भारतीय बँका सुरक्षित- अर्थमंत्री
अमेरिकेतील लेहमन बँक दिवाळखोरीत निघाल्यानंतर आणि जागतिक मंदीचे वारे वाहू लागल्याने घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नसून भारतीय बँकांची स्थिती चांगली असल्याने या मंदीचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसणार नसल्याचे अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी स्पष्ट केले आहे. सलग तीन दिवसांपासून भारतीय बाजारात पडझड होत असल्याने बाजारात स्थिरता निर्माण करण्यासाठी अर्थमंत्री कोणते पाऊल उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तीन दिवसांनंतर अर्थमंत्र्यांनी आपले मौन आज सोडले. भारतीय बाजारात जरी पडझड होत असली तरी गुंतवणूकदारांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. रिझर्व्ह बँक येणाऱ्या संकटांना तोंड देण्यास सक्षम असून, भारतीय बँकांची प्रगती आणि त्यांच्याकडे असलेल्या राखीव निधीची आकडेवारी पाहता या मंदीचा फारसा प्रभाव भारतीय बँकांवर पडणार नसल्याचे चिदंबरम म्हणाले. आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सुरुवातीला 900 हून अधिक अंशांनी कोसळला असला तरी लवकरच बाजारात नवचैतन्य निर्माण होईल अशी आशाही पत्रकारपरिषदेत अर्थमंत्र्यांनी व्यक्त केली.