गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 मार्च 2023 (13:52 IST)

महाराष्ट्राच्या राजवस्त्र असलेल्या पैठणी बद्दल जाणून घेवू तिचा पैठण ते येवला पैठणी पर्यंत चा प्रवास

paithani saree
आता सणवार सुरु होणार आहेततेव्हा महिला वर्ग हमखास तयार होण्यासाठी साडीला प्राधन्य देतात, त्यात पैठणी जीव कि प्राण  महाराष्ट्राच्या राजवस्त्र असलेल्या पैठणी बद्दल जाणून घेवू तिचा पैठण ते येवला पैठणी पर्यंत चा प्रवास.
 
अस्सल सोन्या-चांदीच्या जरीमध्ये व विशिष्ठ नक्षीदार
येवला पैठणी ''पैठणी'' हा शब्द खास करुन अस्सल सोन्या-चांदीच्या जरीमध्ये व विशिष्ठ नक्षीदार विणलेल्या पदराच्या गर्भरेशमी साडीशी निगडीत आहे. पैठणी खास करुन औरंगाबाद जिल्हयातील पैठण येथे पूर्वी तयार होत असल्याने अशा या विशिष्ठ साडीस पैठणी हे नाव पडले आहे. पैठणीचे उत्पादन स्वातंत्रपूर्व कालापर्यंत राजाश्रयाने चालत आले. राजाश्रय संपल्यानंतर याचे खास कारागीरांना रोजगार नाहीसा झाल्याने तेथून ते विस्कळीत झाले व जुन्या विणकामामध्ये काम मिळेल तेथे समावेश होत गेले. बनारसी पध्दतीचा शालू, साडी व फेटे करु लागले. त्यातील काही कसबी कामगार किंवा कारागीर निजामशाहीच्या हद्दीबाहेरचे गाव येवला येथे येऊन स्थायिक झाले. महाराष्ट्रातील येवला व पैठण येथे तयार होणारी पैठणी जगात प्रसिध्द असून तिला परदेशातून मागणी आहे.
 
पैठणी तयार करणे ही पैठण व येवला येथील पारंपारीक कला आहे. सन 1973 मध्ये हिमरु पैठणी मश्रूम प्रदर्शनात मांडली गेली व त्यास चांगली प्रसिध्दी मिळाली. त्यानंतर 75-76 मध्ये येवल्यातील कारागीरांनी पैठणी प्रदर्शनात ठेवली व त्यावेळेस येवल्यात असलेल्या कारागीरांना सुमारे 5 वर्ष पुरेल असे काम मिळाले व 74-75 पासून येवला पैठणी अस्तित्वात आली. 1977 मध्ये पहिले हातमाग प्रदर्शनामध्ये येवला पैठणीने प्रसिध्दी मिळविली. त्यावेळी अवघे 100 माग येवला येथे होते. आज येवला, नागडे, वडगांव, बल्लेगांव, सुकी 1ध्4गणेशपूर1ध्2 या गावामध्ये एकूण 850 कुटुंबे 2200 मागावर आपला व्यवसाय करीत आहेत. यातील काही कारागिरांनी राष्ट्रपती पुरस्कार, राज्य पुरस्कार व इतरही काही पुरस्कार मिळविले आहेत. येवला आणि उपरोक्त परिसरातील कारागीर हे क्षत्रिय खत्री, साळी, कोष्टी, मराठा, नागपूरी समाजातील आहेत. आर्थिक दश्ष्टया उपरोक्त कारागीरांची प्रामुख्याने वर्गीकरण करता येईल.
 
पैठणी या महावस्त्राच्या इतिहास
पैठणी या महावस्त्राच्या इतिहासाला २००० वर्षाची पंरपरा आहे. गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या पैठण या ऐतिहासिक नगरीवरुन या वस्त्राला पैठणी हे नाव मिळाले. प्राचीन काळी पैठणला प्रतिष्ठान, पाटन, पट्टून, पोतान, पैठान अशा अनेक नावांनी ओळखले जात होते. या शहराला सांस्कृतिक, धार्मिक महत्त्व आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्याचा वैभवशाली इतिहास आहे. संतांची भूमी, विद्वान-पंडितांची, विद्यानगरी म्हणून पैठणची ओळख आहे. प्रतिष्ठान ही राजधानी असणाऱ्या सातवाहन राजवंशाच्या काळात पैठणी साडीच्या निर्मितीला सुरुवात झाली, असा ऐतिहासिक ग्रंथात उल्लेख आढळतो. पैठणी साडीची निर्मितीच प्रामुख्याने भारतातून परदेशात निर्यात करण्यासाठी आणि राजकोषात भर घालण्यासाठी झाली. भारतीय विणकाम, वस्त्राचा पोत, रंगसंगती, नक्षीकाम टिकाऊपणा साडी नेसण्याची पद्धत या सर्व गोष्टी विदेशी ग्राहकांना आकर्षित करत. फार पूर्वीपासून पैठणीला विदेशात प्रचंड मागणी होती. तेव्हापासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतातून कापड निर्यातीला सुरुवात झाली. गौतमीपुत्र सातकर्णी याने सातवाहन काळात पैठणी निर्मिती उद्योगाला नवी ओळख करुन दिली. या काळात हा उद्योग प्रगतीच्या उच्चशिखरावर होता. रोम, इटली या देशात पैठणी वस्त्र मोठ्या प्रमाणात निर्यात होत.
paithani saree
एक पैठणी घडवण्यासाठी कारागिरांना खूप परिश्रम घ्यावे लागतात. पूर्वी पैठणमध्ये सोने -चांदी, हिरे -माणिके यांची सुबत्ता होती. ही साडी हातमागावर रेशीम व सोने चांदीचे यांचे जर वापरुन तयार होत असे. पूर्वी पैठणी ही प्रामुख्याने फक्त मोरपंखी रंगातच तयार होत असे. तिच्या पदरावर सोन्याच्या धाग्यांनी विणकाम केले जाई. एक सहावारी साडी विणण्यासाठी १८ ते २४ महिन्यांचा काळ लागतो. साधारणपणे पाचशे ग्रॅम रेशीम धागे आणि अडीचशे ग्रॅम जर लागते. पैठणीचे वैशिष्टय म्हणजे ती दोन्ही बाजूंनी, पदर आणि बॉर्डर समानच असते. म्हणजे मागील व पुढील बाजू सारखीच दिसते. कालांतराने पैठणी विविध रंगातही जसे लाल, पिवळा, निळा, हिरवा, जांभळा, गुलाबी, आदी रंगामध्येही तयार होऊ लागली.
 
पुढे यादव राजवंशाच्या काळातही पैठणीला विदेशात मागणी होती. मराठे, पेशवे यांच्या साम्राज्यात पैठणीला राजाश्रय मिळाला. राज घराण्यातील महिला याच साड्यांना पसंती देत. राजाश्रयाबरोबच नंतर तिला लोकाश्रय मिळू लागला. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे वैभव असणारी पैठणी सौभाग्याचे लेणे म्हणून मिरवू लागली. नववधूला ‘पैठणी’या महावस्त्राने अलंकृत करुन तिची सासरी पाठवणी होऊ लागली. तिला पूजेत मान मिळाला. पंढरपूरच्या विठू माऊली, कोल्हापुरची अंबाबाई यांना खास पैठणी वस्त्र विणून सजवले जाऊ लागले. जर आणि रेशीम यांच्या एकेक धाग्यांच्या तानाबान्यातून, विविध फुले, पक्षी यांच्या आकृत्यांचे नक्षीकाम विणताना विणकर आपला जीव त्या कलाकुसरीत ओततो. ऐतिहासिक वैभव आणि भारतीय कला यांचा सुंदर मिलाफ पैठणीत दिसतो. पैठणी विणताना विणकरांनी अनेक पिढ्यांचे अनुभव आणि परिश्रम खर्ची घातले असतात.
 
दोन्ही ठिकाणीच्या साड्यांमध्ये तुलना
येवला आणि पैठण या दोन्ही ठिकाणीच्या साड्यांमध्ये तुलना केली जाते. पैठणची पैठणी ही खरी ओळख असणारी पैठणीची बाजारपेठ पैठण पेक्षा येवल्यातच मोठ्या प्रमाणावर दिसते. पैठणला पर्यटनासाठी आल्यावर लोक पैठणी खरेदी करतात. पण येवला येथे लग्नकार्याचा बस्ता बांधण्यासाठी, खास पैठणी खरेदीसाठी जातात. पैठणला पैठणीचे अनेक निर्माते आहेत. ते व्यापारही करतात. पैठणचे प्रभाकर डालकरी तसेच येवल्यातील शांतीलाल भांडगे यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे.
 
महाराष्ट्रातील एकूण पैठणी उत्पादनात येवल्याचा सुमारे ८० टक्के वाटा आहे. त्यामुळे खरी पैठणी येवल्याचीच आहे, असे समजले जाते, असे विधान अभिनेते आदेश बांदेकर यांनी पैठण येथील एका कार्यक्रमात केले होते.
 
येवल्यामध्ये घराघरात पैठणीचे हातमाग, विक्री केंद्रे दिसतात. कस्तुरी पैठणी सारखे ऑनलाइन शापिंग आहे. त्या तुलनेत पैठणच्या पैठणी साडीचा दर्जा उत्कृष्ट असूनही पैठणीचे मार्केटिंग होऊ शकले नाही. मात्र, पैठण शहरात प्राचीन काळातील पैठणीचे अस्तित्व तेथील गल्ल्यांच्या नावावरुन दिसते. जर गल्ली, तार गल्ली, रंगार गल्ली, हताई मोहल्ला, पावटा गल्ली, साळी वाडा इ. तसे येवल्यात पैठणीच्या अतिप्राचीन संस्कृतीची चिन्हे नाहीत.
 
महाराष्ट्राच्या ‘राजवस्त्राचे’नवे रूप महिलांचे ‘सौंदर्य’आणखीनच खुलावणार असून, नेहमीची एकाच बाजूने नेसता येणारी पैठणी (Yeola Paithani saree)आता दोन्ही बाजूने परिधान करता येणार आहे. विशेष म्हणजे या नव्या रुपातील पैठणी दोन्ही बाजूने दोन रंगाची असणार आहे.
paithani saree
सर्वसाधारण पैठणी वा साडी ही एकाच बाजूने परिधान करता येते आणि तिचा रंगही एकच असतो.  मात्र दोन्ही बाजूने दोन रंगाची आणि दोन्ही बाजूने महिलांना परिधान करता येईल अशी आगळीवेगळी पैठणी येथील 75 वर्षीय राष्ट्रपती पारितोषिक प्राप्त विणकर शांतीलाल भांडगे यांनी बनविली आहे. विशेष म्हणजे पैठणीच्या आजवरच्या वाटचालीतील ही एकमेव पैठणी साकारली आहे. ही पैठणी टू-इन-वन स्वरूपाची आहे.
 
एकच पैठणी दोन्ही बाजूने परिधान करता येईल
 
या पैठणीने अनेक रूपे धारण केली असून तिचे वर्षागणिक अनेक प्रकारची रूपं आणि रंगसंगती बाजारात विणकारांनी आणली. परंतु एकच पैठणी दोन्ही बाजूने परिधान करता येईल असा प्रयत्न यापूर्वी कधीही यशस्वी झाला नव्हता. ग्राहकांना म्हणजे महिला वर्गाला प्रथमच पाहायला मिळणार आहे.
 
वास्तविक येथील पैठणीची वेगवेगळे रुपे भांडगे कुटुंबियांनी यापूर्वी साकारली आहेत. शांतीलाल भांडगे मुंबईत केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या सेवा केंद्रात असताना त्यांनी 40 वर्षांपूर्वी अशी पैठणी बनविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यावेळेस आलेले अपयश त्यांनी आज पूर्णत्वास नेले आहे.
 
दीड वर्षापूर्वी पन्नास हजार रुपये खर्च करून त्यांनी आहे त्यापेक्षा आगळावेगळा हातमाग तयार केला आणि त्याच्यावर या पैठणीची निर्मिती सुरू केली. सुरुवातीची पाच सहा महिने चार पाच वेळेस त्यांना अपयश आले. छोट्या-छोट्या तुकड्यांवर त्यांनी पहिले काम करून अपयशातून यशाकडे जात सुधारणा करत, नंतर सलग 8 महिने मेहनत घेऊन ही पैठणी पूर्णत्वास नेली आहे.
 
नव्या पैठणीची वैशिष्ट्ये
इतर पैठणीपेक्षा दीड पटीने या पैठणीचे वजन, रेशीम, विणकाम कलाकुसर हे सर्वच घटक अधिक आहे. पैठणीचे साधारणत: वजन 700 ते 800 ग्रॅमच्या आसपास असते. मात्र ही पैठणी दीड किलो वजनाची असून पैठणीचा पदर आकुर्डी डिझाईनमध्ये बारव पंजा पद्धतीने बनवला असून, त्यावरील डिझाइनही पेशवेकाळातील आहे. 8 महिने मेहनत घेऊन भांडगे यांनी साकारलेली ही पैठणी पाहताक्षणीच नजरेस भरते. म्हणूनच पैठणीच्या इतिहासातील हा प्रयत्न कौतुकास्पद आणि पैठणीला नवा लूक देणाराच म्हणावा लागेल.
 
येवला शहरात आल्यानंतर अनेक प्रकारच्या नवनव्या पैठणीचे प्रकार पाहायला मिळतात, परंतु ही दुहेरी रंगाची पैठणी ही पैठणी जगतात एक नविन अविष्कार असून ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे.

Edited by : Ratnadeep Ranshoor