गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 13 मे 2021 (08:10 IST)

पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळ येण्याची शक्यता, हवामान खात्याकडून इशारा

महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळ येण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. मुंबई किनारपट्टीला चक्रीवादळाचा धोका असल्याने सावधान राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. तौकते असे या चक्रीवादळाचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे. १४ मे रोजी सकाळी दक्षिण पूर्व अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार नाही. हे क्षेत्र उत्तर पश्चिम दिशेने सरकण्याची शक्यता आहे. हळूहळू हा कमी दाबाचा पट्टा दक्षिणपूर्व अरबी समुद्र आणि लक्षद्विपच्या भागात तीव्र होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या वादळामुळे महाराष्ट्रातील अनेक राज्यांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. या चक्रीवादळामुळे महाराष्ट्र लक्षद्विप आणि किनारपट्टीच्या भागात त्याचप्रमाणे गोवा,केरळ,कर्नाटक राज्यात तुरळक पाऊस होण्याची शक्यता आहे.
 
१५ मे रोजी मुंबई बंदरावर सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. हार्बर मास्टर मुंबई पोर्ट ट्रस्टने सर्व शिपिंग लाईन्सनाही सतर्कतेचा इशारा देण्याच्या सूचना दिल्या आहेत. हे वादळ १६ मे रोजी तीव्र होईल असे IMDकडून सांगण्यात आले आहे. १६ मेला हे वादळ वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुजरात आणि दक्षिणच्या कच्छ प्रदेशांकडे वादळ जाण्याची शक्यता आहे.
 
या वादळामुळे मच्छिमारांना पुढील काही दिवस समुद्रात मासेमारी करण्यास न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे समुद्रात गेलेल्या मच्छिमारांना आणि बोटींना परत येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.