गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By
Last Updated : मंगळवार, 2 ऑगस्ट 2022 (09:30 IST)

Mangla gauri vrat 2022 : मंगळागौरीची संपूर्ण पूजा विधी, पूजा साहित्य, आरती आणि कथा

mangalagauri vrat katha
मंगळागौर श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित स्त्रियांनी लग्नानंतर पहिली पाच वर्षे करावयाचे असते. यासाठी अशाच अर्थात लग्नाला पाच वर्ष पूर्ण न झालेल्या किमान पाच नवविवाहितांनाही बोलावून एकत्र पूजा केली जाते. नंतर रात्री जागरण करतात.
 
पूजा साहित्य:
या पूजेसाठी अन्नपूर्णा देवीची मूर्ती, नित्य पूजेचं साहित्य, बुक्का, अक्षता, 5 खारका, 5 सुपार्‍या, 5 बदाम, 4 खोबर्‍याच्या वाटया, सोळा प्रकारची पत्री, दोन वस्त्र, आठ वाती, कापूर, गुलाल, बेल, फुले, दुर्वा, सोळा काडवाती, तुळशीची पाने, केळी, पंचामृत, नैवेद्यासाठी दूध, जानवे, सोळा विडयाची पाने, गणपतीसाठी सुपारी, अत्तर, केवड्याचे कणीस, एक नारळ, कापड, हळद-कुंकू इतर साहित्याची गरज असते.
 
पत्रीपूजा:
वेगवेगळ्या झाडांच्या पत्री व फुले वापरली जातात तसंच पूजा करताना 16 प्रकारच्या पत्री वहाव्यात.
 
अर्जुनसादडा, आघाडा, कण्हेर, चमेली, जाई, डाळिंब, डोरली, तुळस, दुर्वा, धोत्रा, बेल, बोर, माका, मोगरा, रुई, विष्णुक्रांता, शमी, शेवंती अशा झाडांची पत्री पूजेला वापरली जातात. या पूजेच्या निमित्ताने सर्व प्रकारच्या औषधी झाडांची ओळख व्हावी म्हणून ही पद्धत असावी.
 
नवविवाहित स्त्रिया या दिवशी सकाळी स्नान करून, सोवळे नेसून पूजेला बसतात. मंगळागौर म्हणजे लग्नात अन्नपूर्णाची धातूची मूर्ती मांडण्यात येते. शेजारी महादेवाची पिंडही ठेवतात. भटजींना बोलावून मंगळागौरीची षोडषोपचारपूजा करतात. पूजेनंतर पिठाच्या किंवा पुरणाच्या दिव्यांनी आरती करुन सर्वजणी एकत्र बसून मंगळागौरीची कहाणी वाचतात. नंतर पूजेसाठी आलेल्या सवाष्णींचे भोजन होते. शक्यतो मुक्याने जेवायचे असते. जेवणानंतर तुळशीचे पान खातात. या सवाष्णींना काही वस्तूंचे वाण दिलं जातं.
 
नवविवाहित मुली श्रावणातल्या मंगळवारी मंगळागौरीचे पूजन करत 'गौरी गौरी सौभाग्य दे ' अशी प्रार्थना करतात. सामूहिकरीत्या ही पूजा केली जाते. ज्या घरी मंगळागौरीची पूजा करतात तेथे संध्याकाळी महिलांना हळदी कुंकवासाठी बोलावतात. हळद-कुंकू, विडयाची पाने, सुपारी व हातावर साखर देतात. सवाष्णींची गव्हाने ओटी भरतात. रात्री फराळाचे जिन्नस करतात. रात्री पुन्हा मंगळागौरीची आरती करतात.
 
मंगळागौरी व्रत कथा
एक नगर होतं. तिथं एक वाणी होता. त्याला काही मुलगा नव्हता. त्याच्या घरी एक गोसावी येई, अल्लख म्हणून पुकारा करी. वाण्याची बायको भिक्षा आणी. निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही म्हणून चालता होई. ही गोष्ट तिनं नवर्‍याला सांगितली. त्यानं तिला एक युक्ति सांगि‍तली. दाराच्या आड लपून बस. अल्लख म्हणताच सुवर्णाची भिक्षा घाल.
 
अशी भिक्षा झोळीत घातली. बोवांचा नेम मोडला. बाईवर फार रागावला. मूलबाळ होणार नाही. असा शाप दिला. तिनं त्याचे पाय धरले. बोवांनी उ:शाप दिला. बोवा म्हणाले, आपल्या नवर्‍याला सांग, निळ्या घोड्यावर बस, निळी वस्त्र परिधान कर, रानात जा, जिथं घोडा अडेल तिथं खण. देवीचं देऊळ लागेल, तिची प्रार्थना कर. ती तुला पुत्र देईल, असं बोलून बोवा चालता झाला.
 
तिनं आपल्या पतीस सांगितलं. वाणी रानांत गेला. घोडा अडला, तिथं खणलं. देवीचं देऊळ लागलं. सुवर्णाचं देऊळ आहे, हिरेजडिताचे खांब आहेत, माणकांचे कळस आहेत, आत देवीची मूर्ती आहे. त्याने मनोभावे पूजा केली. त्याला देवी प्रसन्न झाली. वर माग म्हणाली, घरदारं आहेत, गुरंढोरं आहेत, धनद्रव्य आहे, पोटी पुत्र नाही म्हणून दुखी आहे. देवी म्हणाली, तुला संततीचं सुख नाही. मी प्रसन्न झाले आहे. तुला पुत्र देते. अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल, दीर्घायुषी घेतलास तर जन्मांध होईल. कन्या घेतलीस तर बालविधवा होईल, इच्छा असेल ते मागून घे! त्यानं अल्पायुषी पुत्र मागितला. देवीनं सांगितलं. माझ्या मागल्या बाजूला जा, तिथं एक गणपती आहे, त्याच्या मांगे आंब्याचं झाड आहे. गणपतीच्या दोंदावर पाय दे, एक फळ घे, घरी जाऊन बायकोला खाऊ घाल, म्हणजे तुझा कार्यभाग होईल. देवी अदृश्य झाली.
 
वाणी देवळामागं गेला, गणपतीच्या दोंदावर पाय दिला, झाडावर चढला, पोटभर आंबे खाल्ले, घरी नेण्याकरीता घेतले. खाली उतरून पाहू लागला. तो मोटेत आंबा एकच आहे. असं चारपाच वेळा झालं. गणपतीला त्रास झाला. त्यानं सांगितलं, तुझ्या नशिबी एकच फळ आहे. फळ घेऊन घरी आला. बायकोला खाऊ घातलं. ती गरोदर राहिली. दिवसामासा गर्भ वाढू लागला. नवमास पूर्ण झाले. वाण्याची बायको बाळंतीण झाली. मुलगा झाला. उभयतांना मोठा आनंद झाला. दिवसामासी वाढू लागला. आठव्या वर्षी मुंज केली. दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली. काशीयात्रेशिवाय लग्न करणार नाही असा माझा नवस आहे, असा जबाब दिला.
 
काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठविले. मामाभाचे काशीस जाऊ लागले. जाता जाता काय झालं? वाटेत एक नगर लागलं, तिथं काही मुली खेळत होत्या, त्यात एकमेकीचं भांडण लागलं, एक गोरी भुरकी मुलगी होती, तिला दुसरी मुलगी म्हणू लागली, काय द्वाड आहे, काय द्वाड आहे! तेव्हा ती मुलगी म्हणाली, माझी आई मंगळागौरीचं व्रत करते. आमच्या कुळावंशामध्ये कोणी द्वाड नाही. मग मी तर तिची मुलगी आहे! हे भाषण मामांनी ऐकलं. त्यांच्या मनात आलं. हिच्याशी आपल्या भाच्याचं लगीन करावं म्हणजे हा दीर्घायुषी होईल. परंतु हे घडतं कसं? त्या दिवशी तिथं त्यांनी मुक्काम केला. इकडे काय झालं? त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं. लग्नाचे वेळेस नवरा मुलगा मांदा झाला. मुलीचे आईबापांना पंचाईत पडली.
 
काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठविले. मामाभाचे काशीस जाऊ लागले. जाता जाता काय झालं? वाटेत एक नगर लागलं, तिथं काही मुली खेळत होत्या, त्यात एकमेकीचं भांडण लागलं, एक गोरी भुरकी मुलगी होती, तिला दुसरी मुलगी म्हणू लागली, काय द्वाड आहे, काय द्वाड आहे! तेव्हा ती मुलगी म्हणाली, माझी आई मंगळागौरीचं व्रत करते. आमच्या कुळावंशामध्ये कोणी द्वाड नाही. मग मी तर तिची मुलगी आहे! हे भाषण मामांनी ऐकलं. त्यांच्या मनात आलं. हिच्याशी आपल्या भाच्याचं लगीन करावं म्हणजे हा दीर्घायुषी होईल. परंतु हे घडतं कसं? त्या दिवशी तिथं त्यांनी मुक्काम केला. इकडे काय झालं? त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं. लग्नाचे वेळेस नवरा मुलगा मांदा झाला. मुलीचे आईबापांना पंचाईत पडली.
 
दुसरे दिवशी काय झालं? हिनं सकाळी उठून स्नान केलं, आपल्या आईला वाण दिलं. आई उघडून पाहू लागली, तो आत हार निघाला. आईनं कन्येच्या गळ्यात हार घातला. पुढं पहिला वर मांडवात आला. मुलीला खेळायला आणली. ती म्हणाली, हा माझा नवरा नाही, मी यांजबरोबर खेळत नाही. रात्रीची लाडवांची आंगठीची खूण काही पटेना. आईबापांना पंचाईत पडली. हिचा नवरा कसा सापडतो? नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं. जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीनं धुवावे, आईने पाणी घालावं, भावांनी गंध लावावं आणि बापानं विडा द्यावा, असा क्रम चालू केला. शेकडो लोक येऊन जेवू लागले.
 
इकडे मामाभाचे काशीस गेले. पुष्कळ दानधर्म केले, तीर्थयात्रा केल्या, ब्राह्मणांचे आर्शीवाद घेतले. एके दिवशी भाच्यास मूर्च्छा आली. यमदूत प्राण न्यायला आले. मंगळागौर आडवी आली. त्या दोघांचं युद्ध झालं, यमदूत पळून गेले, गौर तेथे अदृश्य झाली. भाचा जागा झाला, तसा आपल्या मामास सांगू लागला, मला असं स्वप्न पडलं. मामा म्हणाला, ठीक झालं, तुझ्यावरचं विघ्न टळलं. उद्या आपण घरी जाऊ. परत येऊ लागले. लग्नाच्या गावी आले. तळ्यावर स्वयंपाक करू लागले. दासींनी येऊन सांगितलं, इथं अन्नछत्र आहे, तिथं जेवायला जा! तो म्हणाले, आम्ही परान्न घेत नाही. दासींनी यजमानणीस सांगितलं. यांनी पालखी पाठविली. आदरातिथ्यानं घरी नेलं. पाय धुतांना मुलीनं नवर्‍याला ओळखलं. नवर्‍यानं आंगठी ओळखली. आईबापांनी विचारलं, तुझ्याजवळ खूण काय आहे? त्यानं लाडवाचं ताट दाखविलं. सर्वांना आनंद झाला.
 
भोजनसमारंभ झाला. मामाभाचे सून घेऊन घरी आले. सासूनं सुनेचे पाय धरले. तुझ्यामुळं माझा मुलगा वाचला, असं म्हणाली. तिनं सांगितलं, मला मंगळागौरीचं व्रत असतं, ही सगळी तिची कृपा! सासरमाहेरची घरचीदारची माणसं सर्व एकत्र जाली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं, मंगळागौर तिला प्रसन्न झाली, तशी तुम्हां आम्हां होवो, आणि आपलं सौभाग्य अखंड राहो, इतकीच देवाची प्रार्थना करा. ही धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.
 
मंगळागौरीची आरती
ओवाळू आरतीला मंगळागौरी तुजला ।
सौभाग्या देई आम्हा हिच विनंती तुला ॥ धृ. ॥
 
श्रावण मंगळवारी जमु सगळ्या आम्ही नारी ॥
अर्पूवसन जरतारी तुजला बहुत प्रकारी ।
माला या सुमनांच्या अर्पूनी पुजनाला ॥ १ ॥
 
षोडस परीची पत्री ठेवुनी या सत्पात्री ।
आनंदे आम्ही युवती वाहू तुज अति प्रिती ।
स्विकारी पुजेला वंदीत तव चरणा ॥ २ ॥
 
वंदन करितो तुजला भक्तीने आम्ही बाला ।
दावीन सन्मार्गाला यास्तव नमू चरणाला ।
अज्ञानी आम्ही बाला तारिया सकला ॥ ३ ॥
 
प्रार्थी सुशी तभया ही चीर सौभाग्या देई ।
मागत नच तव काहीं ह्यावीण अंबाबाई प्रेमाने परिसावे हिच विनंती तुला ॥ ४ ॥
 
मंगळागौरीच्या वेळी खेळण्यात येणारे खेळ
वटवाघूळ फुगडी, बस फुगडी, तवा फुगडी, फिंगरी फुगडी, वाकडी फुगडी, आगोटापागोटा, साळुंकी, गाठोडे, लाटा बाई लाटा, घोडा हाट, करवंटी झिम्मा, टिपऱ्या, गोफ, सासू-सून भांडण, अडवळ घुम पडवळ घुम, सवतीचे भांडण, दिंड, घोडा - इत्यादी. असे साधारणतः ११० प्रकारचे खेळ यात खेळले जातात.यात सुमारे २१ प्रकारच्या फुगड्या, ६ प्रकार आगोटा पागोट्याचे असतात.
 
या सर्व खेळ प्रकारांमुळे शरीराच्या विविध अवयवांना व्यायाम होतो हा हे खेळ खेळण्याचा मुख्य उपयोग सांगता येईल. पूर्वीच्या काळी केवळ घरातील कामे करणा-या महिलांना या खेळातून आनंदही मिळे. हे खेळ खेळताना महिला त्याजोडीने गाणीही म्हणतात.