादीवर ।
बसले त्यांचे चमत्कार । कांहीं थोडे जाहले ॥९६॥
 
हे वैशाख वद्य षष्ठीसी । शेगांवीं गेले वैकुंठासी ।
त्यांच्यामागून गादीसी । बसले येऊन नारायण ॥९७॥
 
बाळाभाऊ जेव्हां गेले । तेव्हां नारायणा स्वप्न पडलें ।
नांदूरें ग्रामीं भलें । तें थोडें सांगतों ॥९८॥
 
हे माळी नारायणा । तूं शेगांवास करी गमना ।
रक्षण्या भाविक जनांना । ऐसें मला वाटतें ॥९९॥
 
ऐसें स्वप्नीं सांगून । निघून गेले गजानन ।
म्हणून आले नारायण । शेगांवामाझारीं ॥२००॥
 
कांहीं दिवस यांनींही । अधिकार चालविला ते ठायीं ।
यांची समाधि झाली पाही । चैत्र शुध्द षष्ठीला ॥१॥
 
पूर्वसुकृतावांचून । संतसेवा न घडे जाण ।
संतसेवेचें महत् पुण्य । त्या पुण्या पार नसे ॥२॥
 
श्रीगजाननलीलेचा । पार कधीं न लागायाचा ।
अंबरींच्या चांदण्यांचा । हिशोब कोणा न लागे कधीं ॥३॥
 
मी अज्ञान पामर । मति नाहीं तिळभर ।
मग हा लीलासागर । मुखीं केवीं वर्णू हो ! ॥४॥
 
त्यानें जें जें वदविलें । तें तें मीं कथित केलें ।
लेखणीनें अक्षर लिहिलें । परी तें न तिचें सामर्थ्य ॥५॥
 
ती लेखणी ज्याच्या करीं । तोंच अक्षरें काढी सारीं ।
निमित्ताकारण होतें खरी । लेखणी ती लिहावया ॥६॥
 
तैसेंच येथें झालें । मी लेखणीचें काम केलें ।
लिहिते लिहविते स्वामी भले । श्रीगजानन महाराज ॥७॥
 
त्यांच्या कृपेंकरून । मीं हें केलें लेखन ।
येथें माझें मोठेपण । कांहींच नाहीं विबुध हो ! ॥८॥
 
स्वस्ति श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ ।
आतां आला कळसाप्रत । कळसाध्याय पुढें असे ॥२०९॥
 
शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
 
॥ इति विंशोऽध्यायः समाप्तः ॥