गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 28 नोव्हेंबर 2022 (16:01 IST)

उदयनराजे रडत म्हणाले, 'हा दिवस बघण्यापेक्षा मेलो असतो तर बरं झालं असतं'

udyan raje bhosale
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी केलेल्या वादग्रस्त व्यक्तव्याचा निषेध करण्यासाठी खासदार उदयनराजे भोसलेंनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत उदयनाराजे भावनिक झाले आणि म्हणाले की, "हा दिवस बघण्यापेक्षा मेलो असतो तर बरं झालं असतं." छत्रपती शिवाजी महाराजांवर जे वक्तव्य केले गेले आहे, ते निषेधार्ह आहे, असं मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.
 
"महाराष्ट्रात प्रत्येक कार्यक्रमापूर्वी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करून सुरुवात केली जाते. पण जर आज शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह विधानं करण्यात येत असतील आणि ती खपवून घेतली जाणार असेल तर शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही," असे उदयनराजे भोसले म्हणाले.
 
"शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करत नसाल, तर शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही," असं म्हणत उदयनराजेंनी भाजपला घरचा आहेर दिला.
 
उदयनराजे म्हणाले की, "काही लोक म्हणतात, त्यांना लिहून देण्यात आलं, मग बोललं. पण असं होत नाही. ते सज्ञान आहेत. ते वयाने मोठे आहेत, राज्यपाल आहे. अशा जबाबदारीच्या पदावर असताना, असं विधान करता, तेव्हा त्याचा अर्थ काय घ्यायचा?" "कोण तो त्रिवेदी, म्हणे माफीनामा. त्याने बुद्धी चेक केली पाहिजे. सर्वजण मुघलांना शरण गेले होते, तेव्हा एकटे छत्रपती शिवाजी महाराज मुघलांशी लढले होते," असंही उदयनराजे म्हणाले. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची भेट घेऊन याबाबत त्यांना सांगणार असल्याचंही उदयनराजे भोसले म्हणाले. "विरोधक कुणाला म्हणायचं, इथं प्रत्येकजण सोयीसाठी, राजकारणासाठी शिवाजी महाराजांचं नाव वापरतात. मग अशावेळी सत्तेत कोण आहे, हे महत्त्वाचं नाहीय, इथं प्रत्येकानं ठाम भूमिका मांडणं आवश्यक आहे," असं उदयनराजे म्हणाले.

Published By- Priya Dixit