बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 3 मार्च 2021 (22:02 IST)

हे तर चौकातले भाषण : फडणवीस

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर भाजपाने सडकून टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांचे भाषण म्हणजे चौकातले भाषण अशी टीका विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, राज्यपालांच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावाला जी चर्चा झाली त्या चर्चेला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री उपस्थित होते. पूर्ण तासभरात ते बोलले पण ते महाराष्ट्रात येऊच शकले नाही. ते चीनमध्ये गेले, पाकिस्तानात गेले, अमेरिकेत गेले, पंजाब, साऊथ, काश्मीर, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये गेले. पण ते महाराष्ट्राबद्दल तासभरात एक वाक्यही बोलू शकले नाही. खरंतर मुख्यमंत्र्यांना आता भरपूर दिवस झाले. पूर्वी ते नवीन होते. आता ते नवीन नाहीत. त्यामुळे चौकातले भाषण आणि सभागृहातील भाषण यातलं अंतर मुख्यमंत्र्यांना अजूनही लक्षात आलेले नाही, सभागृहामध्ये उपस्थित झालेल्या मुद्यांवर बोलावं लागत. राज्यातील प्रश्नांवर बोलावं लागतं. दुर्देवाने शेतकऱ्यांसंदर्भात एक मुद्दा ते बोलू शकले नाही. शेतकऱ्यांना अनुदान मिळालं नाही त्याबद्दल बोलले नाहीत, बोंड आळीबद्दल ते बोलले नाहीत. विम्याबद्दल ते बोलले नाहीत. वीज तोडणीबद्दल ते बोलले नाहीत. महाराष्ट्रात साडेतीन लाख शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडणाऱ्या मुख्यमंत्र्यांना चिंता कुणाची आहे? तर दिल्लीत सिंघू बॉर्डरवर बसलेल्या शेतकऱ्यांची वीज तोडली जाती आहे, याची चिंता त्यांना आहे. अशी टीकाही केली.