1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. मंथन
Written By डॉ. उषा गडकरी|

संवेदनशीलता

WDWD
मनुष्य जीवनात संवेदनशीलतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच शालेय शिक्षणात ज्या दहा-बारा मुल्यांचा उल्लेख आहे त्यात संवेदनशीलता या मुल्यांचाही समावेश आहे. परंतु, संवेदनशीलता ही एक अतिशय धूसर, अमूर्त अशी कल्पना आहे. प्रामाणिकपणा, राष्ट्रप्रेम या मुल्यांसारखा मूर्त, ठोस अर्थ संवेदनशीलतेत नाही. त्याचमुळे या मुल्याचे मुलांपर्यंत संप्रेषण करणे शिशक्षकांसाठी अतिशय दुष्कर असे काम आहे. परंतु तरीही शिक्षकांजवळ शिकविण्याचे विशेष असे कौशल्य असले तर त्याच बळावर संवेदनशीलता हे मूल्य हजारो तर्‍हांनी मुलापर्यंत पोहोचवू शकण्याचे सामर्थ्य प्राप्त होते.

भूगोल शिकवितांना मुलांना नकाशाच्या साह्याने विशिष्ट भूप्रदेश दाखविता येतो. त्याच्या चतु:सीमा कोणत्या ते दर्शाविता येते. तो भूभाग डोंगराळ आहे की सपाट आहे याजे वर्णन करता येते. तेथील हवामान, पीकपाणी यांची माहिती देता येते परंतु संवेदनशीलते बाबत मात्र यापैकी कोणतेच साधन शिक्षकाजवळ उपलब्ध नसते. गणित, तर्कशास्त्र या सारखे रूक्ष विषय शिवितांना तर शिरूकाला केवळ ठोस, निश्चित अशा तथ्यांचेच विवेचन करावे लागते. त्यामुळे गणित, विज्ञान, तर्कशास्त्र शिकविणार्‍या शिक्षकाला संवेदनशीलता हे मूल्य विद्यार्थ्यांना कसे पटवून द्यावे हा प्रश्न पडतो.

यासाठी स्वत: शिक्षक अतिशय संवेदनशील असावा लागतो. त्याच्या ठिकाणी एक प्रकारची सृजनशीलता असावी लागते. त्याचे निरीक्षण अतिशय सूक्ष्म असावे लागते. शिक्षकामध्‍ये जिज्ञासा, कुतुहल सदैव जागृत असावे लागते. विद्यार्थ्याची शिकण्यात रूची आहे किंवा नाही याचा सतत अदमास घ्यावा लागतो. त्याच्यात कमालीचे निसर्गप्रेम असावे लागते. झाडे, फुले, पाने, सूर्य, चंद्र, नदी, नाले, पशु, पक्षी या सर्वांमध्ये रस असावा लागतो. स्वत:मध्ये सतत खळखळ वाहणारे चैतन्य असावे लागते.

मुलांमध्ये शिक्षकांकडे पाहून एक प्रकारचा उत्साह संचारला पाहिजे. शिक्षक, विद्यार्थ्यांचा प्रेरणास्त्रोत असायला हवा. शिक्षकाचे मन टिपकागदासारखे सर्व गोष्टी टिपून घेण्यास सक्षम असावे लागते. असा शिक्षकच विद्यार्ध्यांमध्ये उर्जेचा प्रचंड स्त्रोत निर्माण करू शकतो. त्याच्या सहवासात विद्यार्थी कंटाळत नाहीत. कितपत आहे याचा पूर्ण वि‍वेकाने अंदाज घेते. अमुक एक भावना मग ती कितीही नकारात्मक असली तरीही तिला माझ्या व्यक्तिमत्वात कुठपर्यंत स्थान आहे?

ती माझे जीवन पुढे नेते आहे की मागे खेचते आहे याचे पूर्ण भान देणे हे संवेदनशीलतेचे काम असते. भावविवशतेत मात्र आपण त्यात नकारात्मक भावनेपाठीमागे करपटले जातो. कुठे थांबावे हे आपल्याला समजत नाही. कारण ती भावनाच आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्वावर अधिराज्य गाजवीत असते. म्हणूनच 'क्रोधाने तो आंधळा झाला होता', 'सूडाने तो पेटला होता' अशी विधाने आपण करतो. 'सेन्सीटिव्हिटी' आणि 'सेंटिमेंटॅलिझम' 'संवेदनशीलता' आणि 'भावविवशता' यातील सूक्ष्म फरक समजून घेणे हेच आपल्यातील विवेकाचे काम असते. असे प्रतिक्षण 'शहाणपणाने' जगणे म्हणजेच 'संवेदनशीलतेने' जगणे, हे निश्चित.

- डॉ. सौ. ऊषा गडकरी