1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 16 सप्टेंबर 2019 (11:15 IST)

एअर इंडियाचे एका वर्षात 8,400 कोटी रुपयांचे नुकसान

मागील एका वर्षात एअर इंडियाला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. अगोदरच कर्जात बुडालेल्या एअर इंडीयाला 2018-2019 या आर्थिक वर्षात तब्बल 8,400 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. जास्त ऑपरेटिंग खर्च आणि परकीय चलन तोटा यामुळे कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे.
 
एअर इंडिया आधीच निधीच्या कमतरतेमुळे झगडत आहे आणि कर्जाच्या ओझ्याखाली आहे. 2018-19 या आर्थिक वर्षात कंपनीचे एकूण उत्पन्न 26,400 कोटी रुपये होते. यावेळी कंपनीला 4,600 कोटी रुपयांचे ऑपरेटिंग नुकसान सहन करावे लागले. तेलाचे वाढते दर आणि पाकिस्तानच्या भारतीय विमानांचे हवाई क्षेत्र बंद झाल्यानंतर या कंपनीला दररोज 3 ते 4 कोटींचे नुकसान होत आहे. कंपनीच्या एका वरिष्ठ अधिका-याने वृत्तसंस्थेला सांगितले की, केवळ जूनच्या तिमाहीत पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे एअर इंडियाला 175-200 कोटी रुपयांचे ऑपरेटिंग नुकसान झाले.
 
सरकारी आकडेवारीनुसार 2 जुलैपर्यंत पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे एअर इंडियाचे 491 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. असे असूनही अधिकाऱ्यांना आशा आहे की या आर्थिक वर्षाच्या शेवटी म्हणजेच सन 2019-20 मध्ये कर्जबाजारी एअर इंडिया पुन्हा नफ्यात येईल. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून एअर इंडियाचे प्रचंड नुकसान होत आहे आणि ते कर्जात आहे. निर्गुंतवणुकीद्वारे त्याचे आरोग्य सुधारण्याची तयारी सुरू आहे. एअर इंडियाचे एकूण 58,000 कोटी रुपयांचे कर्ज आहे आणि ते परतफेड करण्यासाठी एअरलाइन्सला वर्षाकाठी 4,000 कोटी रुपये खर्च करावे लागतात.