शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बिलासपूर , शुक्रवार, 1 जुलै 2022 (15:35 IST)

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट

नवरा-बायकोमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणं होतच असतात. काही वेळा हे वाद घटस्फोटापर्यंत पोहोचतात. याआधी घरात टॉयलेट नाही म्हणून बायको माहेरी निघून गेली हे तुम्ही बऱ्याच फिल्ममध्ये पाहिलं असेल. प्रत्यक्षातही असं एखादं प्रकरण तुम्हाला माहिती असेल. पण कधी कुणी टिव्हीच्या रिचार्जचं कारण देत माहेरी निघून गेलं आणि घटस्फोट मागितला हे मात्र अजबच आहे. जेव्हा हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं तेव्हा तेसुद्धा हैराण झाले.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार डिश टीव्हीचा रिचार्ज संपल्याने पत्नी आपलं सासर सोडून माहेरी निघून गेली. नवऱ्याची चूक फक्त इतकीच की त्यावेळी रिचार्ज करण्यासाठी त्याच्या खिशात पैसे नव्हतं. संध्याकाळी कामाहून परतल्यानंतर रिचार्ज करतो, असं त्याने सांगितलं. यामुळे पत्नी माहेरी गेली. कारण तिला टीव्हीशिवाय एक क्षणही तिथं राहायचं नव्हतं.  टीव्ही नहीं तो बीबी नहीं असं तिने आपल्या पतीलाही सांगितलं होतं.
काऊन्सिंगदरम्यान बायकोने सांगितलेलं घटस्फोटाचं कारण ऐकून पोलिसांना धक्काच बसला. बिलासपूर महिला पोलीस ठाण्यातील समुपदेशक नीता श्रीवास्तव यांनी सांगितलं, फक्त 250 रुपयांचा टीव्हीचा रिचार्ज न केल्याने पत्नी माहेरी निघून गेली, हे ऐकून आम्हीही हैराण झालो. या छोट्याशा गोष्टीवरून पती-पत्नी इतका वाद झाला की प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचलं.
या दाम्पत्याचं समुपदेशन करण्यात आलं आहे. पती-पत्नी दोघांनाही समजावण्यात आलं. काऊन्सलर नीता यांनी सांगितलं की, किरकोळ वाद होणं हा आयुष्याचा भाग आहे. पण वाद इतका मोठा करायला नको. काही दिवसांच्या काऊन्सिलिंगनंतर नवरा-बायको दोघांनीही समुपदेशकांचं ऐकलं. यामुळे एक संसार उद्ध्वस्त होता होता वाचला.