शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018 (00:21 IST)

हिंदू धर्मात दान केव्हा आणि किती द्यायला पाहिजे

आपल्या उत्पन्नातील किमान २० टक्के रक्कम दानधर्मात खर्च करायला हवी. याने प्रारब्धाची शुद्धी होते व लक्ष्मी स्थिर होते. दानाने धनाची वृद्धी होते व केलेल्या कार्यात यश प्राप्त होते. वेद शास्त्रे व अठरा पुराणे या सर्वांमध्ये दानाचा महिमा वर्णन केलेला आहे. सर्वसाधारण ईश्वरी महिमा असा आहे की, एखाद्या घराण्यामध्ये लक्ष्मी जास्तीत जास्त ६० वर्षे राहते. घराण्यातील पूर्वज जर जास्तच पुण्यवान असतील, तर लक्ष्मी ७५ वर्षांपर्यंतसुद्धा राहते. या कालावधीत पुण्याईचा क्षय होत असतो. घराण्यामध्ये कोर्ट-कचेऱ्या, भांडणे, कलह, पिशाच्च शक्तींचा उपद्रव, अशा प्रकारचे त्रास सुरु होतात.
 
शेवटच्या १०-२० वर्षात सर्व संपूण जाते. दारिद्र्य, अहंकार, अज्ञान व मूढता यांच्या खाईत ते घराणे लोटले जाते. लक्ष्मी निघून जाते व अहंकार, दारिद्र्य व दुर्गुण घराण्यात शिल्लक राहतात. धन, यश, किर्ती, ऐश्वर्य, विद्या, सत्ता, सौंदर्य, सामर्थ्य या सर्व गोष्टी पूर्वपुण्याइने प्राप्त होत असतात व पूर्वपुण्याई ही दैनंदिन मानवी जीवणामध्ये रोजच खर्च होत असते. याकरिता पुण्याई सतत वाढवीत राहणे आवश्यक असते. ईश्वरचिंतन व दान याने पुण्याई वाढत राहते. म्हणून सतत ईश्वरचिंतन व दान करत राहायला हवे. 
 
धनवानांनो ! या चंचल लक्ष्मीवर कधीही विश्वास ठेवू नका. अहंकार, घमेंड, स्वार्थ व लोभ अशा अनेक दुर्गुणांना बरोबर घेऊन ही लक्ष्मी आपल्या घरी येते. व ती जेव्हा जाते तेव्हा अनेक दुर्गुणांना आपल्या घराण्यात सोडून जाते, असे विद्वान लोकांचे म्हणणे आहे; परंतु खरी गोष्ट अशी आहे की, अपुऱ्या पुण्याईमुळे धन आल्यानंतर माणसाला अहंकार होतो व अहंकार सर्व दुर्गुणांना जन्म देतो. भरपूर पुण्याई असेल, तर खऱ्या अर्थाने लक्ष्मी प्रसन्न होते व लक्ष्मी प्रसन्न झाली असता ऐहिक, पारमार्थिक उन्नती होते.