शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By

रग्बीमध्ये ठसा उमटवणाऱ्या आदिवासी मुली

- संदीप साहू
फिलिपिन्सची राजधानी मनिलामध्ये भारतीय महिला रग्बी संघाने इतिहास रचला आहे.
 
आशिया रग्बी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात शक्तिशाली सिंगापूर संघाचा 21-19 असा पराभव करत भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच कुठल्याही '15-ए-साईड' आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पहिला विजय मिळवला. एवढंच नाही तर कांस्य पदकही पटकावलं.
 
फिलिपिन्सची राजधानी मनिलामध्ये भारतीय महिला रग्बी संघाने इतिहास रचला आहे.
 
आशिया रग्बी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात शक्तिशाली सिंगापूर संघाचा 21-19 असा पराभव करत भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच कुठल्याही '15-ए-साईड' आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पहिला विजय मिळवला. एवढंच नाही तर कांस्य पदकही पटकावलं.
 
"सामना संपण्यासाठी दोन मिनिटं शिल्लक असताना एक पेनल्टी घेण्याचा विचार मी केला. थोडी भीतीही वाटत होती. मी पेनल्टी घेत स्कोअर केला. मात्र, अजूनही दोन मिनिटं होती आणि सिंगापूरचा संघ इतक्या सहजासहजी माघार घेणार नव्हता. आम्हीही त्यांच्या आक्रमणाचा हिमतीने सामना केला. जेव्हा हूटर वाजला आणि आम्ही जिंकलो त्यावेळच्या भावना मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही."
 
बालपणीच आईची साथ सुटली
सुमित्रा ही जाजपूर जिल्ह्यातल्या एका गरीब आदिवासी कुटुंबात जन्मली. 1999 सालीच तिच्या आईचा मृत्यू झाला. त्यावेळी सुमित्रा खूपच लहान होती आणि तिला चार भावंडं होती.
 
सुमित्राच्या वडिलांना कुटुंबाचा सांभाळ करणं कठीण होत चाललं होतं. 2006 साली त्यांनी कुठूनतरी 'कलिंग इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेस'विषयी ऐकलं आणि त्यांनी सुमित्राला तिथे पाठवलं.
 
काही काळाने तिची इतर भावंडंही तिथे आली. 2007 साली या संस्थेच्या संघाने लंडनमध्ये 14 वर्षांखालील वर्ल्ड चॅम्पियनशीप जिंकली. या विजयामुळे सुमित्राला रग्बीची आवड निर्माण झाली आणि तिने या खेळात प्रावीण्य मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले.
 
विजयी भारतीय संघात असलेल्या या संस्थेच्या इतर चार मुलींची कहाणीही जवळपास सुमित्रासारखीच आहे. केओन्झर जिल्ह्यातल्या मीनाराणी हेम्ब्रमच्या वडिलांच्या मृत्यूनंतर तिची आई रोजगाराच्या शोधात भुवनेश्वरला आली आणि लोकांच्या घरातली भांडी घासून उदरनिर्वाह करू लागली. त्यांनीही या संस्थेविषयी ऐकलं आणि मीनाराणीला तिथे पाठवलं.
 
'कलिंग इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस'ने दिल्या सुविधा
 
अत्यंत गरीब कुटुंबातून आलेल्या या मुलींनी आज एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतासाठी पदक जिंकलं असेल तर याचं संपूर्ण श्रेय या संस्थेचे संस्थापक आणि कंधमालमधून नवनिर्वाचित खासदार डॉ. अच्युत सामंत यांना जातं.
 
त्यांनी केवळ या मुलींना मोफत शिक्षणाची संधीच दिली नाही तर त्यांना आंतरराष्ट्रीय स्तराचं प्रशिक्षण आणि पायाभूत सुविधाही उपलब्ध करून दिल्या.
 
विजयी भारतीय महिला रग्बी संघाची आणखी एक खेळाडू हुपी माझी म्हणते, "ते आमच्यासाठी ईश्वर आहेत. त्यांचं ऋण आम्ही सात जन्मातही फेडू शकत नाही."
 
आम्ही डॉ. सामंत यांना विचारलं की भारतात फारसा लोकप्रिय नसलेला रग्बी सारखा क्रीडा प्रकार त्यांनी का निवडला. यावर ते म्हणाले, "रग्बी आजही भारतात फारसा लोकप्रिय नाही, हे वास्तव आहे. मात्र, आम्ही केवळ रग्बीसाठीच हे केलं, असं नाही. सर्वच खेळांसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, ज्यामुळे देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात विशेषतः आदिवासी भागातल्या खेळाडूंना वाव मिळावा, असा आमचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे."
 
आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या सुविधा देण्यात ही संस्था अजूनही काहीशी मागे असल्याचं संस्थेचे रग्बी कोच रुद्रकेश जेना यांना वाटतं. असं असलं तरी 'किस'मध्ये उपलब्ध सोयी-सुविधा देशातल्या इतर कुठल्याही संस्थेच्या तुलनेत उजव्या आहेत, हेही ते सांगतात.
 
ते म्हणतात, "रग्बी खेळणाऱ्या अनेक देशांचा मी दौरा केला आहे आणि देशात जिथे रग्बी खेळतात, तिथेही भेट दिली आहे. इथल्या अनुभवावरून मी म्हणू शकतो की आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आम्ही अजूनही काहीसे मागे आहोत. मात्र, इथे प्रशिक्षणासाठी आवश्यक सर्व सोयी आहेत."
 
कदाचित यामुळेच फिलिपिन्स दौऱ्याआधी भारतीय महिला संघाच्या 14 दिवसांच्या प्रशिक्षण शिबिराचं आयोजनही 'किस'च्या कॅम्पसमध्येच करण्यात आलं होतं. या शिबिरात दक्षिण आशियातल्या वेगवेगळ्या देशातून आलेल्या चार आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांनी खेळाडूंना प्रशिक्षण दिलं.
 
यापूर्वी डॉ. सामंत यांनी 'किस'च्या खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी दक्षिण आफ्रिकेतून एका कोचला आमंत्रित केलं होतं. फिलिपिन्समध्ये विजयाची शिल्पकार ठरलेल्या सुमित्राला वाटतं की त्या प्रशिक्षणाचा सर्वच खेळाडूंना खूप फायदा झाला.
 
आतापर्यंत धावपटू दुती चांद हीच 'किस' विद्यापीठाची ('किस'ची मूळ संस्था) 'शुभांकर' होती. पण आता वाटतं या संस्थेतून तिच्यासारख्या शेकडो आदिवासी मुली स्टार होऊनच बाहेर पडतील.